सनातनमधील शिकवणीचा अनुभव घेऊन साधना केल्यास साधक अध्यात्माच्या परम शिखरापर्यंत पोहोचतील ! – सुनील ठाकूर, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज (जिल्हा रत्नागिरी)

डावीकडून श्री. अभय वर्तक (ग्रंथप्रदर्शनाची माहिती देतांना), श्री. सुनील ठाकूर आणि श्री. राजन बोडेकर

प्रयागराज (कुंभनगरी) – रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे स्वीय्य साहाय्यक श्री. सुनील ठाकूर आणि कार्यकर्ते श्री. राजन बोडेकर यांनी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास नुकतीच भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली.

सनातनचे प्रदर्शन पाहिल्यानंतर श्री. सुनील ठाकूर म्हणाले, ‘अध्यात्म हे केवळ ग्रंथ वाचून अथवा प्रवचन ऐकून शिकता येत नाही, तर त्यासाठी कृती करावी लागते. ही महत्त्वपूर्ण गोष्ट या प्रदर्शनातून सांगण्यात आली आहे. अध्यात्माचा प्रारंभ कोठून व्हायला हवा, याचे शिक्षण सनातन संस्था देते, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. जे लोक ईश्‍वरी शक्ती आणि अध्यात्म यांवर विश्‍वास ठेवतात किंवा ज्यांना अध्यात्मात पुढे जाण्याची इच्छा आहे, त्यांनी प्रथम सनातनमध्ये येऊन येथे दिलेले शिक्षण घेऊन ते समजून त्याचा अनुभव घ्यावा. त्यानंतर साधक अध्यात्माच्या परम शिखरापर्यंत पोहोचतील. प्रयागराज येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनातून भाविकांना जे ज्ञान दिले जात आहे, ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. यासाठी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना हृदयातून धन्यवाद देतो अन् दोन्ही संघटनांना माझ्याकडून आणि संस्थानाकडून शुभेच्छा देतो.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment