घरच्या घरीच करा आल्याची लागवड !

Article also available in :

आले हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेले कंदवर्गातील एक पीक आहे. याच्या नियमित सेवनाने बरेचसे रोग दूर रहातात. आले चहात घालून अथवा याचा रस मध आणि लिंबाचा रस यांत घालून पिण्याने त्वचा नितळ तर होतेच; पण वजनही आटोक्यात रहाते. असे हे बहुगुणी आले आपण आपल्या घरच्या बागेत कुंडीतही घेऊ शकतो. अगदी सज्जामधल्या (बाल्कनीमधल्या) लहानशा बागेतही ! घरात नेहमी लागणारे, कमी कष्टातले आले प्रत्येकाने घरी लावायलाच हवे.

श्री. राजन लोहगांवकर

१. आल्याची लागवड करण्यासाठीचा योग्य काळ

आले जर व्यावसायिक तत्त्वावर लावायचे झाल्यास एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात लावावे. अगदीच उशीर झाला, तर दुसऱ्या पंधरवड्यात लावावे; पण त्यापेक्षा उशीर करू नये. आपण जर एक-दोन कुंड्यांतच आले लावणार असू, तर ते वर्षभरात केव्हाही लावता येते.

 

२. आले लागवडीसाठी कुंडीची निवड

आले हे जमिनीखाली साधारण ६ ते ८ इंचांवरच बनते. त्यामुळे फूटभर खोलीची कुंडी पुरेशी होते. आल्याचा पसारा आडवा जास्त पसरत असल्यामुळे कुंडी मोठ्या व्यासाची किंवा शक्यतो आयताकार घ्यावी. आंब्याची लाकडी पेटी घेतली, तर उत्तमच. आल्याला अशा पेटीमधे वाढण्यासही भरपूर जागा मिळेल अन् खेळत्या हवेमुळे त्याची वाढही चांगली होईल. मातीतच आले जास्त वाढून पसरत असल्यामुळे सहाजिकच माती मोकळी असायला हवी. त्यामुळे मातीमधे पालापाचोळा, शेणखत किंवा कंपोस्ट जास्त प्रमाणात घालावे. खाली विटांचे तुकडे, वर पालापाचोळा, त्यावर कंपोस्ट किंवा शेणखत, त्यावर नीमपेंडचा पातळसा थर, वरून थोडी माती आणि पुन्हा एकदा असेच थर करून कुंडी भरावी. जवळ कडुनिंबाचे झाड असल्यास त्याचा पालापाचोळा सहज उपलब्ध होतो. असा हिरवा किंवा वाळलेला पाला भरपूर प्रमाणात वापरल्यास खतही होईल अन् कीडही लागणार नाही.

(शेणखत किंवा कंपोस्ट यांच्या अभावी जीवामृत वापरावे. पालापाचोळ्यावर जीवामृत शिंपडून तो कुजल्याने तयार झालेले ‘ह्यूमस’ (सुपीक माती) आले लागवडीसाठी अत्यंत पोषक असते. ‘ह्यूमस’ चांगले असल्यास आणि आपण नियमित पालापाचोळ्याचे आच्छादन करून जीवामृत देत असल्यास अन्य कोणत्याही खताची आवश्यकता रहात नाही. – संकलक)

३. आल्याची लागवड

आपण नेहमी पेठेतून जे आले आणतो, त्यांपैकीच डोळे असलेले आल्याचे काही तुकडे आपल्याला लागवडीसाठी वापरायचे असतात. त्यामुळे बियाणे आणण्यासाठी आपल्याला वेगळे काहीच करावे लागत नाही. ‘डोळे’ म्हणजे ‘आल्याच्या पृष्ठभागावर जिथे रेषा असतील आणि काहीसा भाग फुगीर असेल’, तो भाग. शेजारच्या छायाचित्रात गोल करून दाखवल्याप्रमाणे आल्याचा तेवढा कोंब असलेला भाग काढून घेऊन तो कुंडीत कुंडीच्या आकाराप्रमाणे; पण कडेला २ – ३ इंच भाग सोडून मातीमधे २ ते अडीच इंच खोलवर पेरावा. पेरल्यावर माती ओलसर होईल, इतपतच पाणी द्यावे. आपण आल्याचा कोंब असलेला भागच तोडून लावत असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या भागात आले उघडे पडलेले असते. त्यामुळे आरंभीच्या काळात जास्त पाण्यामुळे आले सडण्याची शक्यता असते; म्हणून माती ओलसर होण्यापुरतेच पाणी द्यावे. नंतरचे पाणीही अशाच पद्धतीने द्यावे.

 

४. उन्हाची आवश्यकता

आल्याला फार ऊन लागत नाही. त्यामुळे दिवसभरात २ ते अडीच घंटे ऊन मिळाले, तरी पुष्कळ होते. कुंडी शक्यतो सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत ऊन मिळेल, अशा ठिकाणीच ठेवल्यास उत्तम.

 

५. आल्याच्या कंदांची काढणी

आले बनण्यासाठी साधारणपणे ६ – ७ मास लागतात. सुंठ बनवण्यासाठी आले वापरायचे असेल, तर ते ८ ते १० मासांनी काढले तरी चालते; पण घरच्या वापरासाठी ६ – ७ मासांनी काढावे, नाहीतर त्यात जास्त तंतू निर्माण होऊन रस अल्प मिळतो. पाने पिवळी पडायला आरंभ झाला की, आले बनत आले आहे, असे समजावे. आल्याच्या काही प्रकारांमधे कधी रोपाला फूलही येते. कळी स्वरूपात असलेले फूल एखाद्या कणसासारखे दिसते. घरीच वापरणार असाल, तर २ – ३ दिवस पुरेल इतकेच आले कुंडीतून काढून घ्यावे आणि उरलेले मातीत तसेच राहू द्यावे, म्हणजे नवीन फुटवे येऊ लागतील.

 

६. पाणी आणि खत व्यवस्थापन

एप्रिलमधे आले लावल्यावर आरंभी ३ – ४ दिवसांनी पाणी द्यावे. नंतर पावसाचे पाणी आल्याला पुरेसे होते. एरव्ही माती कोरडी वाटली, तरच पाणी द्यावे. दर १५ दिवसांनी कंपोस्ट आणि शेणखत आळीपाळीने द्यावे. अधूनमधून थोडी नीमपेंड दिली, तर इतर कुठल्याही खताची आवश्यकता रहात नाही. नीमपेंड (किंवा कडुनिंबाचा पाला) वापरल्याने आल्यावर रोगही पडत नाही.

 

७. अन्य काळजी

पावसाळ्यात सगळीकडेच असलेला त्रास, म्हणजे पाने खाणाऱ्या अळ्या; पण त्यांच्यामुळे आल्याला कसल्याही प्रकारची हानी होत नाही. केवळ हुमणी (भुंग्यासारखा एक किडा) इत्यादी नाही ना, हे अधूनमधून बघत रहावे. अन्यथा एकदा लावून ६ महिने ढुंकूनही बघण्याची आवश्यकता नसलेले हे पीक आहे.

 

८. आल्यामध्ये आंतरपीक

पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात पृष्ठभागावरची जागा मोकळीच असते. त्यामुळे या काळात ज्याला शेतकरी आंतरपीक म्हणतात, ते घेता येते, म्हणजे पालेभाज्या किंवा टोमॅटो, वांगी इत्यादी. यामुळे तेवढ्याच खतात आणि पाण्यात दोन पीके घेऊन जागा, खत, पाणी अन् कष्ट या सगळ्यांची बचत होते.’

– राजन लोहगांवकर, टिटवाळा (साभार : https://vaanaspatya.blogspot.com/)

Leave a Comment