सण आणि धार्मिक विधींच्या वेळी वापरायचे कपडे

सण आणि धार्मिक विधींच्या वेळी हिंदु धर्मात सांगितलेले सात्त्विक कपडे परिधान केल्यास ईश्‍वरी चैतन्य जास्तीतजास्त ग्रहण होते.

१. सण आणि धार्मिक विधींच्या वेळी हिंदु धर्मात सांगितलेली वस्त्रे परिधान केल्याने होणारे लाभ

अ. हिंदु धर्मात सांगितलेली वस्त्रे परिधान केल्याने त्यांतून शिव आणि शक्‍ती यांचे तत्त्व जागृत होणे

‘हिंदु धर्माप्रमाणे स्त्री अन् पुरुष परिधान करत असलेल्या वस्त्रांची रचना देवतांनी केलेली असून ती शिव आणि शक्‍ती यांची तत्त्वे प्रगट करणारी आहे. स्त्रियांच्या वस्त्रांतून म्हणजे साडीतून शक्‍तीतत्त्व जागृत होते आणि पुरुषांच्या वस्त्रांतून शिवतत्त्व जागृत होते. शास्त्राप्रमाणे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला आपल्या खर्‍या स्वरूपाची ओळख होऊन ते अनुभवता येते, तसेच आपली आध्यात्मिक शक्‍ती व्यय (खर्च) न होता ती वाचते. देवतांनी निर्मिलेले वस्त्र घातल्याने स्थूलदेह आणि मनोदेह यांसाठी लागणारी शक्‍ती आपोआप मिळते.’ – एक अज्ञात शक्‍ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून, १२.१२.२००७, सकाळी ११.३०)

आ. हिंदु धर्मात सांगितलेली वस्त्रे परिधान केल्याने ईश्‍वरी चैतन्य आणि देवतांची तत्त्वे आकृष्ट होणे

याची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

आ १. अंगरखा (सदरा) आणि पायजमा

‘अंगरखा आणि पायजमा घातल्याने शरिराभोवती लंबगोलाकार (दिव्यातील ज्योतीसारख्या) कवचाची निर्मिती होते. त्यामुळे जिवाला वायूमंडलातून ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करणे आणि रज-तमावर मात करणे सोपे जाते.

आ २. सोवळे

अंगरखा आणि पायजमा यांपेक्षाही सोवळे जास्त सात्त्विक असल्याने ते परिधान केल्यास जिवाच्या देहाभोवती सूक्ष्म गोलाकार कवचाची निर्मिती होऊन त्याला देवतेचा तारक-मारक अन् सगुण निर्गुण अशी दोन्ही तत्त्वे ग्रहण करणे सोपे जाते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १७.६.२००७, रात्री ८.५९)

२. वस्त्रात सात्त्विकता आकृष्ट अन् प्रक्षेपित होणे
हे वस्त्राचा प्रकार आणि वस्त्र परिधान करण्याची पद्धत यांवर अवलंबून असणे

वस्त्र आणि ते परिधान करण्याची पद्धत

वस्त्रात सात्त्विकता ग्रहण
आणि प्रक्षेपित होण्याचे प्रमाण

१. नऊवारी साडी आणि धोतर
सर्वांत जास्त
२. सहावारी साडी
अ. डाव्या खांद्यावरून पदर घेणे जास्त
आ. उजव्या खांद्यावरून पदर घेणे अल्प
३. लुंगी
अल्प
४. सलवार-कुडता
सहावारी साडीपेक्षा अल्प
अ. ओढणी दोन्ही खांद्यांवरून घेणे जास्त
आ. ओढणी एका खांद्यावरून घेणे अल्प

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, सायं. ७.१५)

नऊवारी साडी आणि धोतर या हिंदु संस्कृतीतील पारंपरिक कपड्यांचे महत्त्व यावरून लक्षात येते. हिंदु संस्कृती ही चैतन्यमय संस्कृती कशी आहे, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

३. धार्मिक विधींच्या आणि सणासुदीच्या वेळी
हिंदु धर्मात सांगितलेले सात्त्विक वस्त्र परिधान केल्याने ईश्‍वरी चैतन्य जास्तीतजास्त ग्रहण होणे

‘हिंदु धर्मामध्ये वर्षभरात अनेक सण, व्रते आणि उत्सव असतात. तसेच विविध पूजा आणि मुंज, विवाह यांसारखे धार्मिक विधी केले जातात. रामनवमी, जन्माष्टमी, हनुमान जयंती, संतांचे प्रगटदिन इत्यादी दिवशी त्या त्या देवता आणि संत यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. धार्मिक विधींच्या वेळी आपण पूजास्थानी देवतांना आवाहन करत असल्यामुळे देवता तिथे उपस्थित असतात. थोडक्यात त्या त्या दिवशी ईश्‍वरी चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्या दिवशी हिंदु धर्मात सांगितलेली सात्त्विक वस्त्रे परिधान केल्यास त्या चैतन्याचा आपल्याला जास्त लाभ होऊ शकतो, उदा. स्त्रियांनी सहावारी अथवा नऊवारी जरीकाठाची साडी नेसणे आणि पुरुषांनी धोतर-उपरणे अथवा अंगरखा-पायजमा घालणे जास्त योग्य आहे.’ – सौ. राजश्री खोल्लम, पुणे

४. सण, शुभदिन अन् धार्मिक विधी असलेल्या दिवशी
नवीन किंवा कौशेय (रेशमी) वस्त्रे आणि विविध अलंकार धारण केल्याने होणारे लाभ

अ. देवतांचा आशीर्वाद मिळणे

‘सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी काही वेळा देवता सूक्ष्मातून भूतलावर येतात. त्या दिवशी वस्त्रालंकाराने सुशोभित होणे, हे त्यांच्या आगमनाचे स्वागत करण्यासारखेच आहे. त्यामुळे देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि आपल्याला देवतांच्या लहरी ग्रहण करता येतात.

