सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून कोल्हापूर, तसेच सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना भोजन अन् वैद्यकीय साहाय्य !

साहाय्याविषयी पूरग्रस्तांकडून आभार व्यक्त

  • भीषण आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणा आणि साधना वाढवून ईश्‍वराची कृपा संपादन करा !

गेले काही दिवस महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांत पुष्कळ पाऊस पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवली आहे. या पुरात सहस्रो लोक अडकून पडले आहेत, तर कोट्यवधी रुपयांची हानीही झाली आहे. पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचाही मोठा सहभाग आहे. या संघटनांकडून अन्नदान, धान्य, कपडे, पिण्याचे पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंसह औषधे आणि अन्य वैद्यकीय साहाय्यही केले जात आहे. या साहाय्यासह सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून पूरग्रस्तांना साधना, तसेच नामजप यांचेही महत्त्व सांगण्यात येत आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी (तालुका हातकणंगले)
गावातून विस्थापित झालेल्यांना भोजन आणि वैद्यकीय साहाय्य !

सांगली येथे पूरग्रस्तांना साहाय्य करतांना सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कोल्हापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑगस्ट या दिवशी इंगळी गावातून विस्थापित झालेल्या नागरिकांना साहाय्य पुरवण्यात आले. यात इंगळी, माळभाग आणि रामनगर या ठिकाणी भोजनाची २०० पाकिटे देण्यात आली, तसेच २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी तपासणी करून औषधे देण्यात आली. ही तपासणी सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी केली.

इंगळी येथे पूरग्रस्तांची तपासणी करतांना आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे

१२ ऑगस्ट या दिवशी इंगळी गावातील शिरोळे मळा येथील श्री. दत्ता शिरोळे यांच्या घरी, रामनगर या भागात, माळभाग येथील राजाराम माने यांच्या घरी, तसेच अन्य एक ठिकाणी, अशा चार ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पूरग्रस्तांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. याचा लाभ २५० हून अधिक पूरग्रस्तांनी घेतला. ही तपासणी करण्यात कागल येथील डॉ. आशुतोष विभुते आणि डॉ. मुकुंद सादिगले यांचे सहकार्य लाभले. या सेवेत हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, संतोष सणगर आणि प्रथमेश गावडे सहभागी होते.

 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या वतीने पलूस तालुक्यात पूरग्रस्तांना साहाय्य

पूरग्रस्तांना साहाय्य करतांना सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

तासगाव – पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी येथील धनगाव येथून आलेले पूरग्रस्त, निमणी येथे माळवाडी येथून आलेले पूरग्रस्त, बुर्ली गाव आणि चौगुले वस्ती येथील पूरग्रस्त अशा ७०० हून अधिक पूरग्रस्तांना हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने साहाय्य करण्यात आले. या पूरग्रस्तांना बिस्कीट पुडे, भडंग, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. यात सर्वश्री शंकर राजमाने, दीपक घोडके, राजेंद्र माळी, किरण पोळ, तसेच धर्मप्रेमी सर्वश्री अजित पाटील, संतोष पाटील, शंकर पाटील, भगवान गुरव, शशीकांत कोळी आणि सौ. अनिता कोळी यांसह अन्य कार्यकर्ते अन् साधक यांचा सहभाग होता.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी
नि:स्वार्थीपणे केलेले साहाय्य कौतुकास्पद ! – विकास खोत

इंगळी हे गाव अनुमाने ८ सहस्र लोकांचे असून हे गाव १०० टक्के पूरग्रस्त झाले होते.  हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक येथे पोचण्यापूर्वी अन्य कोणाकडून तेथे अपेक्षित साहाय्य पोचले नसल्याचे पूरग्रस्तांकडून समजले. हिंदु जनजागृती समितीने ९, १०, ११ आणि १२ ऑगस्ट असे चार दिवस साहाय्यता अभियान राबवले. हे साहाय्य केल्याविषयी पूरग्रस्तांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आणि आभार मानण्यात आले. हे अभियान राबवल्यावर येथील पूरग्रस्त श्री. विकास खोत म्हणाले, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांच्या कार्याविषयी आम्ही केवळ ऐकून होतो. पूरग्रस्तांना तुम्ही केलेले साहाय्य कौतुकास्पद आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment