सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणाऱ्या सौ. माहेश्वरी सरनोबत (कोल्हापूर) यांचे युरोप मधील अत्यंत कठीण ‘आयर्नमॅन’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुयश !

स्पर्धेत यश मिळवल्यानंतर ‘आयर्नमॅन’ पुरस्कारासह सौ. माहेश्वरी सरनोबत

कोल्हापूर, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत खडतर समजली जाणारी आणि जगातील सर्वांत मोठी असणारी युरोपमधील इस्टोनिया येथील ‘आयर्नमॅन’ इस्टोनिया टॅलिन’ ही स्पर्धा सौ. माहेश्वरी सरनोबत यांनी १५ घंट्यांमध्ये पूर्ण केली. या स्पर्धेत समुद्रात ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे आणि ४२.२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन धावणे हे सर्व एकामागोमाग १७ घंट्यांच्या आत पूर्ण करायचे असते.

स्पर्धेत यश मिळवल्यानंतर भारताच्या तिरंगा ध्वजासह सौ. माहेश्वरी सरनोबत

यामुळे सौ. माहेश्वरी सरनोबत यांनी भारतातील सर्वाेत्तम १० मध्ये स्थान मिळवले असून त्या कोल्हापूर येथील पहिल्या महिला ‘आयर्नमॅन’ ठरल्या आहेत. सौ. माहेश्वरी या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार नामजप, तसेच प्रासंगिक सेवा करतात.

यापूर्वीही सौ. माहेश्वरी या २० मार्च २०२२ मध्ये मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
सौ. माहेश्वरी सरनोबत

या संदर्भात अधिक माहिती देतांना सौ. माहेश्वरी म्हणाल्या की,

१. ही स्पर्धा म्हणजे माझी श्रद्धा आणि जिद्द यांची कसोटी होती. पाण्याचे तापमान ५ अंश सेल्सियस असल्याने स्पर्धा चालू होण्यास ३ घंटे विलंब झाला. जेव्हा मी बाल्टिक समुद्रात पोहायला प्रारंभ केला, तेव्हा माझे पूर्ण शरीर गोठून गेले. हातपाय काळे-निळे झाले आणि सुन्न पडले. बर्फासारखे थंड पाणी अंगावर काटा आणत होते; पण मी हार मानली नाही.

सौ. माहेश्वरी सरनोबत यांना मिळालेला ‘आयर्नमॅन’ पुरस्कार

२. १८० किलोमीटरच्या सायकल प्रवासाच्या कालावधीत ५ अंश सेल्सियस तपमानात आलेल्या थंड वादळाने माझी परीक्षा घेतली. डोके ठणकत होते; पण मी हनुमानाचा आणि श्रीरामाचा नामजप सतत करत होते. या शक्तीच्या आधारावर मी ७ घंटे २० मिनिटांत सायकलिंग पूर्ण केले.

३. जेव्हा ४२.२ किलोमीटर धावायला प्रारंभ केला, तेव्हा केवळ ४ किलोमीटर अंतर पार केल्यावर मला पोटदुखीचा तीव्र त्रास प्रारंभ झाला. मी हनुमान देवतेला प्रार्थना केल्यानंतर मला ऊर्जा मिळाली आणि मी हे धावणे पूर्ण केले.

४. अंतिम रेषा पार करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत माैल्यवान आणि अभिमानास्पद क्षण ठरला. मला हनुमान, श्रीराम आणि दत्तगुरु यांचा आशीर्वाद लाभल्यानेच ही स्पर्धा पूर्ण करू शकले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

५. ही स्पर्धा मी केवळ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याच कृपेमुळे जिंकू शकले. ही स्पर्धा पूर्ण करतांना मी भारताचे प्रतिनिधित्व केले’, याचा मला अभिमान आहे.

Leave a Comment