‘सांगली कृष्णामाई महोत्सव २०२६’च्या उत्सवात महिला सक्षमीकरण या विषयावर सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांचे प्रवचन

श्रीमती मधुरा तोफखाने

सांगली, २ फेब्रुवारी (वार्ता.) – महिलांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने मुलांना ‘आई’ म्हणण्याचा आग्रह धरून आजच सक्षमीकरणाच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले पाहिजे. ‘आई’ हा शब्द अर्थपूर्ण आहे. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर म्हणजेच आत्म्याचा ईश्वरापर्यंतचा प्रवास जिच्यामुळे पूर्णत्वास जातो ती म्हणजे ‘आई’ आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांनी येथे केले. ३१ जानेवारी या दिवशी येथील ‘सांगली कृष्णामाई महोत्सव २०२६’च्या उत्सवात ‘कृष्णामाई-गंगामाई महिला सक्षमीकरण’ या विषयावर त्या बोलत होत्या.

सनातनचे दिवंगत साधक समीर गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच हे व्याख्यान आयोजित केले होते !

‘सांगली कृष्णामाई महोत्सव २०२६’ च्या उत्सवात विषय मांडण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे सनातन संस्थेचे दिवंगत साधक समीर गायकवाड हे हयात असतांना त्यांनी आयोजन समितीशी संवाद साधून कार्यक्रम आयोजित केला होता. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. त्यांनी आयोजित केलेले हे शेवटचे व्याख्यान ठरले.

श्रीमती मधुरा तोफखाने म्हणाल्या की, आदर्श माता जिजाऊ होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले आहेत. गार्गी, मैत्रेयी अशा आदर्श विदुषी होऊन गेल्या की, ज्यांनी अनेक ज्ञानी तपस्वींना स्वत:च्या विद्वत्तेने निरुत्तर केले. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. हरिपाठ, शुभंकरोतीचे संस्कार नातवंडावर आजी आजोबांकडून होत होते. आज आजी-आजोबा सोडा आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात होत आहे. भारतीय हिंदु संस्कृतीनुसार कुंकू लावण्याचे महत्त्व, हातात बांगड्या घालण्याचे महत्त्व या रूढी परंपरामागील अध्यात्मशास्त्र आणि त्याचा महिला सक्षमीकरणाशी कसा संबंध आहे ? हे त्यांनी विविध दाखले देऊन स्पष्ट केले.

जागतिकीकरणाकडे तथा आधुनिकीकरणाकडे जातांना धर्माचरणाची आवश्यकता आणि त्यातून आपले रक्षण कसे होते अर्थात ‘धर्मो रक्षती रक्षिता:’ म्हणजे जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म रक्षण करतो. यातूनच आपले सक्षमीकरण तथा सबलीकरण कसे होते ? हे त्यांनी महिलांच्या विषयी घडणार्‍या घटनांची सांगड घालून महिलांच्या लक्षात आणून दिले.

व्याख्यान झाल्यावर महिला उठून टाळ्या वाजवत होत्या. त्या वेळी व्यासपिठासमोर येऊन पोटतिडकीने नऊवारी साडीतील आणि कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेली एक महिला येऊन म्हणाली की, तुमचा विषय पुष्कळ चांगला आहे. तुम्ही अजून याचा पुष्कळ प्रसार करायला हवा. नंतर त्या महिलेचा शोध घेतला असता त्या कुठेच दिसल्या नाहीत.

Leave a Comment