आ. देवतांच्या तत्त्वलहरींचा वर्षभर लाभ होणे

सणाच्या दिवशी नवीन किंवा कौशेय वस्त्रे परिधान केल्याने देवतांचे तत्त्व त्या वस्त्रांमध्ये जास्तीतजास्त प्रमाणात आकृष्ट होऊन वस्त्रे सात्त्विक होतात. वस्त्रांत आकृष्ट झालेल्या देवतांच्या तत्त्वलहरी वस्त्रांमध्ये दीर्घकाळ टिकून रहातात आणि ही वस्त्रे वर्षभर परिधान करणार्‍याला देवतांच्या तत्त्वलहरींचा वर्षभर लाभ होतो. अशी वस्त्रे वेळोवेळी धुतल्यानंतरही देवतांचे तत्त्व त्यांमध्ये टिकून रहाते.

इ. देवतांच्या तत्त्वलहरींमुळे देहांची शुद्धी होणे

देवतांच्या तत्त्व-लहरी जिवाचा स्थूलदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांकडे अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट झाल्यामुळे त्या देहांची शुद्धी होऊन ते देह सात्त्विक बनतात.’

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ८.१५)

ई. वाईट शक्‍तींच्या आक्रमणांपासून जिवाचे संरक्षण होणे

वस्त्रांमुळे वाईट शक्‍तींपासून रक्षण होते.

१. अपवित्र आणि नग्न राहू नये, नाहीतर वाईट शक्‍तींचा त्रास होऊ शकणे

शक्‍तिविषये न मुहूर्तमप्यप्रयतः स्यात् नग्नो वा । – आपस्तम्बधर्मसूत्र, प्रश्न १, पटल ५, काण्डिका १५, सूत्र ८, ९

अर्थ : शक्य असेल तर एक क्षणही अपवित्र आणि नग्न राहू नये.

२. बाळांना वस्त्रात गुंडाळून ठेवणे

‘बाळांना वाईट शक्‍तींचा त्रास होऊ नये; म्हणून त्यांना नग्न न ठेवता वस्त्रात गुंडाळून ठेवले जाते.’ – ईश्‍वर
(कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, सायं. ७.०५)

५. हिंदु धर्मात सांगितलेली वस्त्रे परिधान केल्याने वाईट शक्‍तींपासून रक्षण होणे. साडीच्या निर्‍यांतून येणारा शक्‍तीप्रवाह भूमीच्या दिशेने गेल्यामुळे स्त्रियांचे पाताळातील वाईट शक्‍तींपासून रक्षण होणे

‘साडीतून प्रक्षेपित होणार्‍या शक्‍तीतत्त्वाचे वातावरणातील वाईट शक्‍तींशी नकळत युद्ध होते. त्यामुळे व्यक्‍तीचे मन आणि बुद्धी यांवर असलेला वाईट शक्‍तींचा प्रभाव न्यून होतो. साडीच्या प्रत्येक निरीतून प्रक्षेपित होणार्‍या पांढर्‍या प्रकाशाचा झोत तलवारीप्रमाणे असतो. निर्‍यांतून येणारा शक्‍तीप्रवाह भूमीच्या दिशेने गेल्यामुळे पाताळातील वाईट शक्‍तींपासूनही स्त्रीचे रक्षण होते.’ – एक अज्ञात शक्‍ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून, ९.६.२००७)

६. सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी
नवीन किंवा कौशेय वस्त्रे आणि अलंकार धारण केल्याने वाईट शक्‍तींपासून रक्षण होणे

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

कौशेय (रेशमी) वस्त्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

कौशेय (रेशमी) वस्त्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

‘सण; यज्ञ; मुंज, विवाह, वास्तूशांत यांसारखे धार्मिक विधी यांच्या वेळी देवता आणि आसुरी शक्‍ती यांचे सूक्ष्म-युद्ध अनुक्रमे ब्रह्मांड, वायूमंडल आणि वास्तू या ठिकाणी होत असते. त्यामुळे सण साजरा करणार्‍या आणि धार्मिक विधींच्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या व्यक्‍ती यांच्यावर या सूक्ष्म-युद्धाचा परिणाम होऊन त्यांना वाईट शक्‍तींचा त्रास होऊ शकतो. विविध सुवर्णालंकार आणि नवीन किंवा कौशेय वस्त्रे धारण केल्यामुळे ते धारण करणार्‍या व्यक्‍तीच्या भोवती ईश्‍वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षकवलय निर्माण होऊन व्यक्‍तीची सात्त्विकता वाढते अन् तिचे वाईट शक्‍तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होते.’ – ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ८.१५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment