अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था

डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने सनातनवर बिनबुडाचे आरोप केल्याचे प्रकरण

मुंबई – सनातनवर खोटे आरोप करून स्वतःची पापे झाकण्याचा प्रयत्न अंनिसचे अविनाश पाटील करत आहेत. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मधील आर्थिक घोटाळ्यांमुळे अंनिसची २ शकले झाली असून संघटनेत अनागोंदी उसळली आहे. संघटना आणि ट्रस्ट कह्यात घेण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी अविनाश पाटील आटापिटा करत आहेत. या सर्व गोष्टींपासून राज्याचे आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी अविनाश पाटील सनातनवर बेछूट आरोप करत आहेत, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.

त्यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. सनातनवर आरोप करण्यापूर्वी ‘विवेकवाद’, ‘नैतिकता’, ‘तत्त्वनिष्ठता’, ‘पुरोगामित्व’ यांची जर अविनाश पाटील यांना चाड असेल, तर त्यांनी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या त्रिदशकपूर्तीनिमित्त जमा केलेल्या ५२ लाख रुपयांपैकी २८ लाख रुपये अवैधरित्या ‘विवेक जागर’ नावाचा नवीन ट्रस्ट स्थापन करून त्यात वळवण्याचा आर्थिक घोटाळा का केला ?’, याचे उत्तर जनतेला द्यावे.

२. अविनाश पाटील यांनी अंनिसचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. एन्.डी. पाटील यांची खोटी स्वाक्षरी करून अंनिसचे बँकेतील अकाऊंट ‘फ्रिज’ (गोठवले) का केले ? असे त्यांना का करावे लागले ? खोट्या स्वाक्षर्‍या करणे हे कोणत्या ‘विवेका’त बसते ? अशा प्रकारे अनेक ‘ब्लंडर्स’ (घोडचुका) केल्याचे सनातन नव्हे, अंनिसचेच माधव बावगे यांनी एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट झाले आहे. अंनिसचेच विश्‍वस्त दीपक गिरमे यांनी अविनाश पाटील यांना अनेक प्रकारच्या आर्थिक अनियमितता केल्यामुळे कायदेशीर नोटीस बजावली आहे.

३. अशा अविनाश पाटील यांच्यासारख्या घोटाळेबाजाने ‘सनातन’वर खोटे आरोप करणे, हा स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रकार आहे.

४. कुणालाही अटक करायची असेल, तर त्याविषयी न्यायालयात अथवा अन्वेषण यंत्रणांकडे विश्‍वसनीय पुरावे असावे लागतात, याचे भान स्वत:ला विवेकतावादी अन् विज्ञाननिष्ठ म्हणवणार्‍या अंनिसवाल्यांना राहिलेले नाही. त्यामुळेच डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलतांना अविनाश पाटील यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केला, हे सर्वांना ठाऊक आहे.

तरीही सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही ?’, असे वक्तव्य केले. तसेच ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हत्या सनातन संस्थेने केल्या’, असा आरोपही अविनाश पाटील यांनी केला.

५. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात अंतिम टप्प्यात असतांना, तसेच अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसतांना निकाल येण्यापूर्वी अशी विधाने करून अंनिसवाले न्यायाधिशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत; पण न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.

घोटाळेबाज अंनिसचा (अविनाश पाटील गट) बिनबुडाचा आरोप !

‘विवेक निर्धार मेळाव्या’त बोलताना अविनाश पाटील

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केली ?, हे सर्वांना ठाऊक आहे. (अन्वेषण यंत्रणांनी अजून कोणताही निष्कर्ष मांडला नसतांना अविनाश पाटील कशाच्या आधारे असे विधान करत आहेत ? कि त्यांना अन्वेषण यंत्रणांपेक्षा अधिक कळते ? – संपादक) तरीही सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही ? (‘आम्ही सांगतो तेच गुन्हेगार’, असे म्हणणे ही अंनिसची जुनी खोड असून त्यापोटी हिंदु संतांना येनकेन प्रकारेण अपकीर्त करायचे, हा अंनिसचा ‘अविवेकी’पणा आहे !  – संपादक)

ते २० ऑगस्ट या दिवशी पुण्यातील एस्.एम्. जोशी सभागृह येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘विवेक निर्धार मेळाव्या’त बोलत होते. या वेळी डॉ. राम पुनियानी, कामगार नेते डॉ. बाबा आढाव, पत्रकार हेमंत देसाई, रझिया पटेल, अंनिसचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष माधव बागवे आदी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’ या वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त प्रसारित केले आहे.

Leave a Comment