हिंदुत्व ही सामर्थ्यशाली संस्कृती आहे ! – अमेरिकी वैदिक शिक्षक डेव्हिड फ्रॉले उपाख्य पंडित वामदेवशास्त्री

जे विदेशींना समजते, ते भारतियांना कधी कळणार ?

डेव्हिड फ्रॉले यांचा परिचय

पद्मभूषण पुरस्कारप्राप्त डेव्हिड फ्रॉले यांनी योग आणि वैदिक विज्ञान यांत डी-लिट मिळवली आहे. त्यांनी वेद, हिंदुत्व, योग, आयुर्वेद आणि वैदिक भविष्य यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

david_frawley
डेव्हिड फ्रॉले

नवी देहली : हिंदुत्व ही एक अतिशय सामर्थ्यशाली संस्कृती आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सांस्कृतिक युद्ध चालू आहे. भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि नेते यांच्यावर मिडियाकडून टीका करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर न्यायालयेही हिंदु परंपरा आणि आचरण यांच्या विरोधात निर्णय देत आहेत. ही न्यायालये ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या विरोधात मात्र असे वागत नाहीत, असे प्रतिपादन अमेरिकी वैदिक शिक्षक डेविड फ्रॉले उपाख्य पंडित वामदेवशास्त्री यांनी एका पत्रकाराशी बोलतांना केले.

फ्रॉले पुढे म्हणाले,

१. आपल्याला हिंदुत्वाविषयी मार्क्सवादी, ख्रिस्ती आणि अमेरिका अशा अहिंदूंकडून माहिती मिळते. अमेरिकेत अनेक धर्मांचे विभाग आहेत. या विभागांमध्ये त्या त्या धर्माचे लोक शिकवत आहेत; परंतु हिंदु धर्माच्या विभागात क्वचितच हिंदू आहेत.

२. कोणती धार्मिक परंपरा योग्य आहे आणि कशावर बंदी असायला हवी, हे न्यायालयाचे विषय नाहीत. दुर्दैवाने जे न्यायालय जल्लीकट्टू किंवा दहीहंडी यांवर निर्णय देते, ते दुसर्‍या धर्माच्या संदर्भात काही बोलत नाहीत. लोक तर ख्रिसमस ट्रीला आग लावतांनाही मरतात, तर मग त्यावर बंदी घालणार का ? बंदीऐवजी अधिक सुरक्षित उपाययोजना असल्या पाहिजेत.

३. जेव्हा हिंदु कार्यकर्त्यांवर किंवा संघाच्या कार्यकर्त्यांवर आक्रमणे होतात, तेव्हा प्रसारमाध्यमे आवाज काढत नाहीत; परंतु तेच अहिंदूंच्या संदर्भात झाले, तर ती राष्ट्रीय बातमी होते.

४. हिंदु बहुसंख्यांक अवश्य आहेत; परंतु नेहरूंच्या काळापासून सरकारने बहुतांश डावे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे शाळांमध्ये शिकवण्यात येणारा प्राचीन भारताविषयीचा इतिहास सर्व कम्युनिस्टांनी लिहिला आहे आणि त्यांनी राजकीय कार्यक्रमासाठी या इतिहासाची मोडतोड करून तो समोर ठेवला आहे.

५. नेहरूंनी ब्रिटीश संस्कृती स्वीकारली. जे नेहरूंनी केले, तेच इंदिरा गांधी यांनी केले. जेएन्यूमध्ये आपण हिंदुत्व वाचू शकत नाही, तेथे योगालाही अनुमती नाही. जगात चीन सोडला, तर भारतच असा एक देश आहे, जेथे साम्यवादी विद्यार्थी संघटनाआहेत.

६. सरकारवर टीका करणे, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. भारतात काही मजेदार गोष्टी आहेत. जसे बहुसंख्यांक हिंदु संस्थांमध्ये धर्माविषयी उल्लेखही केलेला चालत नाही आणि अल्पसंख्यांक संस्था मात्र काहीही शिकवू शकतात.

७. भारतातून समाजवाद काढून टाकला पाहिजे. समाजवाद जगभरात अयशस्वी ठरला आहे. भारत घटनेच्या आधारावर स्वत:ला धर्मनिरपेक्ष असण्याची घोषणा करतो; परंतु प्रत्यक्षात येथे कोणताही समान नागरी कायदा नाही.

८. हिंदूंमध्ये असलेली जातीव्यवस्था ही एक सामाजिक रचना आहे. देशात अनेक हिंदु गट आहेत, ज्यांच्यात जात हा भाग नाही.

९. भारताला धर्मांतरित करणे, ही ख्रिस्तीनीतीची योजना आहे. हिंदुत्व हे जीवन जगण्याची पद्धत आहे, असे काही संघटना समजतात; पण तसे नाही. आम्ही पाश्‍चात्त्यांच्या नजरेतून हिंदुत्वाची व्याख्या करू शकत नाही. धर्म एक लॉ ऑफ नेचर (निसर्ग नियम) आहे; म्हणून हिंदुत्व धर्माच्याही पलीकडे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात