तमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन

तमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन आणि तेथील टिकवून ठेवलेल्या सांस्कृतिक परंपरेमुळे दक्षिणेत अजूनही दैवी स्पंदने टिकून असण्यामागील कारण

पू. (सौ.) अंजली गाडगीळ

 

१. तमिळनाडूतील लोक खूप भाविक असणे

तमिळनाडूमध्ये रहाणार्‍या लोकांनी अजूनही त्यांची परंपरा जपली आहे. येथील लोक खूप भाविक आहेत. ते आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे अगदी काटेकोरपणे पालन करतांना दिसतात.

२. दैनंदिन कृतीतही देव पहाण्याची कला

२ अ. कापराने किंवा लिंबाने दृष्ट काढूनच
दुकानदारांनी दुकान उघडणे अथवा बंद करणे

अगदी दुकानदारही याला अपवाद नाहीत.दुकान उघडतांना ते दुकानाची कापराच्या साहाय्याने किंवा लिंबाने दृष्ट काढतात आणि मगच दुकान उघडतात. दुकान बंद करतांनाही ते अगदी याच पद्धतीने दृष्ट काढल्यानंतरच दुकान बंद करतात. लिंबावर कापूर ठेवून तो जाळून त्याद्वारे दृष्ट काढण्याची इकडे प्रथा आहे.

२ आ. वाहनाची दृष्ट काढणे

कुठेही प्रवासाला निघतांनाही हे लोक वाहनाची दृष्ट काढूनच पुढे प्रवासाला निघतात. वाहनासमोर लिंबू धरून दृष्ट काढणे किंवा नारळावर कापूर ठेवून तो पेटवून नारळ ओवाळून टाकणे, अशा पद्धतीने दृष्ट काढली जाते.

२ इ. उपाहारगृहात मालक बसतो, त्या ठिकाणी
हळद-कुंकू आणि कपाळाला लावण्यासाठी भस्म ठेवलेले आढळणे

अगदी उपाहरगृहात मालक बसतो, त्या ठिकाणी हळद-कुंकू आणि कपाळाला लावण्यासाठी भस्म ठेवलेले आढळते. बरेच ग्राहक ते कपाळाला लावून घेतांना दिसतात.

२ ई. कॉफी बनवण्याच्या तांब्याच्या बंबालाही भस्माचे पट्टे ओढलेले दिसणे

चहाच्या किंवा कॉफीच्या दुकानात ठेवलेल्या तांब्याच्या बंबालाही त्यांनी भस्माचे पट्टे ओढलेले असतात आणि त्या बंबाला कुंकू आणि हार घालून त्याला नमस्कार करतात.

२ उ. पंख्याचीही पूजा होणे

अगदी छताला लावलेल्या पंख्याच्या पात्यांनाही भस्म लावून कुंकू लावून त्याची पूजा केलेली आढळून येते.

२ ऊ. कपड्यांच्या दुकानातील काचेच्या कपाटाला भस्म लावणे

कपड्यांच्या दुकानात काचेच्या कपाटात कपडे टांगून ठेवलेले आढळतात. या कपाटाच्या काचांवरही भस्माचे पट्टे ओढलेले असतात.

२ ए. प्रत्येकाच्या कपाळावर भस्म असणे

प्रत्येक जण कपाळावर भस्म लावूनच घराच्या बाहेर पडतो. क्वचितच एखादी व्यक्ती भस्म न लावलेली आढळते.

२ ऐ. प्रत्येक घराच्या बाहेर रांगोळी काढलेली असणे

सायंकाळच्या वेळी अथवा सकाळी घराबाहेर सडा टाकून येथे पारंपारिक पद्धतीच्या रांगोळ्याही काढल्या जातात. अगदी लहान-थोरांपासून सगळ्यांनाच या रांगोळ्या काढता येतात.

३. पारंपारिक पोशाखाच्या पद्धतीचे पालन करणे

३ अ. पांढर्‍या पंचासारख्या पारंपारिक पोशाखातच लोक वावरतांना दिसणे

तमिळ लोकांनी आपला पारंपारिक पोशाखही जतन केला आहे. अगदी मोठे लोकही देवळात येतांना पांढरा पंचाच नेसून येतात. याला लहान मुलेही अपवाद नाहीत.

३ आ. साडी हा स्त्रियांचा पोशाख असणे

तमिळनाडूमध्ये स्त्रियाही साडीच परिधान करतात. त्यांच्या डोक्यात नेहमी गजरा असतो.

४. देवळातील संस्कृतीचे पालन केल्याने तेथील सात्त्विकता टिकून रहाणे

४ अ. देवळाच्या आवारात भाविकांनी दीप लावण्याची पद्धत

प्रत्येक देवळात बाहेर एक चारपाई ठेवलेली असते. तेथे येऊन लोक आपले मागणे देवापर्यंत पोहोचण्यासाठी ठराविक संख्येने तुपाचे दिवे लावतात. त्यामुळे मंदिराच्या आवारातील सात्त्विकताही टिकून रहाते.

