साधकांनो, सध्या वाईट शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी ‘ॐ’ हा नामजप मिळत आहे, म्हणजे वाईट शक्तींचे सर्वाेच्च स्तराचे आक्रमण होत आहे आणि ही अंतिम लढाई असल्याने साधना वाढवली, तर धर्माचा विजय होणार आहे !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘साधकांच्या साधनेत खंड पाडण्यासाठी वाईट शक्ती साधकांवर सूक्ष्मातून आक्रमण करतात. वाईट शक्तींमुळे होणारे त्रास दूर करण्यासाठी साधकांना प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार उपाय करतांना नामजप शोधावा लागतो. तेव्हा साधकांना त्रासाच्या तीव्रतेनुसार पुढील नामजपांपैकी एखादा नामजप मिळतो.

१. वाईट शक्तींकडून ‘सगुण-निर्गुण’ स्तरावरचे आक्रमण होत असल्यास पंचतत्त्वांपैकी तेजतत्त्व, वायुतत्त्व किंवा आकाशतत्त्व यांपैकी एखाद्या तत्त्वाचा जप मिळतो. तेजतत्त्व, वायुतत्त्व आणि आकाशतत्त्व या क्रमात आकाशतत्त्व हे सर्वांत उच्च अन् अधिक निर्गुण स्तराचे आहे. आकाशतत्त्वाचा जप मिळाला म्हणजे वाईट शक्तींचे आक्रमण वाढलेले आहे.

२. वाईट शक्तींकडून ‘निर्गुण-सगुण’ स्तरावरचे आक्रमण होत असल्यास ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ किंवा ‘ॐ’ यांपैकी एखादा जप मिळतो. ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ या जपांच्या क्रमात ‘ॐ’ हा सर्वांत उच्च अन् सर्वांत निर्गुण स्तराचा जप आहे. उपायामध्ये ‘ॐ’ हा जप मिळाला, म्हणजे ‘वाईट शक्तींनी सर्वांत उच्च स्तराचे आक्रमण केले आहे’, असे समजावे.

सध्या (जून २०२५ मध्ये) आध्यात्मिक उपाय करतांना असे लक्षात आले, ‘अधिकतर वेळा ‘ॐ’ हा नामजप मिळत आहे.’ यापूर्वी ‘महाशून्य’ किंवा फार तर ‘निर्गुण’ हा नामजप मिळायचा. यावरून लक्षात येते, ‘वाईट शक्ती आता आक्रमण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.’

साधकांची जसजशी साधना वाढत जाते, तसतशी वाईट शक्तींना आक्रमण करण्यासाठी अधिकाधिक शक्ती लावावी लागते. सध्या आध्यात्मिक उपाय करण्यासाठी ‘ॐ’ हा नामजप मिळणे, म्हणजे वाईट शक्ती आता आक्रमण करण्यासाठी स्वतःची सर्वाेच्च शक्ती वापरत असणे. यामध्येही त्यांची हार झाली की, त्या सूक्ष्मातून आक्रमण करणे सोडून स्थुलातून आक्रमण करू लागतील आणि तेव्हा तिसरे महायुद्ध आरंभ होईल. तिसर्‍या महायुद्धात ईश्वरकृपेने धर्माचा विजय झाला की, ईश्वरी राज्याची, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. त्यामुळे साधकांनो, आता धर्माचा विजय होण्यासाठी आणखी तीव्रतेने साधना करून वाईट शक्तींचे आक्रमण परतवून लावा !’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.६.२०२५)

Leave a Comment