सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

 

मुंबई : गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि गुरुसेवेसाठी संकल्प करण्याचा दिवस ! भारताचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! ही दैवी परंपरा केवळ गुरु आणि शिष्य, अध्यात्म आणि मोक्ष यांच्यापुरती मर्यादित नाही, तर विश्वकल्याणासाठी प्रवाहित आहे. गुरु-शिष्य परंपरेने केवळ शिष्याच्या जीवनाचे कल्याण केले आहे, असे नाही, तर धर्मसंस्थापनेचे आणि राष्ट्ररक्षणाचेही कार्य केले आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून प्रतिवर्षी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्र पटीने कार्यरत असल्यामुळे या दिवशी महोत्सवाच्या माध्यमातून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

या वेळी १० जुलै या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये मराठी भाषेत ६४ ठिकाणी, हिंदी भाषेत ८, तामिळ आणि मल्ल्याळम् भाषेत प्रत्येकी २, तर गुजराती भाषेत एका ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी साधक चैतन्यात न्हाऊन निघाले. गुरूंची कृपा अनुभवून ते भवविभोर झाले.

गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले औक्षण !

रामनाथी (गोवा) : महर्षींनी नाडीपट्टीत केलेल्या उल्लेखानुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच १० जुलै २०२५ या दिवशी त्यांचे औक्षण केले. या औक्षणाच्या वेळी सनातन पुरोहित पाठशाळेतील श्री. अमर जोशी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी वेदमंत्रपठण केले.

काही ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शनानुसार साधना करणारे गुणवंत विद्यार्थी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असणारे हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी यांचा सत्कार करण्यात आला. सातारा येथे ब्रिगेडीयर हेमंत महाजन (निवृत्त), तर कोल्हापूर येथे ‘असत्यमेव जयते’ या पुस्तकाचे लेखक श्री. अभिजित जोग यांसह विविध मान्यवरांनी ठिकठिकाणी मार्गदर्शन केले.

महोत्सवाचे स्वरूप !

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावरील प्रेरणादायी व्हिडिओचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर आध्यात्मिक उन्नती केलेल्या सनातनच्या साधकांनी अनुभव कथन केले, तसेच संस्थेच्या वतीने ‘राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील राष्ट्रीय कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन झाले. सध्याच्या काळात प्रत्येकाला किमान स्वत:चे रक्षण करता यावे, यासाठी या महोत्सवात स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

विशेष

१. यंदाच्या महोत्सवाचे विशेष म्हणजे रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला.

२. महोत्सवात अनेक ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहून अनेकांनी ‘इतिहासाची उजळणी झाली’, असे सांगितले.
विविध विषयांवर ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन
धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथ आणि फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव

देश-विदेशांतील सहस्रो भाविकांसाठी मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्ल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले.

प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक ! – सनातन संस्था

विविध ठिकाणी झालेल्या महोत्सवांमध्ये सनातन संस्थेचे वक्ते म्हणाले,

‘‘भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमणे होत आहेत, ती केवळ विस्तारवादासाठी नाहीत, तर हिंदु धर्माला संपवण्यासाठी होत आहेत. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी ‘देश’ विचारून नाही, तर ‘धर्म’ विचारून गोळ्या झाडल्या. आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहासही हेच सांगतो की, जेथे धर्मांध माजले, तेथे त्यांनी हिंदूंना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले. आज आपण युद्धसदृश अवस्थेत आहोत. हे केवळ सीमांवरील लढाईसारखे वाटत असले, तरी खरे युद्ध हे धर्मयुद्धच आहे. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्‍यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणार्‍यांची संख्या अन् शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्‍यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे.’’

Leave a Comment