कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांची भेट घेऊन सनातनच्या साधकांनी घेतला आशीर्वाद !

मुंबई, ८ एप्रिल (वार्ता.) – कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांची सनातनच्या साधकांनी ८ एप्रिल या दिवशी भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. माटुंगा येथील श्री शंकर मठामध्ये ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असतांना साधकांनी त्यांची भेट घेतली. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, सौ. धनश्री केळशीकर, श्री. राजेंद्र पावसकर, अधिवक्ता अनेश परळकर, श्री. पवन तांडेल उपस्थित होते. ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचीही उपस्थिती लाभली. साधकांनी पुष्पहार अर्पण करून शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतला.

सनातनच्या आश्रमात भेटीचे निमंत्रण !

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांना रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या भेटीचे निमंत्रण दिले. या वेळी अभय वर्तक यांनी सनातन संस्था निर्मित ‘मंदिरात दर्शन कसे घ्यावे ?’ आणि ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता ?’ हे ग्रंथ शंकराचार्यांना भेट दिले.

भगवंतावर श्रद्धा ठेवून सशक्त होऊन धर्मकार्य करायला हवे ! – जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी, कांची कामकोटी पीठ

धर्माच्या रक्षणासाठी प्रथम शास्त्रांचे रक्षण करणे आवश्यक आहे. प्राचीन परंपरागत शास्त्राचे रक्षण करायला हवे. प्रत्येक घरापर्यंत धर्माचे ज्ञान पोचवायला हवे. भगवंतावर श्रद्धा ठेवून सशक्त होऊन धर्मकार्य करायला हवे, आवाहन कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी केले. माटुंगा येथील श्री शंकर मठामध्ये महाकुंभाभिषेकाच्या कार्यक्रमासाठी मुंबईमध्ये आले असतांना ८ एप्रिल या दिवशी भाविकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील आवाहन केले.

मार्गदर्शन ऐकतांना भाविक

ते म्हणाले, ‘‘वेद, शास्त्र आणि संस्कार आपल्यासाठी प्रमुख आहेत. शास्त्रांच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे. सध्या देशात राज्यघटना अस्तित्वात आहे, तरीही न्यायव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या ज्ञानसंस्थांचे जतन करणे आणि शास्त्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’’

हिंदूसंघटन आणि धर्मरक्षण यांसाठी ब्राह्मणांनी वेळ देणे आवश्यक !

वेदांमुळे समाजाला दिशा मिळते. वैदिक परंपरेला पुढे नेऊन तिचे रक्षण करणे हे ब्राह्मणांचे प्रथम कर्तव्य आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे होते. ब्राह्मण समाजही यामध्ये पुढे होता. सध्या विद्यादानासह विविध क्षेत्रांत ब्राह्मण समाज कार्यरत आहे. प्रपंचासह धर्मकार्यासाठीही वेळ देणे आवश्यक आणि त्यासाठी ब्राह्मणांनी सक्षम व्हावे. हिंदूंचे संघटन आणि धर्मरक्षण यांसाठी ब्राह्मणांनी वेळ देणे आवश्यक आहे. भारतभूमीच्या रक्षणासाठी काम करणे आणि ते काम करणार्‍यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, असे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी म्हणाले.

Leave a Comment