खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ऐतिहासिक, भव्य-दिव्य अन् शिस्तबद्ध आयोजन !

डावीकडून सर्वश्री राज शर्मा, जयेश थळी, रमेश शिंदे, अभय वर्तक, नारायण नावती आणि जयंत मिरिंगकर

फोंडा, (गोवा) – १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात पार पडलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा देशस्तरावर स्तरावर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतना निर्माण करणारा एक अपूर्व सोहळा ठरला. या ३ दिवसांच्या ऐतिहासिक महोत्सवाने ‘न भूतो न भविष्यति’ असा ठसा उमटवला असून खर्‍या अर्थाने ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद झाला असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सांगितले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची समारोपीय पत्रकार परिषद २७ मे या दिवशी पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. वर्तक पुढे म्हणाले,

‘‘गोव्याच्या इतिहासात भारतासह २३ देशांतील ३० सहस्रांहून अधिक लोकांचा एवढा भव्य, नेत्रदीपक आणि नियोजनबद्धपणे झालेला एकमेव कार्यक्रम होता, असे मत अनेक विचारवंत, प्राध्यापक, उद्योजक, लेखक, संपादक, केंद्रीय मंत्री आणि प्रतिष्ठित यांनी व्यक्त केली, तसेच प्रतिवर्षी अशा प्रकारच्या शंखनाद महोत्सवाचे आयोजन करावे, अशी मागणीही समाजातून येऊ लागली आहे.’’

फोंडा येथील ‘पॅन अरोमा’ या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला माजी निवडणूक आयुक्त श्री. नारायण नावती, उद्योजक श्री. मनोज गावकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, उद्योजक आणि समाजसेवक श्री. जयंत मिरिंगकर, ब्राह्मण महासंघाचे श्री. राज शर्मा आणि गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी हे उपस्थित होते.

श्री. अभय विजय वर्तक

१. महोत्सवाच्या उत्तरार्धात झालेला शतचंडी यज्ञ हा विशेषतः ‘पाकिस्तानसमवेतच्या युद्धात भारतीय सैन्याचा विजय व्हावा’, यासाठी करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सैन्यदलासाठी १ लाख ११ सहस्र रुपयांची रक्कम गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

२. या महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते ४ मान्यवरांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ पुरस्कार आणि २१ मान्यवरांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले.\

३. या महोत्सवासाठी सहस्रो भाविक गोव्याबाहेरून आले. त्यांनी गोव्यातील मंदिरे, ऐतिहासिक स्थळे यांना भेटी दिल्याने गोव्यातील ‘स्पिरिच्युअल टूरिझम्’ला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. देश-विदेशांतून आलेल्या मान्यवरांवर गोवा ही ‘भोगभूमी’ नसून ती ‘योगभूमी’ आहे, हे ठसवण्यात या महोत्सवामुळे मोठे यश मिळाले, असे निश्चितपणे म्हणता येईल.

४. या भव्य महोत्सवाची चर्चा देशभर पसरली असून ‘शंखनाद’ ही संकल्पना आता देशभरात राष्ट्रनिर्माणाची चेतना निर्माण करत आहे. एकूणच या महोत्सवातून ‘राष्ट्रीय एकात्मता’, ‘भारतीयत्वाची भावना’, ‘आध्यात्मिक ऊर्जा’, ‘सांस्कृतिक चेतना’ आणि ‘शौर्य’ यांचा प्रभावी जागर झाला.

५. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात गोवा शासन, पोलीस प्रशासन, गोवा इंजिनीयरिंग कॉलेज, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामस्थ यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे पत्रकार, उद्योजक आणि सेवाभावी संस्था यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले.

पत्रकार परिषदेत अन्य मान्यवरांनीही संबोधित केले.

सनातन राष्ट्राविषयी मोठ्या प्रमाणात जागृती ! – मनोज गावकर

फोंडा येथील उद्योजक तथा महोत्सव आयोजन समितीचे एक सदस्य श्री. मनोज गावकर या वेळी म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे सनातन राष्ट्राविषयी मोठ्या प्रमाणात जागृती झाली. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आणि समस्त हिंदु संघटित होऊ शकतात, हे महोत्सवातून दिसून आले. ही चळवळ पुढे अशीच चालू ठेवावी, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे.’’

Leave a Comment