‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्या वेळी कृतज्ञता म्हणून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

महोत्सवात शिकायला मिळालेली सूत्रे
१. ‘मी महोत्सवासाठी येणार आहे’, असे पुण्यातील साधकांना सांगितले. तेव्हा सनातनच्या साधकांनी मला सर्व माहिती आत्मीयतेने सांगितली, उदा. बसची निघाण्याची वेळ आणि ठिकाण, मला नेण्यास कोण येणार ? १६.५.२०२५ या दिवशी आम्ही पुण्याहून बसने निघाल्यावर मला गाडीतील सर्व साधकांची ओळख करून देण्यात आली. साधकांनी प्रवास, जेवण इत्यादींचे चांगले नियोजन केले. त्यामुळे संपूर्ण प्रवासात कोठेही गडबड-गोंधळ झाला नाही.

२. आदरणीय श्री. पराग गोखले आणि श्री. सुनील घनवट यांनी प्रत्येकाची आपुलकीने चौकशी केली. ही गोष्ट माझ्या मनाला भावली.
३. सर्व साधक आणि कार्यकर्ते सर्वांची मनापासून, आनंदाने अन् अहंकाररहित सेवा करत होते. परमपूज्य गुरुदेवांनी ‘साधकांवर उच्च प्रतीचे संस्कार केले आहेत. हिंदु राष्ट्र्र पेलण्यासाठी साधकांचे विचार, त्यांचे खांदे आणि त्यांचे आचार सशक्त केले आहेत’, याची मला निश्चिती झाली.
४. अधिवेशन पर्वातील ३ दिवसांत सर्व साधकांना बाहेरच्या मायाजाल जगताचा संपूर्ण विसर पडला आणि ते हिंदु राष्ट्राच्या वातावरणात समरस झाले होते. कोणतेही कार्य करण्यास कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांची आवश्यकता असते. या सर्व योगांचा सुरेख संगम महोत्सवात पहायला मिळाला.
मी सर्व साधक आणि कार्यकर्ते यांना मनापासून वंदन करतो. आपण मला या महोत्सवात सहभागी करून घेतले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
– श्री. विद्याधर जयराम नारगोलकर
हिंदूंना प्रेरणा देणारे कार्यक्रम !

१. कार्यक्रमस्थळी ३ अतिशय भव्यदिव्य वातानुकूलित मंडपांची व्यवस्था होती. तेथे २५ ते ३० मोठे ‘डिजिटल स्क्रीन्स’ (व्यासपिठावरील कार्यक्रम पहाण्यासाठी लावलेले पडदे) लावल्या असल्यामुळे सर्वांना कार्यक्रमाचा आनंद घेता आला. देश-विदेशातून अनुमाने २५ सहस्र लोक उपस्थित होते.
२. १७.५.२०२५ या दिवशी महोत्सवाचा आरंभ शंखनाद आणि वेदमंत्रांचे पठण यांनी झाला, तेव्हा वातावरण मंगलमय झाले. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे व्यासपिठावर आगमन झाले, तेव्हा ‘सर्व मंडप प्रकाशमय झाला आहे’, असे मला जाणवले.
३. ३ दिवस मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या विचारसमिधा महोत्सवाच्या यज्ञात अर्पण केल्या. त्यांचे विचार ऐकतांना सर्व उपस्थितांच्या शरिरांवर रोमांच उभे राहिले आणि उत्स्फूर्तपणे दिल्या जाणार्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.
४. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, शस्त्रांचे खेळ, गोवा कला अकादमीचे कलादर्शन इत्यादी माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख सर्वांना झाली.
५. आदरणीय गुरुदेवांच्या हस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे आरोहण झाले. तो प्रसंग फारच सुंदर होता आणि सर्वांच्या हृदयावर कोरला गेला. तो भक्तीमार्गातील अत्युच्च क्षण होता.
६. शेवटच्या दिवशी महाधन्वन्तरि याग केला. तेव्हा ब्रह्मवृंदांनी सर्वांना यज्ञाचे मंत्र म्हणायला लावून यागात सहभागी करून घेतले. गुरुदेव यागाच्या वेळी उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांना आशीर्वादही दिला.
महोत्सवातील प्रदर्शने
मुख्य मंडपाच्या बाहेरील बाजूस शस्त्रांची माहिती देणारे, आध्यात्मिक आणि धार्मिक कक्ष होते. ते पहाण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
श्रीकृष्णापर्णमस्तु, जय जय रघुवीर समर्थ ।
– आपला चरण रज,
श्री. विद्याधर जयराम नारगोलकर (स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, महामंत्री आणि पुणे सार्वजनिक सभा, पुणे अध्यक्ष)
महोत्सवात आलेल्या अनुभूती

१. माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण, म्हणजे मी परम पूज्य गुरुदेवांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या समवेत एक छायाचित्र काढून घेण्याची विनंती केली. त्यांनी ती लगेच मान्य केली. त्यानंतर मी थोडा दूर गेलो. तेव्हा त्यांनी मला हाका मारून परत बोलावले आणि ते मला म्हणाले, ‘‘नारगोलकर, तुम्ही उभे आहात. मला तुमच्या समवेत उभे राहून छायाचित्र काढायचे आहे.’’ तेव्हा मी फारच संकोचलो आणि म्हणालो, ‘‘अहो, तुम्ही उभे राहू नका.’’ तरीही ते माझा हात हातात घेऊन उभे राहिले आणि एक छायाचित्र काढले. हा सौभाग्याचा क्षण मी अनुभवला. ती श्रीकृष्णाने माझ्यावर केलेली कृपा होती.
२. पूर्वी मी रामनाथी (गोवा) येथील ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला जात असे. तेव्हा अधिवेशनाला ३०० – ४०० हिंदू उपस्थिती असत; पण या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व प्रकारच्या लोकांना निःस्वार्स्थ बुद्धीने हिंदु राष्ट्रासाठी एकत्र आणले आणि वटवृक्ष उभा केला. आम्ही गुरुदेवांचे ऋणी आहोत.
३. उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें ।
निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ।। – दासबोध, दशक १९, समास ६, ओवी १५
अर्थ : जे जे उत्कट आणि भव्य असेल, ते घ्यावे. जे मिळमिळीत असेल, ते सर्व टाकावे आणि आपल्या निःस्पृहपणाने जगात प्रसिद्धी मिळवावी.
समर्थांनी दासबोधात सांगितलेले सूत्र ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मधून पहाण्यास आणि अनुभवण्यास मिळाले.
– श्री. विद्याधर जयराम नारगोलकर (स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, महामंत्री आणि पुणे सार्वजनिक सभा, पुणे अध्यक्ष)
८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर