सनातन संस्थेचे स्फूर्तीस्रोत प.पू. रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) !

प.पू. रामानंद महाराजांच्या ‘अज्ञातवासा’चा अर्थ !

‘प.पू. रामानंद महाराज कुठे जाणार असले, तर ते सर्वांनाच त्याची पूर्वसूचना देतात; मात्र ऑगस्ट २०१० मध्ये त्यांनी कोणाला त्यांच्या दौर्‍याचा पत्ता लागू दिला नाही. त्यांनी इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात निरोप ठेवला, ‘मी अज्ञातवासात जात आहे.’त्यांच्याबरोबर असलेल्यांनाही त्यांनी ‘ते कोठे जात आहेत, हे कोणाला सांगायचे नाही’, असे सांगितले होते. दौरा संपून प.पू. महाराज इंदूरला परतल्यावर ९.९.२०१० पासून त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तरीही त्यांनी रुग्णालयात जायला नकार दिला. ‘उपचार आश्रमातच करा’, असे त्यांनी सांगितले. ११.३.२०१४ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. त्याच्यानंतर आम्हाला उलगडा झाला की, ते ‘अज्ञातवासात जातो’, असे का सांगत होते ?’ – डॉ. आठवले (११.३.२०१४)

प.पू. रामानंद महाराज

प.पू. रामानंद महाराज

प.पू. रामानंद महाराज (परिचय)

शिरोभाग

‘मंगलातझाले मंगल, नाथ गेले सदन सोडून ।’ इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) यांचे ११.३.२०१४ या दिवशी महानिर्वाण झाले. संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) म्हणजे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान, तर प.पू. रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) म्हणजे सनातनचे स्फूर्तीस्थान ! प.पू. बाबांचे भक्त आणि सनातनचे साधक यांना प.पू. दादांनी भरभरून प्रेम दिले. बाबांच्या निर्वाणानंतर प.पू. दादा सर्वांचे पालक झाले ! आज हा आधारवृक्ष हरपला ! त्यांची प्राणज्योत मावळली असली, तरी आत्मज्योत आम्हाला गुरुचरणी नेईलच, याची सर्वांना निश्चिती आहे. त्यांच्या चरणी वाहिलेली ही सुमनाजंली !

संतांविषयी सांगायचे झाले, तर ‘वर्णू किती महती’, असा प्रश्न त्यांच्या भक्तांना पडतोच. एकदा डॉ. (सौ.) मंगला वेरेकर यांनी प.पू. दादांविषयी पुढील ओळी लिहिल्या.

प.पू. रामानंद महाराज गुरु-शिष्य दोन्हींचे प्रतीक ।
सामावून नाही घेऊ शकले माझ्या अपुर्‍या शब्दांत ।।

१. व्यावहारिक जीवन

प.पू. रामानंद महाराज यांचे व्यावहारिक नाव श्री. रामचंद्र लक्ष्मण निरगुडकर. ते लहानपणापासून स्वभावाने शांत, नम्र, प्रेमळ आणि मितभाषी होते. राष्ट्रप्रेमी असल्यामुळे १९४८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होण्यासाठी त्यांनी शासकीय नोकरी सोडली. १९४८ ते १९६४ त्यांनी संघाचे पुष्कळ कार्य केले. त्यांचे बालपणातील सहकारी श्री. बाबा यावलकर यांनी सांगितलेले त्यांच्याविषयीचे काही प्रसंग पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ. कबड्डीत तरबेज, सर्व जबाबदार्‍या संभाळून
प्रथम वर्गात उत्तीर्ण होणे आणि खाण्याची अन् दुसर्‍यांना
खायला घालण्याची आवड, असे होते प.पू. रामानंद महाराजांचे बालपण

‘रामजी (प.पू. रामानंद महाराज) कबड्डी खेळण्यात असा काही तरबेज होता की, तो ज्या गटाकडून (टीमकडून) खेळत असेल, ती जिंकलीच म्हणून समजावे ! १९४८ मध्ये संघशाखांवर बंदी आली, तरीही तिथे कबड्डीचे सामने सुरू असायचे. त्या निमित्ताने एकत्रीकरण चालू राहिले. आमची ‘कृष्णेश्वर टीम’ सगळीकडे जिंकायची. जवळपासच्या गावांमधून आणि शहरातून खेळण्यासाठी आम्ही सायकलने ४०-५० मैलांचे अंतर सहज जात असू.

रामजी मराठी उत्तम शिकवायचा. दहावी, मॅट्रिकचा अभ्यास केला आणि सगळेजण उत्तम रितीने पास झालो; पण रामजी शासकीय छापखान्याची (प्रेसची) नोकरी, शाळा, संघ-शाखा, घरातील कामे, अशा सर्व जबाबदार्‍या संभाळून प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला, यासाठी त्याचे विशेष कौतुक झाले.’

१ आ. लहानपणापासूनच संघटन करणारे, इतरांना
साहाय्य करणारे, अतिशय परिश्रमी,बहुमुखी, प्रतिभासंपन्न,
निष्ठावान आणि उत्तम नेतृत्व असणारे प.पू. रामानंद महाराज

‘लहानपणापासून रामजी (प.पू. रामानंद महाराज) अतिशय विनोदप्रिय आणि हजरजबाबी आहे. त्याला पक्वान्न खाण्याची अन् दुसर्‍यांना खायला घालण्याची आवड आहे. रामजीच्या अंगात संघाचा स्वयंसेवक म्हणून असेल किंवा अंगचा गुण, स्वभाव म्हणा हवे तर, संघटन करण्याची, मदतीचा हात चटकन पुढे करण्याची वृत्ती जोपासली गेली आहे. तो अतिशय परिश्रमी, बहुमुखी, प्रतिभा संपन्न आणि निष्ठावान आहे.

सायकल सहलीची (ट्रिपची) कल्पना पुढे आली. त्यात रामजीने पुढाकार घेतला आणि सगळ्यांना एकत्र आणले. कुणी स्वतःच्या, तर कुणी भाड्याच्या सायकली घेऊन जवळ-जवळ ३५ जणांचा गट धार-मांडवाच्या सहलीला निघाला. कृष्णपुरा चौकातील रामजीच्या घरासमोरील मारुतीच्या देवळात नारळ फोडला. ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने संपूर्ण गल्ली (मोहला) भरून गेली. ‘रामजी की सेना चली’ असे म्हणत आम्ही रामजीबरोबर धार-मांडवाकडे प्रयाण (कूच) केले. वाटेत सायकली पंक्चर झाल्या, कुणी सायकलवरून पडले, तर कोणी किरकोळ जखमीही झाले. अशात धारला पोचेपर्यंत अंधार झाला. मुक्काम आमच्या घरी केला आणि सकाळी उठून पुढे मांडवला गेलो. रामजीने पुढाकार घेऊन ही सहल आखली होती. शेवटपर्यंत त्याने नेतृत्व केले अन् सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था जातीने बघितली. दुसर्‍या दिवशी त्याने स्वतः दाल-बाट्या बनवल्या आणि सगळ्यांना यथेच्छ खाऊ घातल्या.

१ इ. संघकार्यात पुढाकार

पुढे संघावरील बंदी उठल्यानंतर प.पू. गुरुजींच्या पोलोग्राऊंडवरील कार्यक्रमाच्या तयारीसाठीही आम्ही सर्व स्वयंसेवक कंबर कसून पुढे झालो. रामजीचा यात मोठा वाटा होता.’ – श्री बाबा यावलकर, गोविंद नगर, जिल्हा होशंगाबाद, (गुरुपूजा, १८.७.२००८)

२. प.पू. रामजीदादांचा शिष्य ते गुरु प्रवास !

२ अ. गुरुप्राप्ती

संत भक्तराज महाराजांप्रमाणेच प.पू. रामानंद महाराजांचे सद्गुरुही अनंतानंद साईश हेच होते. सद्गुरूंच्या निर्वाणानंतर प.पू. बाबा (संत भक्तराज) त्यांच्या गादीचे उत्तराधिकारी झाले. तेव्हापासून प.पू. दादांनी बाबांना गुरु मानले.

२ आ. गुरुसेवा

प.पू. अनंतानंदांचा आणि सदगुरूंच्या निर्वाणानंतर प.पू. भक्तराजांचा मुक्काम प.पू. रामानंद महाराजांकडेच असायचा. मोठे कुटुब, तुटपुंजे वेतन या परिस्थितीतही येणारा प्रत्येक पाहुणा, भक्तमंडळी कधीही विन्मुख गेली नाही.

२ इ. गुरूंनी केलेले कौतुक

प.पू. रामानंदांची सेवा, त्याग, भक्ती, निष्ठा यांनी प.पू. भक्तराज प्रसन्न झाले आणि म्हणूनच म्हणाले, ‘‘शंभर भक्तराज होतील; पण रामजीसारखा एक शिष्य होणे कठीण.’’

२ ई. हनुमंतासारखी सेवा

उज्जैन येथील बाबांच्या भक्त सौ. शुभदा पागे या संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्यातील नाते पुढील शब्दांत सांगतात,
‘संत भक्तराज महाराज यांच्या पुण्यातील कांदळी आश्रमाजवळच प.पू. दादांचे निरगुड गाव आहे ! श्री दादांचे कुलदैवत श्री हनुमंत आणि निरगुड येथेही श्री हनुमंताचे मंदिर आहे. हे सांगण्याचे कारण ‘जे नाते श्री रामप्रभूंचे आणि श्री हनुमंताचे, तेच नाते श्री सद्गुरु बाबांचे आणि प.पू. श्री दादांचे आहे.’ (संदर्भ : गुरुपूजा, १८.७.२००८)

२ उ. प.पू. बाबांनी प.पू रामजीदादांना उत्तराधिकारी करणे

प.पू. भक्तराजांच्यानंतर त्यांच्याबरोबर छायेसारखे वावरलेले, लक्ष्मणासारखे त्यांच्या मागून जाणारे त्यांचे गुरुबंधु प.पू. दादांनी चाळीस वर्षे प.पू. बाबांची सेवा जिवाभावाने केली. त्यांच्या खडतर सेवेमुळे १९८७ साली मोरटक्का आश्रमात झालेल्या विष्णुयागाच्या वेळी प.पू. बाबांनी त्यांचे नामकरण ‘रामानंद’ असे केले. ‘प.पू. सदगुरु बाबा आपल्या मुखाने, कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्षपणे भक्तांना सांगत, ‘मला आता ओवाळू नका. आता रामानंदांना ओवाळा !’ आपल्या दिव्य निर्वाणापूर्वी जसे सद्गुरु अनंतानंदांनी प.पू. बाबांना आपल्यासमोर वंदायला लावून आपल्या उत्तराधिकारी उद्घोषित केले. तसेच प.पू. बाबांनी श्री सद्गुरु रामानंदांना केले.

३. गुरुकार्य

३ अ. प.पू. भक्तराज महाराजांची भजन,
भ्रमण आणि भंडारा, ही भक्तीमार्गाची परंपरा चालू ठेवणे

प्रीतीरूप बाबांच्या निर्वाणानंतर त्यांच्यासारखेच सगळ्या भक्तांना प.पू. दादांनी आईच्या मायेने वागवले. प.पू. भक्तराजांनी भजनाच्या माध्यमातून भक्तपरिवार वाढवला. लोकसंग्रह केला. त्यांची भजन, भ्रमण आणि भंडारा, ही भक्तीमार्गातील परंपरा प.पू. सद्गुरु रामानंदांनी तशीच पुढे चालवली. ‘संसारात राहूनच साधना करा, प्रापंचिक माणसाने भक्तीमार्गानेच जावे’, असा उपदेश त्यांनी केला. प.पू. बाबांच्या भजनातून मिळणारा तोच आनंद आणि त्याच अनुभूती प.पू. दादांच्या भजनातून मिळू लागल्या. प.पू. दादा आणि बाबा दोन नसून एकच आहेत, याची प्रचीती अनेक भक्तांनी घेतली.

३ आ. ‘ज्या भक्तांना सद्गुरु बाबांनी जी वचने दिली होती,
त्यांची पूर्तता अभावितपणे प.पू. दादांनी केली.’ – सौ. शुभदा पागे, उज्जैन (गुरुपूजा, १८.७.२००८)

३ आ १. प.पू. बाबांनी सांगितलेले ‘तुमच्या घरी भजन करणार’ हे प.पू. दादांनी पूर्ण करणे

‘एकदा प.पू. बाबा मला म्हणाले, ‘‘मी तुमच्या घरी येऊन भजन करणार आहे.’’ ही गोष्ट मी विसरून गेलो. नंतर प.पू. बाबांनी देह ठेवला. आमचे नवीन घर झाल्यावर प.पू. दादा अचानक आले; त्यांच्याबरोबर सर्वश्री गिरीश दीक्षित, छंदा दीक्षित, मेहेर आणि पागेसाहेब अन् सौ. करंदीकर हे सर्वजण आले आणि भजन करून गेले.’ – श्री. राजन जावळे, मुंबई (गुरुपूजा, १८.७.२००८)

४. प.पू. रामानंद महाराजांची
अनुभवलेली ‘शिष्य’ आणि ‘गुरु’ अशी दोन रूपे !

४ अ. साध्या वेषात आणि नम्रतेने
प.पू. भक्तराज महाराजांनी पाठवलेला
अल्पाहार घेऊन आलेले प.पू. दादा विठोबास्वरूप वाटणे

‘ऑगस्ट १९८७ मध्ये प.पू. करंदीकर यांच्याबरोबर आम्ही इंदौरला गेलो होतो. इंदौरला प.पू. करंदीकरांनी प्रथम प.पू. धांडेशास्त्री यांची भेट घडवली आणि त्यानंतर प.पू. भक्तराज महाराजांच्या (बाबांच्या) भेटीसाठी भक्तवात्सल्याश्रमात घेऊन गेले आणि बाबांशी आमच्या सर्वांच्या ओळखी करून दिल्या. त्या वेळी प.पू. दादा (प.पू. रामानंद महाराज) अतिशय नम्रपणे प.पू. बाबांच्या बाजूला उभे होते. त्यानंतर प.पू. दादांनी आम्हाला इतरांकरवी चहा-पाणी आणून दिले. आमच्याशी त्यांचा विशेष असा परिचय झाला नव्हता. त्यानंतर संध्याकाळी ‘हॉटेल श्रीमाया’मध्ये जिथे आम्ही उतरलो होतो, तिथे परत आलो. प.पू. करंदीकरांबरोबर गप्पा, चर्चा झाली आणि आम्ही खोलीत जाऊन झोपलो.

सकाळी आठ वाजता दारावर ‘टक् टक्’ असा आवाज झाला; म्हणून मी दार उघडले, तर समोर प.पू. दादा अगदी साध्या वेषात, नम्रतेने जिलेबीने भरलेली टोपली घेऊन उभे होते ! खरे म्हणजे त्या वेळी मला ते विठोबास्वरूप वाटले. फरक एवढाच की, विठोबाचे दोन्ही हात कमरेवर असतात, तर प.पू. दादांनी दोन्ही हातांनी जिलेबीची टोपली धरली होती ! एवढ्या सकाळी इतक्या नम्रतेने, अत्यंत साधेपणाने त्यांनी ती टोपली आमच्याकडे दिली आणि म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराजांनी तुमच्यासाठी हा अल्पाहार पाठवला आहे.’’ मी त्यांना ‘‘बसा. चहा घ्या.’’ म्हणून सांगितले; पण ते चहा न घेताच निघून गेले. आता या प्रसंगाची आठवण झाल्यावर अप्रूप वाटते की, साक्षात् ईश्वरच आपल्या दारात प्रसाद घेऊन उभा होता आणि मी त्याला ओळखू शकले नाही.

४ आ. प.पू. बाबांचे उत्तराधिकारी म्हणून प.पू दादा
गादीवर बसल्यावर त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होणे

‘प.पू. बाबांच्या निर्वाणानंतर जेव्हा प.पू. दादा हे त्यांच्या (प.पू. बाबांच्या) गादीवर उत्तराधिकारी म्हणून बसले, तेव्हा त्यांचे खरे स्वरूप हळूहळू पाकळी-पाकळीने उलगडायला लागले. ‘या माणसाचे सामर्थ्य केवढे आहे’, याची हळूहळू जाणीव व्हायला लागली. प.पू. बाबा असेपर्यंत अजाणतेपणाने आम्ही त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने वागत होतो.’

४ आ १. प.पू. रामानंद महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे पाऊस न पडणेआणि त्यामुळे त्यांचा पंचमहाभूतांवर ताबा असलेले बघायला मिळणे

‘आम्ही विशाखापट्टणम्ला जात होतो. तेव्हा सगळीकडे मुसळधार पाऊस होता. गोदावरीला पूर आला होता. आदल्या दिवशी पुलावरून आगगाडी गेली नव्हती; पण आम्ही मात्र सुखरूप पोहोचलो. नंतर तेथून श्री. प्रभातकुमारांच्या ‘हार्मोनी’मध्ये रहायला गेलो. आंध्रप्रदेशमध्ये धुवांधार पाऊस पडत होता, तसेच विशाखापट्टणम् शहरातही पाऊस होता; पण ‘हार्मोनी’च्या भागात पाऊस पडत नव्हता. संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता; परंतु काळे ढग जमत होते. आम्ही प.पू. दादांना शंका विचारली, ‘‘संध्याकाळी भजन होईल का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. अजिबात पाऊस येणार नाही.’’ आणि खरोखरच भजन झाले. पाऊस अजिबात आला नाही. दुसर्‍या दिवशी मात्र पाऊस कोसळला ! अशा तर्‍हेने प.पू. दादांचे पंचमहाभूतांवर ताबा असलेले भव्य-दिव्य रूपही बघायला मिळाले.’ – डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, शीव, मुंबई. (गुरुपूजा, १८.७.२००८, पृष्ठ क्र. २० व २१)

५. प.पू. रामानंद महाराज यांची त्यांच्या रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी अनुभवलेली वैशिष्ट्ये

‘प.पू. रामानंद महाराज (प.पू. दादा) यांनी गोव्यातील रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला वैशाख कृ. प्रतिपदेला (कलीयुग वर्ष ५११०), म्हणजे २१.५.२००८ रोजी भेट दिली. या भेटीच्या वेळी मला त्यांच्या संदर्भात जे अनुभवायला मिळाले, त्यातून प.पू. दादांच्या संतत्वाचे काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू समोर आले. यांतील राष्ट्र आणि धर्म यांविषयक त्यांच्या विचारांसंबंधीचे पैलू खूप महत्त्वाचे असल्याने ते येथे मांडत आहे.

५ अ. राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेरक
विचार मांडणारे प.पू. रामानंद महाराज

या भेटीच्या वेळी प.पू. दादांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी मोजक्या शब्दांत मार्गदर्शन केले. संत हे जगाकडे साक्षीभावाने पहात असतात. जो तो आपापल्या कर्माची फळे भोगत आहे, याचे त्यांना पूर्ण ज्ञान असते. त्यामुळे संत ‘राष्ट्राची स्थिती कशी आहे, धर्माची स्थिती काय आहे’, यांबाबतही साक्षीभावाने पहातात. काही मोजकेच संत या टप्प्याच्या पुढे जातात आणि राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी. ‘राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणे’, हे अशा संतांचे ज्ञानोत्तर कार्य असते, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प.पू. दादा हे संत असूनही राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करतात अन् त्याबद्दल सांगतात, हे खूप महत्त्वाचे आहे. उच्च पातळीच्या संतांच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांचा विचार जरी आला, तरी मोठे कार्य होते. त्यांच्या मनात विचार येणे म्हणजे जणू तशा प्रकारचा संकल्प होणे असते. या संकल्पाचे बळ त्यासाठी कार्य करणारे कार्यकर्ते, साधक आणि नेते यांच्या पाठीशी उभे रहाते, एवढेच नव्हे तर त्यांच्या या संकल्पामुळे समाजात प्रत्यक्ष परिवर्तनही सुरू होते. माझी प.पू. दादा यांच्याबरोबर झालेली प्रश्नोत्तरे पुढे देत आहे. त्यांतून या कार्यासाठी धडपडणार्‍यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन तर मिळेलच, याबरोबरच काही करण्यासाठी धडपडणारे आणखी काही तयारही होतील आणि कार्यही होईल यात शंका नाही. त्याचप्रमाणे सांप्रदायिक कार्याच्या पलीकडे न पहाणार्‍यांनाही दिशा मिळेल.

मी : तुम्ही संत आहात आणि सर्व गोष्टींकडे साक्षीभावाने पहाण्याची तुमची स्थिती आहे, तरीदेखील तुम्हाला राष्ट्र आणि धर्म यांना आलेली वाईट स्थिती जाऊन त्यांचे चांगले काहीतरी व्हावे, असे का वाटते ?

प.पू. दादा : राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करायलाच हवा. राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वांनी एक व्हायला हवे. समर्थांनी धर्मकार्यासाठी ठिकठिकाणी मठ स्थापन केले, ते केवळ मठाधिपती होण्यासाठी नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी!

मी : काँग्रेसवाले ‘राम आणि कृष्ण नव्हतेच’, असे म्हणत आहेत.

प.पू. दादा : काँग्रेसवाले काय म्हणतील, याचा आता भरोसा नाही !

मी : राष्ट्राच्या सद्यस्थितीविषयी सांगा.

प.पू. दादा : सध्याच्या राजकारणी लोकांचा भरोसा नाही. ते देशाला विकून खातील !

मी : देशाचा कारभार चांगला चालण्यासाठी संघानेच देशावर राज्य करायला पाहिजे ! (प.पू. दादा पूर्वी रा.स्व. संघाचे कार्य करत होते.)

प.पू. दादा : तुमचेच (सनातनचेच) राज्य यायला हवे !

प.पू. रामानंद महाराज यांची सुवचने

१. ‘काँग्रेसवाले ‘राम आणि कृष्ण नव्हतेच’, असे म्हणत आहेत. काँग्रेसवाले काय म्हणतील, याचा आता भरोसा नाही !

२. सध्याच्या राजकारणी लोकांचा भरोसा नाही. ते देशाला विकून खातील !

३. तुमचेच (सनातनचेच) राज्य यायला हवे !’

५ आ. प.पू. रामानंद महाराज यांनी
स्वतः अद्वैत स्थितीला असल्याची खात्री देणे

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात ठेवण्यात आलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीला प्रदक्षिणा घातल्याने साधकांना येत असलेल्या विविध अनुभूतींबाबत डॉ. दुर्गेश सामंत हे प.पू. दादा यांना माहिती सांगत होते. तेव्हा प.पू. दादा म्हणाले, ‘‘मला अनुभूतीच येत नाही.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘अद्वैतात गेल्यावर अनुभूती काय येणार !’’ त्यावर प.पू. दादा हसले आणि म्हणाले, ‘‘ते बरोबर आहे !’’

५ इ. मी संत नाही, संथ आहे; पण शांती
अनुभवतो, असे सांगणारे प.पू. रामानंद महाराज

कु. प्रियांका लोटलीकर यांनी प.पू. दादा यांचे सूक्ष्म-चित्र रेखाटले. त्यात प.पू. दादांचा स्थूलदेह न दाखवता फक्त चैतन्य, आनंद आणि शांती यांची वलये दाखवली आहेत. त्यासंदर्भात प.पू. दादा म्हणाले, ‘‘मी नेहमी शांतीच अनुभवतो. मी संत नाही; पण संथ आहे !’’

५ ई. प.पू. भक्तराज महाराज यांचे
स्मरण असणारे प.पू. रामानंद महाराज

आश्रमात प.पू. दादा यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याच्या वेळी जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर सुरकुत्या पडल्या होत्या. मी या सुरकुत्या व्यवस्थित करण्याबाबत साधकांना सांगितले असता प.पू. दादा म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांनाही त्यांच्या गुरूंच्या गादीवर एकही सुरकुती चालत नसे.’’ या वेळी मी म्हटले, ‘‘ही सर्व प.पू. भक्तराज महाराज यांचीच शिकवण आम्ही आचरत आहोत.’’

५ उ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या
कृपेमुळे सनातनचे कार्य होत असल्याचे सांगणे

या भेटीमध्ये प.पू. दादा यांनी आश्रमातील विविध विभागांना भेटी दिल्या. त्या वेळी कार्याचा मोठा आवाका पाहून त्यांनी ‘हे सर्व प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळेच होत आहे’, असे सांगून प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेची खात्री दिली.

५ ऊ. शरीर थकलेले असतांनासुद्धा चाकाची गाडी न वापरता
आश्रमाचे विविध भाग चालत जाऊन पहाणारे प.पू. रामानंद महाराज

प.पू. दादा यांची प्रकृती या दौर्‍यात चांगली नव्हती. हे वेळोवेळीच्या निरोपांवरून, संपर्कांवरून समजत होते. त्यांना आश्रमात विविध ठिकाणी जाणे सुलभ व्हावे, यासाठी चाकाच्या खुर्चीची व्यवस्था केली होती. आश्रमात पोहोचताच त्यांनी ती वापरण्याचे नाकारले आणि ‘स्वतः पायी फिरून आश्रम पहाणार’, असे त्यांनी सांगितले. ते एखादा जिनाही चढून जाण्यास तयार होते. त्यांचा आश्रम पहाण्याचा उत्साह खूप होता. त्यांनी दोन मजल्यांवरील प्रत्येक भाग पाहिला आणि साधकांना आपल्या दर्शनाचा लाभ दिला.’

– डॉ. जयंत आठवले (ज्येष्ठ शुद्ध ९, कलीयुग वर्ष ५११० (१२.६.२००८)

अशा प.पू. रामानंद महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment