अभ्यंगस्नान

Article also available in :

अनुक्रमणिका

१. अभ्यंगस्नान : अर्थ

२. वर्षभरात अभ्यंगस्नान करण्याचे दिवस

३. अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व

४. अभ्यंगस्नान केल्याने होणारे लाभ

५. अभ्यंगस्नानाची कृती

६. अनुभूती

७. चलच्चित्र (video)


गुढीपाडवा, दिवाळी इत्यादी सणांना ‘अभ्यंगस्नान’ करावे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे काय, त्याची प्रत्यक्ष कृती, त्याने होणारे लाभ, अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व आणि यामुळे आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.

 

अभ्यंगस्नान
अभ्यंगस्नान

 

१. अभ्यंगस्नान : अर्थ

अ. अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून डोक्याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्याने स्नान करणे

आ. शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान.

इ. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान

 

२. वर्षभरात अभ्यंगस्नान करण्याचे दिवस

अ. संवत्सरारंभ

आ. वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा

इ. दिवाळीचे तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा.

 

३. अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व

अभ्यंगाने, म्हणजेच स्नानापूर्वी तेल लावण्याने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व, म्हणजेच अखंडत्व प्राप्त होते. स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृत अवस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. पंचप्राणांच्या जागृततेमुळे देहातील टाकाऊ वायू ढेकरा, जांभया इत्यादींद्वारे बाहेर पडतात. यामुळे देहातील पेशी, स्नायू आणि अंतर्गत पोकळ्या चैतन्य ग्रहण करण्यात संवेदनशील बनतात. हा टाकाऊ वायू किंवा देहात घनीभूत झालेली उष्ण टाकाऊ ऊर्जा कधी कधी लहरींच्या रूपात डोळे, नाक, कान आणि त्वचेची रंध्रे यांतून बाहेर पडते; म्हणून तेल लावून झाल्यावर कधी कधी डोळे आणि मुख (चेहरा) लाल होतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.९.२००७, दुपारी २.०८)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

 

४. अभ्यंगस्नान केल्याने होणारे लाभ

४ अ. अभ्यंगस्नानामुळे होणारे शारीरिक लाभ

१. त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते, म्हणून तेल लावतात.

२. ऊन पाणी हे मंगल आणि शरीराला सुखदायक आहे; म्हणून ऊन पाण्याने स्नान करतात. तेल लावून नंतर स्नान करण्याने त्वचेला आणि केसांना आवश्यक तेवढाच ओशटपणा रहातो; म्हणून स्नानापूर्वी तेल लावणे आवश्यक आहे. स्नानानंतर तेल लावणे उचित नाही.

४ आ. अभ्यंगस्नानामुळे होणारे आध्यात्मिक लाभ

१. स्नानामुळे रज-तम गुण एक लक्षांश इतके कमी होऊन सत्त्वगुण त्याच प्रमाणात वाढतात आणि त्यांचा प्रभाव नेहमीच्या स्नानामुळे सुमारे तीन तास टिकतो, तर अभ्यंगस्नानामुळे चार ते पाच तास टिकतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

२. ‘तेलाच्या त्वचेवरील घर्षणात्मक मर्दनाने देहाची सूर्यनाडी जागृत होऊन पिंडातील चेतनेलाही सतेज बनवते. ही सतेजता देहातील रज-तमात्मक लहरींचे विघटन करते. ही एकप्रकारची शुद्धीकरणप्रक्रियाच आहे. चैतन्याच्या स्तरावर घडलेल्या शुद्धीकरणप्रक्रियेने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व प्राप्त झाल्याने जिवाचे प्रत्येक कर्म हे साधना म्हणून घडते.

३. या कर्मामुळे जिवाच्या देहात सत्त्वगुणाचे संवर्धन होण्यास साहाय्य झाल्याने जिवाचा अभ्युदय साधतो. अभ्युदय म्हणजे उत्कर्ष. जिवाचा सत्त्वगुणसंवर्धनाकडे होत असलेला नित्य प्रवास, म्हणजेच त्याचा अभ्युदय होय. यासाठी अभ्यंगस्नानाला अत्यंत महत्त्व आहे.

४. अभ्यंगस्नानातून निर्माण झालेल्या चैतन्याच्या स्तरावर घडणारी प्रत्येक कृती जिवाच्या हातून साधना म्हणून झाल्याने या कृतीमुळे वायूमंडलाचीही शुद्धी होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.९.२००७, दुपारी २.०८)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

 

५. अभ्यंगस्नानाची कृती

तेल, उटणे आणि त्यांचे मिश्रण

तेल, उटणे आणि त्यांचे मिश्रण

व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरिराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात.

तेल आणि उटणे यांचे मिश्रण अंगाला लावणे

तेल आणि उटणे यांचे मिश्रण अंगाला लावणे

दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत

दिवाळीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे अंगाला लावण्याची पद्धत कशी असावी, याचे विश्लेषण येथे देत आहोत. उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे. प्रत्येक ठिकाणी दिलेली उटणे लावण्याची पद्धत त्या त्या पोकळीत असणार्‍या त्रासदायक वायूंच्या गतीला अनुसरून दिली आहे.

अ. स्वतःला उटणे लावणे

१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे.
२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे.
३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.
४. नाक : याला लावतांना उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे अन् खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.
५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून आरंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.

६. गालांच्या पोकळी : गालाच्या मध्यभागातून आरंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे.
७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हलवून उटणे लावावे.
८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.
९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे
१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे.
११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला अन् चार बोटे दुसर्याम बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.
१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.
१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा : पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा अन् तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.
१४. डोक्याच्या मध्यभागी : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.

आ. दुसर्‍या व्यक्तीला उटणे लावणे

१. पाठ : दुसर्‍या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.
२. कंबर : दुसर्‍या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.

– एक विद्वान (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून.) (३.१०.२००६)

५ अ. देशकालकथन

अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.

५ आ. देशकालकथनाचे महत्त्व

‘ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत ब्रह्मदेवाची किती वर्षे झाली; कोणत्या वर्षातील कोणते आणि कितवे मन्वंतर चालू आहे; या मन्वंतरातील कितवे महायुग आणि त्या महायुगातील कोणते उपयुग चालू आहे, या सर्वांचा उल्लेख देशकालकथनात असतो. यावरून यापूर्वी केवढा मोठा काळ गेला आहे आणि राहिलेला काळही केवढा मोठा आहे, याची कल्पना येते. ‘आपण फार मोठे आहोत’, असे प्रत्येकाला वाटत असते; पण ‘आपण किती लहान तथा सूक्ष्म आहोत’, याची कल्पना या विश्वाच्या अफाट काळावरून येते. यामुळे माणसाचा गर्व नाहीसा होतो.’

 

६. अनुभूती

अभ्यंगस्नानाने देहावरील जड आवरण
तुटल्याचे जाणवून संपूर्ण शरिरामध्ये हलकेपणा जाणवणे

‘८.११.२००७ या दिवशी, म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठल्यावर उत्साह जाणवत होता. अभ्यंगस्नान करतांना माझ्या देहावरील जड आवरण निघून गेल्याचे जाणवून संपूर्ण शरिरामध्ये हलकेपणा जाणवला आणि मिळालेली शीतलता बराच वेळ टिकून होती.’ – कु. स्वप्नाली चव्हाण, गोवा.

 

चलच्चित्र (video) – अभ्यंगस्नान

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

1 thought on “अभ्यंगस्नान”

Leave a Comment