नरक चतुर्दशी

Article also available in :

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

 

नरकासुर वध

१. तिथी

आश्विन वद्य चतुर्दशी

२. इतिहास

‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

३. महत्त्व

आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘अनिष्ट शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १७.५.२००५, रात्री ८.५९)

४. सण साजरा करण्याची पद्धत

अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !

आ. यमतर्पण – अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.

 

कारीट ठेचणे

कारीट ठेचणे

इ. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.

ई. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.

 

५. नरक चतुर्दशीच्या दिवशी करायच्या विविध कृतींमागील शास्त्र

अ. ब्राह्मणभोजन

‘नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ब्रह्मांडात संचारत असलेल्या धर्मलहरींना पुष्टता प्रदान करून अवतारी कार्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक अधोगामी लहरींना नष्ट करण्यासाठी समष्टीच्या इच्छाशक्तीचा पुरवठा करून प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करण्यासाठी आवाहन करणे. या माध्यमातून स्वतः धर्मकर्तव्य करून ईश्वराच्या कृपाशीर्वादात्मक लहरींना ग्रहण करता येते.

आ. वस्त्रदान

वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, म्हणजेच धर्माच्या संवर्धनतेच्या माध्यमातून पोषणता प्रदान करून कार्यस्वरूपाच्या जागृतीचे आवाहन करणे. या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते.

इ. प्रदोषपूजा

‘कालाय तस्मै नमः’ या कालमहात्म्याचे वर्णन करून कालाच्या माध्यमातून कार्यरत होणार्‍या स्थिरात्मक आणि पुरुषदर्शकात्मक क्रियाशक्तीच्या एका भागाची पूजा करून त्याचे संवर्धन करणे, म्हणजेच कार्यदर्शक स्वरूपात्मकता प्रदान करणे. या माध्यमातून कालमहिमा चित्तावर बिंबवून त्याप्रमाणे आचरण करून उच्च स्तराची अवस्था प्राप्त करून धर्म आचरता येतो.

ई. शिवपूजा

समष्टीला त्रास देणार्‍या अधोगामी लहरींच्या निर्दालनासाठी जागृत झालेल्या ईश्वराच्या मारक स्वरूपाच्या सगुणतेला पूजेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ईश्वराच्या प्रत्येक कृतीत आपुलकी निर्माण होऊन भाववृद्धी होऊन ईश्वराशी एकरूपता गाठण्याच्या दिशेला वाटचाल होते.

 

६. नरक चतुर्दशीच्या दिवशी केल्या जाणार्‍या विविध कृतींचे भक्तीयोगानुसार महत्त्व

अनु. क्र.

कृती

भक्तीयोगानुसार महत्त्व

(प्रतिशत)

१. ब्राह्मणभोजन २०
२. वस्त्रदान १०
३. यमदीपदान २०
४. प्रदोषपूजा २०
५. शिवपूजा ३०
एकूण १००

– सूक्ष्म जगतातील ‘एक ज्ञानी’ (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून)

 

७. दिवाळीविषयीचे लघुपट पहा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

1 thought on “नरक चतुर्दशी”

  1. Very good information to be followed and it’s significance, expect such for each festival to reach maximum people on this earth

    Reply

Leave a Comment