पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीरपणे उत्तरे द्या !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्हमे २०२५ मध्ये गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्यानंतर काही जिल्ह्यातील पोलीस या महोत्सवाच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधकांची, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची चौकशी करत आहेत. विशेषत: उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातील काही साधक किंवा कार्यकर्ते यांची भ्रमणभाषद्वारे, तर काहींची घरी जाऊन चौकशी करत आहेत.

वस्तूत:, ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा जाहीर उत्सव सर्वांसाठी खुला आणि ‘लाईव्ह प्रक्षेपण’ झालेला कार्यक्रम होता. यामध्ये देशभरातून विविध संत-महंत, गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासारखे लोकप्रतिनिधी यांसह उच्चपदस्थ अधिकारी, समाजातील मान्यवर हितचिंतक, जिज्ञासू यांच्यासह सनातनचे साधक यांसह सहस्रो भाविक सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य आणि देशात हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार असतांना अशी चौकशी होणे, हे आश्चर्यकारक आहे. अशा प्रकारची चौकशी तबलिगी जमात किंवा धर्मांतराचे कार्यक्रम करणार्‍या ख्रिस्त्यांच्या कार्यक्रमांची केल्याचे आढळत नाही. या कार्यक्रमाला उपस्थित रहाणे, ही साधक-हितचिंतकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे अशा चौकशांना न डगमगता खंबीरपणे प्रतिसाद द्यावा.

एका जिल्ह्यात २ पोलीस आणि त्यांच्यासह १ महिला पोलीस यांनी एका साधकाच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली. त्यात त्यांनी महोत्सवाच्या संदर्भात प्रश्न विचारले. या वेळी त्या साधकांनी त्या पोलिसांची ओळख विचारली असता, त्या तिघांपैकी एकाने केवळ आडनाव सांगून त्रोटकपणे उत्तर दिले. अन्य एका जिल्ह्यात २ पोलीस आणि त्यांच्यासह १ महिला पोलीस एका साधकांच्या घरी गेले असतांना त्यांची १२ वर्षांची मुलगी एकटीच घरी होती. तेव्हा तिने घराचा सुरक्षा दरवाजा (Safety-door) न उघडता ‘माझे आई-वडील घरी नाहीत, त्यामुळे तुम्ही ते असतांना या’, असे खंबीरपणे उत्तर दिले.

हे दोन्ही प्रसंग पहाता, महोत्सवाच्या संदर्भात किंवा संस्था-समिती यांच्याशी निगडित कोणत्याही विषयाबद्दल पोलिसांनी संपर्क केल्यास अथवा घरी येऊन चौकशी केल्यास साधकांनी पुढीलप्रमाणे कृती कराव्यात.

१. पोलिसांनी भ्रमणभाष केल्यास प्रथम त्यांचे नाव, पोलीस ठाणे इत्यादी विचारावे. प्रत्यक्ष घरी येऊन चौकशी करत असल्यास त्यांचे ओळखपत्र दाखवण्यास सांगावे.

२. त्यांची ओळख जाणून घेतल्यावर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची न डगमगता, शांतपणे आणि खंबीरपणे उत्तरे द्यावीत.

३. पोलिसांनी आपली ओळख विचारल्यास स्वतःची ओळख सांगावी.

४. काही ठिकाणी पोलीस ‘जिल्ह्यातून गोव्यातील महोत्सवाला गेलेल्या साधकांची सूची आमच्याकडे आहे’, असे सांगून साधकांची नावे, संपर्क क्रमांक इत्यादी मागतात. अशा वेळी त्यांना लेखी पत्र देण्यास सांगावे.

५. पोलिसांनी चौकशी केल्यास त्याविषयी जिल्ह्यात आपल्या उत्तरदायी साधकांना त्याविषयी माहिती देऊन अवगत करावे.

६. आपल्या इमारतीत किंवा आसपासच्या परिसरात ‘सीसीिटव्ही कॅमेरे’ बसवलेले असतील, तर त्याद्वारे आपल्याकडे येऊन गेलेल्या व्यक्तींची छायाचित्रेही घेऊन ठेवावी.

७. महोत्सवाविषयी किंवा ज्याविषयी चौकशी करत आहेत, त्याविषयी चौकशी का करत आहेत ? असे त्यांना कारण विचारावे.

८. पोलिसांशी हा संवाद नम्रपणे साधावा.

Leave a Comment