४ आ. गर्भगृहातही तुपाचा दिवा लावलेला असणे

देवळातील गर्भगृहातही केवळ तुपाचा दिवाच प्राधान्याने लावण्याची प्रथा आहे. येथे विजेवर चालणारे दिवे लावले जात नसल्याने मंदिरांची सात्त्विकताही टिकून राहिली आहे.

४ इ. मंदिरातील पुजार्‍यांच्या कृतींमुळे भाविकांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होणे

मंदिरातील पुजारी मंदिरात कितीही गर्दी असली, तरीही प्रत्येकाला त्याचे गोत्र, नक्षत्र आणि रास विचारून देवाला वहाण्यात येणार्‍या फुलांच्या तबकाला प्रत्येकाचा स्पर्श करवून घेतात आणि असे तबक गर्भगृहात नेले जाऊन ती फुले भाविकांतर्फे देवाच्या चरणी अर्पण केली जातात. या फुलांतून भाविकांच्या मनातील इच्छेची स्पंदने देवाच्या चरणी अर्पण केली गेल्याने देव त्यानुसार लवकर त्यांचे मागणे पूर्ण करतो, अशी त्यांची श्रद्धा आहे.

४ ई. दक्षिणेत पावलागणिक मंदिरे आढळणे

दक्षिणेत अगदी पावलागणिक मंदिर बांधलेले आढळते. कुंभकोणम्च्या परिसरात तर एक हजार मंदिरे आहेत. मंदिरांचे शहर अशी या गावाची ख्याती आहे.

४ उ. देवाच्या मूर्तीच्या पालखी प्रदक्षिणेमुळे नगराची शुद्धी होणे

अगदी प्रतिदिन मंदिरातून देवाच्या उत्सवमूर्तीची गावातून पालखी निघते. याला नगर प्रदक्षिणा म्हणतात. यातून एकप्रकारे नगराची शुद्धीही होते.

५. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेत
मोठ्या प्रमाणात संस्कृतीचे जतन केले जाणे

अगदी चेन्नईसारखे मोठे शहर सोडले, तर बहुतेक ठिकाणी अजूनही या लोकांनी बर्‍याच प्रमाणात आपली संस्कृती जपली आहे. हे सर्व पाहून असे वाटले, महाराष्ट्राने खरंच आपली संस्कृती बर्‍याच प्रमाणात गमावली आहे.

५ अ. आधुनिक पेहरावामुळे संस्कृतीचे हनन होणे

येथील स्त्रियाही जीन्सची पँट आणि आधुनिक पोषाख परिधान करतात. त्यांच्या अशा या वागण्यामुळे एकप्रकारे सर्वत्र भ्रष्टता आली आहे आणि यामुळे लहान मुलांवरही कुसंस्कार होत आहेत.

५ आ. केस कापण्याची फॅशन आल्याने
फुले कुठे माळायची हाही मोठा प्रश्‍नच असणे

फारच अल्प स्त्रियांच्या डोक्यात फुले माळलेली दिसतात. आता केसच कापण्याची फॅशन आल्याने फुले कुठे माळायची हाही मोठा प्रश्‍नच आहे. फुलांतील सुगंधाकडे वातावरणातील ईश्‍वरी लहरी आकृष्ट झाल्याने स्त्रीच्या देहाचीही यातून आपोआपच शुद्धी होते. हा लाभ आधुनिक स्त्रियांना आता होत नाही.

५ इ. दैवी संस्कृतीचा नाश झाल्याने
तेथे अनिष्ट शक्तीचा उदय होणे आणि हीच प्रक्रिया पुढे नाशाला कारणीभूत होणे

यावरून असे वाटले की पुढे प्रलयकाळ असेल, तर सर्वांत अधिक हानी संस्कृतीचे पालन न करणार्‍यांचीच होईल, कारण आधुनिकतेच्या नावाखाली लोक अगदी देवाला जवळजवळ विसरलेलेच आहेत. जेथे देव नाही, तेथील संस्कृतीचा नाश झाल्याने तेथे असुरी शक्तीचा उदय होतो आणि हीच प्रक्रिया पुढे नाशाला कारणीभूत होते.

५ ई. जनहो, आधुनिकतेचा स्वीकार करणारे
तुम्हीच तुमच्या नाशाला कारणीभूत होणार आहात,
तेव्हा वेळीच आपल्या हिंदु संस्कृतीचे पालन करून देवाचा आशीर्वाद मिळवा !

तेव्हा, जनहो, आपल्या पारंपारिक देवसंस्कृतीचे पालन करून येणार्‍या आपत्कालात स्वतःचे संरक्षण स्वतःच करून घ्या. अन्यथा काळ कठीण आहे. जेथे देव नाही, तेथे विनाश ठरलेलाच आहे. त्यावेळी आपल्या नशिबाला दोष देऊ नका; कारण आधुनिकतेचा स्वीकार करणारे तुम्हीच तुमच्या नाशाला कारणीभूत होणार आहात. तेव्हा वेळीच आपल्या हिंदु संस्कृतीचे पालन करून देवाचा आशीर्वाद मिळवा.

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (८.१२.२०१५, दुपारी ४.५६)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’