राज्यस्तरीय काव्यसंमेलनात सनातन संस्थेचे मुंबईतील साधक रोहन पातेने यांचा ‘काव्यरत्न पुरस्कारा’ने सन्मान !

पुरस्कारासह रोहन पातेने

मुंबई – दादर येथील सांस्कृतिक सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या ‘राज्यस्तरीय त्रिवेणी काव्यसंमेलना’त सनातन संस्थेचे मुंबई येथील साधक श्री. रोहन रवींद्र पातेने यांचा ‘काव्यरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘फुंकर’ या स्वरचित काव्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. ‘काव्य निवड’ आणि ‘काव्य सादरीकरण’ या दोन्हींसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. पदक आणि मानपत्र असे याचे स्वरूप आहे. ‘विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा’ या संस्थेद्वारे या काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात राज्यभरातून ७० हून अधिक जण सहभागी झाले होते.

कवीवर्य अशोक नायगांवकर, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, ज्येष्ठ लेखक चंद्रशेखर गोखले, तसेच विशेष पाहुणे म्हणून डॉ. जयलक्ष्मी सानिपिना राव या संमेलनाला उपस्थित होत्या. महाराष्ट्रातून अनेक कवी या सोहळ्याला उपस्थित होते.

श्री. रोहन पातेने मागील १६ वर्षे ‘विज्ञापन’ संस्थेमध्ये कला दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत, कलात्मक विज्ञापन बनवणे, संहिता लिहिणे यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. ‘कवी’ म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रथमच प्राप्त झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळेच पुरस्कार प्राप्त झाल्याची भावना त्यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

‘विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा’यांच्याकडून गौरवोद्गार !

‘आपण स्वरचित कविता उत्तम प्रकारे सादर केली. मराठी भाषेच्या या वैश्विक चळवळीत आपण असेच मौलिक योगदान देत रहाल आणि आपल्या या अभिजात मराठी भोषला संपूर्ण विश्वात जनमनाची लोकभाषा अन् ज्ञानभाषा बनवण्यासाठी कायम अथक परिश्रम घ्याल, असा विश्वास वाटतो’, या शब्दांत ‘विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा’द्वारे श्री. रोहन पातेने यांचा गौरव करण्यात आला.

Leave a Comment