सनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त व्याख्यान – ‘जागर स्त्रीशक्तीचा !’

Article also available in :

माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला
सबलीकरण होईल !- सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

मुंबई – देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांमागे विविध कारणे आहेत. यांत चित्रपटांच्या माध्यमांतून प्रसारित होत असलेली वासनांधता आणि अश्‍लीलता हे एक प्रमुख कारण आहे. वर्ष 2021 या एका वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या 31 सहस्र घटना घडल्या. अर्थात प्रतिदिन 84 अत्याचाराच्या घटना घडल्या. हे अतिशय दुर्दैवी आहे. भारताला शूर, लढवय्या अशा क्रांतीकारक महिलांचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होऊ शकते. शौर्यजागरणासाठी आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांना रोखण्यासाठी आता महिलांनी स्वत: प्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सक्षम व्हायला हवे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक संत सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘महिलांचे सबलीकरण व्हावे आणि भारतीय संस्कृतीत महिलांना असलेले श्रेष्ठत्व पुनर्स्थापित व्हावे’, या उद्देशाने जागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या ‘ऑनलाईन’ व्याख्यानात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम सनातन संस्थेच्या ‘यु-ट्यूब’ चॅनलद्वारे 13 सहस्रांहून अधिक दर्शकांनी पाहिला.

सद्गुरु (सुश्री(कु.)) स्वाती खाडये

सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या की, छत्रपती शहाजीराजे यांच्या अनुपस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी सर्व राज्यकारभार पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘हिंदवी स्वराज्य’ निर्मितीचे संस्कार केले. जर घराघरांत राजमाता जिजाऊ निर्माण झाल्या, तर त्यांच्या पोटी घराघरांत शिवरायच जन्माला येतील. धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की, कपाळावर कुंकू लावल्याने आज्ञाचक्रात स्थित दुर्गादेवीचे तत्त्व जागृती होते. सात्त्विक पोशाख परिधान केल्याने आध्यात्मिक संरक्षण कवच निर्माण होते, असे शास्त्र सांगते. धर्माचरण करून दुर्गातत्त्वाचा आणि आध्यात्मिक शक्तीचा लाभ घ्या. भारतीय संस्कृतीचा आणि परंपरांचा सार्थ अभिमान बाळगा !

या कार्यक्रमाला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहस्रो महिलांनी ‘व्याख्यान अतिशय प्रेरणादायी होते’, ‘अशी व्याख्याने वारंवार व्हायला हवीत’ अशा कमेंटस् कमेंट बॉक्समध्ये केल्या.

– श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

Leave a Comment