पार्थिवाचे पारंपरिक पद्धतीने दहनसंस्कार न करता सीएन्जी किंवा विद्युत शवदाहिनीचा वापर करणे योग्य आहे का ?

हिंदू मागील लाखो वर्षांपासून लाकडाने दहनसंस्कार करतात; पण प्रदूषणाची समस्या यापूर्वी कधीही निर्माण झाली नाही. ती मागील १०० वर्षांत निर्माण झाली, म्हणजे या समस्येचे मूळ लाकडाने दहनसंस्कार करणार्‍या हिंदूंच्या धर्माचरणात नसून विज्ञानाच्या अतिरेकी वापरात आहे. हिंदु धर्मातील दहनसंस्काराचा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास लाकडाच्या चितेवरील दहनसंस्कारावर नव्हे, तर इतर घटकांमुळे (औद्योगिक प्रदूषण, सांडपाणी आदी) होणार्‍या प्रदूषणाला आळा घालणे आवश्यक ठरते. असे झाल्यास हिंदूंना त्यांच्या धर्मपरंपरा पाळणे सुलभ होईल.

 

१. मृतदेहाला अग्नी देण्यामागील शास्त्र काय ?

मृतदेहाला मंत्रोच्चारासह लाकडाच्या चितेवर अग्नी दिल्यानंतर मृतदेहातून कमाल प्रमाणात अशुद्ध वायू उत्सर्जित होऊन ते अग्नीत विघटित होत असतात. अग्नी हा तेजतत्त्वाशी संबंधित असून अंत्यविधीच्या वेळी केलेल्या मंत्रोच्चारातून निर्माण होणार्‍या नादशक्तीच्या बळावर अग्नीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरी गतीमान होतात (केल्या जातात). यातून  तेजतत्त्वाला आकाशतत्त्वाची जोड मिळून उत्पन्न होणार्‍या संयुक्त लहरी मृतदेहाच्या भोवती आपले अभेद्य असे सूक्ष्म कवच निर्माण करतात. यामुळे लिंगदेह वातावरणकक्षेत भ्रमण करत असतांनाही त्याचे वाईट शक्तींपासून रक्षण होण्यास साहाय्य होते, तसेच संयुक्त लहरींमधून सूक्ष्म ऊर्जा निर्माण होऊन लिंगदेह अल्प कालावधीत पृथ्वीची वातावरण कक्षा भेदून पुढे जाऊ शकतो. मृत व्यक्तीचे दफन किंवा अन्य मार्गांचा अवलंब करण्याऐवजी त्याला दहन केल्यास त्या जिवाला वाईट शक्तीचा त्रास होत नाही. त्याच्या पुढील गतीसाठीही दहनसंस्कार पोषक असतो; म्हणून मंत्रोच्चारासहित लाकडाच्या चितेवर दिलेल्या अग्नीला अतिशय महत्त्व आहे. – श्री गुरुतत्त्व (२४.६.२००५, दुपारी ४.०३) (पू. (सौ.) अंजली गाडगीळ या एक विद्वान, श्री गुरुतत्त्व या नावानेही लिखाण करतात.)

 

२. शास्त्रानुसार मृतदेहाला लाकडांच्या चितेवरच अग्नी देणे योग्य का ?

वैज्ञानिक प्रगतीच्या अतिरेकापोटी हिंदु समाजाने बहुमूल्य अशा अनेक प्राचीन शास्त्रांचा त्याग केला. त्यामुळे तो ईश्‍वरापासून दूर गेला. अंत्यसंस्काराच्या विधीतही विज्ञानाचा शिरकाव झाला आणि लाखो वर्षांपासून लाकूड, गोवर्‍या, उद आदी सात्त्विक घटकांच्या माध्यमातून होणारा अंत्यसंस्कार आज वीज, पेट्रोलियम गॅस, रॉकेल, डिझेल आदी घटकांच्या माध्यमातून केला जात आहे. हिंदु धर्मात चुलीवर स्वयंपाक करणे, यज्ञयाग यांपासून अंत्यसंस्कारापर्यंत सर्वच प्रसंगी लाकडालाच धार्मिकदृष्ट्या महत्त्व दिले आहे; कारण लाकूड सत्त्वगुणी आहे; म्हणून अंत्यसंस्काराच्या वेळी आत्म्याला गती मिळावी; म्हणून लाकडांचाच वापर करावा.

 

३. लाकडांतील सूक्ष्म स्वरूपातील अग्नीमुळे आत्म्याला सद्गती मिळणे !

लाकडामध्ये अग्नितत्त्व सूक्ष्म स्वरूपात असतेच; म्हणून लाकूड हे मुळातच शुद्धीकारक आहे. मृतदेहाला लाकडांच्या चितेवर अग्नी दिल्याने लाकडांतील सूक्ष्म स्वरूपातील अग्नी मृतदेहाची अशुद्धता (रज-तम) नष्ट करतो. त्यामुळे मृतदेह हलका होऊन त्याला सद्गती मिळण्यास साहाय्य मिळते.

 

४. वीज, डिझेल आदी घटकांच्या माध्यमातून
मृतदेहाला अग्नी दिल्यामुळे आत्म्याला दुर्गती मिळणे !

वीज, पेट्रोलियम गॅस, डिझेल आदींचा वापर करण्यात येणार्‍या दाहिन्या रज-तमयुक्त असल्याने मृतदेहाच्या दहनाच्या वेळी त्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होते. त्यामुळे वायूमंडल, तसेच मृतदेहही दूषित होतो. अशा दूषित मृतदेहाकडे वातावरणातील वाईट शक्ती आकृष्ट होतात आणि त्या मृतदेहावर ताबा मिळवतात. त्यामुळे आत्म्याला पुढची गती न मिळता तो भुवलोकातच अडकून पडतो. तेथे त्याला यातनांना सामोरे जावे लागते. थोडक्यात आत्म्याला सद्गती न मिळता दुर्गतीच मिळते !

 

५. लोकहो, हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व समजून घ्या !

अ. व्यक्ती जीवित असतांनाच नव्हे, तर तिच्या मृत्यूनंतर पुढील प्रवासही सुखकर व्हावा, यासाठी हिंदु धर्मात विविध विधी सांगितले आहेत. हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे अग्नीसंस्कार करून मृत व्यक्तीचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर करणे, ही त्या मृत व्यक्तीसाठी खरी श्रद्धांजली ठरते !

आ. पेट्रोलियम गॅस, बायो-गॅस, वीज इत्यादी कृत्रिम घटक अग्नीसंस्कारासाठी वापरणे, म्हणजे एकप्रकारे मृतदेहाभोवती रज-तमाचे पांघरूणच घालणे ! असे करून आपल्याच प्रियजनांच्या मृत्यूनंतरच्या प्रवासात अडथळा निर्माण करण्याचे पाप ओढवून घेण्यासारखे आहे.

अन्य घटकांच्या तुलनेत हिंदूंच्या दहनसंस्कारात लागणार्‍या लाकडांचे आणि त्यातून होणार्‍या प्रदूषणाचे प्रमाण अत्यल्प किंबहुना नगण्य आहे, तरीही हिंदूंच्या दहनसंस्काराविषयी प्रश्‍नचिन्हे निर्माण केली जातात. यावरून निधर्मी राज्यपद्धतीमुळे येत्या काळात हिंदूंना धर्माचरण करणे किती अवघड होणार आहे, हे लक्षात येईल. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.२.२०१६)