नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमी

नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमीच्या दिवशी करावयाची नागांची उपासना यांविषयीची माहिती जाणून घेऊया.

१. नागांची निर्मिती

कश्यप ऋषी आणि कद्रू यांच्यापासून सर्व नागांची निर्मिती झाली.

२. नागांचे प्रकार

त्रिगुणांप्रमाणे नागांचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

२ अ. तामसिक नाग

हे नाग प्रामुख्याने काळ्या रंगाचे असून ते पाताळातील नागलोकात निवास करतात. मोठ्या वाईट शक्ती या नागांचा सूक्ष्म युद्धामध्ये शत्रूवर विषप्रयोग करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करतात. पाताळातील नाग हे पृथ्वीवर नागांपेक्षा लक्ष पटींनी सामर्थ्यवान आणि सहस्र पटींनी विषारी असतात.

२ आ. राजसिक नाग

हे नाग पृथ्वीवर वास करतात. नागयोनीमध्ये जन्म मिळाल्यामुळे या नागांचे आचरण सर्वसामान्य नागांप्रमाणे असते. ते काळे, निळसर, तपकिरी, चॉकलेटी आदी रंगांचे असतात.

२ इ. सात्त्विक नाग

हे नाग दैवी असल्यामुळे ते शिवलोकाजवळील दैवी नागलोकात वास करतात. त्यांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांच्या मस्तकावर लाल किंवा निळ्या रंगाचा नागमणी असतो. सात्त्विक नाग हे पाताळातील नागांच्या तुलनेत लक्ष पटींनी सामर्थ्यवान असतात. सात्त्विक नागांना विविध देवतांनी धारण केले आहे. शिवाच्या गळ्यात वासुकी असतो. गणपतीच्या पोटाला वेटोळे घातलेला जागृत विश्‍वकुंडलीनीचे प्रतीक असणारा पिवळा नाग पद्मनाभ आहे. श्रीविष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडतो. सात्त्विक नाग सिद्ध आणि ऋषिमुनी यांच्या आधीन असतात. ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेने साधक आणि आश्रम यांचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी सनातनच्या विविध आश्रमांभोवती सूक्ष्मातून पिवळ्या नागांचे सैन्य तैनात आहे. पिवळे नाग उच्च देवतांचे उपासक असल्यामुळे त्यांच्याकडे दैवी बळ आहे. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचे, म्हणजे संकल्पानुसार कार्य करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे.

३. नागांची उपास्य देवता

शिव हा सर्व नागांचा अधिपति आहे. बहुतांश नाग शिवाचीच उपासना करतात. काही नाग विष्णूची, तर काही नाग श्रीगणेशाची उपासना करतात.

४. देवतांच्या श्रेणीतील नागांचे स्थान

अ. नागदेवता या गौण देवतांमध्ये गणल्या जातात.

आ. काही ठिकाणच्या स्थानदेवता म्हणूनही त्या कार्य करत असतात.

इ. नागदेवतांचे स्थान पिंपळाच्या किंवा वडाच्या वृक्षाखाली किंवा मोठ्या वारुळात असते.

ई. सातेरी देवीचा वास वारुळात असतो. देवीची सेवा करण्यासाठी आणि तिचे गण बनून कार्य करण्यासाठी सात्त्विक नाग वारुळात वास करतात.

५. पूर्वज आणि नाग यांचा परस्परांशी असणारा संबंध

भुवलोक आणि पितृलोक येथे अडकलेले पूर्वज बहुदा काळ्या नागांच्या रूपात वंशजांना दर्शन देतात. सात्त्विक पूर्वज पिवळ्या नागांच्या रूपात दर्शन आणि आशीर्वाद देतात. घर, संपत्ती आणि कुटुंबीय यांच्याविषयी पुष्कळ आसक्ती असणार्‍या पूर्वजांना पृथ्वीवर नागाच्या योनीत जन्म मिळतो. मनुष्य जन्मात इतरांना त्रास देऊन वाममार्गाने संपत्ती अर्जित केलेल्या पूर्वजांना पुढील जन्म पाताळातील काळ्या नागांच्या रूपाने मिळतो. देवकार्यात सहभागी असणारे आणि सज्जन प्रवृत्तीचे पूर्वज हे पितृलोकात निवास केल्यानंतर काही काळ शिवलोकाजवळील दैवी नागलोकात पिवळ्या नागांच्या रूपाने वास करतात.

६. कलियुगातील मनुष्याने नागांची स्थाने
असणारी नागबने नष्ट केल्यामुळे मनुष्याला नागांचा उपद्रव होणे

कलियुगाच्या आरंभापर्यंत विविध ठिकाणच्या देवतांना त्यांचे स्वतंत्र स्थान दिले जायचे, उदा. स्थानदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपालदेवता इत्यादी. त्याप्रमाणे भारतातील प्रत्येक गावात नागांना रहाण्यासाठी नागबन होते. या ठिकाणी मोठमोठे दाट वृक्ष जवळ-जवळ असायचे आणि त्यांच्या बुंध्याच्या मुळाशी वारुळ असायचे. प्रत्येक गावातील नाग तेथे रहायचे. (अशी नागबने अजूनही कर्नाटक राज्यातील मुल्की, सुरतकल आदी ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात.) नागांना स्वतंत्र स्थान दिल्यामुळे ते मनुष्याला त्रास देत नसत आणि मनुष्य अन् त्याची संपत्ती यांचे रक्षण करायचे. विज्ञानयुगातील मानवाने भौतिक प्रगती करण्यासाठी गावोगावी असणारी नागबने नष्ट करून तेथे मोठमोठ्या इमारती बांधल्या. त्यामुळे मनुष्याला नागांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. केरळ राज्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारे नागबनांचा विध्वंस करून तेथे इमारती बांधल्यामुळे तेथील हिंदूंना नागदंश होणे, स्वप्नात नाग दिसणे, घरात सतत आजारपण असणे यांसारखे त्रास होतात, असे एका साधकाने मला काही वर्षांपूर्वी सांगितले.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान)

७. नागपंचमी

श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते; म्हणून या तिथीला ‘नागपंचमी’ म्हणतात.

७ अ. नागपंचमीचा इतिहास

७ अ १. कालियामर्दनाची तिथी : श्रावण शुक्ल पक्ष पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात असतांना यमुनेच्या डोहात उडी घेऊन कालिया नागाचे मर्दन केले.

७ अ २. सर्पयज्ञाच्या सांगतेचा दिवस : या दिवशी आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून जनमेजय राजाने सर्पयज्ञ करणे थांबवले आणि आस्तिक ऋषींनी विश्‍वातील सर्व नागांना अभय दिले.

७ आ. नागाच्या पूजनाचे महत्त्व : शिवाने जेव्हा हलाहल विषाचे प्राशन केले तेव्हा त्याला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले आणि त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत. त्यांच्या पूजनाने चैतन्यलहरींना धारण करणार्‍या समुहाचेच पूजन होते.

७ आ १. पूजनाचा विधी : या दिवशी गारुडी लोक नाग आणतात. त्याची पूजा करून त्याला दूध देतात. घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत.

७ आ २. पूजनाची फलप्राप्ती : नऊ नागांचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०१७)

८. नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी झोका खेळण्यामागील शास्त्र

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोक्‍त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा परंपरांगत चालत आली आहे. झोका खेळण्यामागील इतिहास आणि झोका खेळतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, याचे सनातनच्या साधिकेने केलेले सूक्ष-परीक्षण या लेखातून मांडले आहे.

स्त्रिया झोका खेळतांना

८. अ. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास

पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.

८. आ. महत्त्व

वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते, तेव्हा भावाची ५ टक्के आध्यात्मिक आणि ३० टक्के व्यावहारिक उन्नती होते.

 

९. नागपंचमीच्या दिवशी ‘झोका खेळणे’ या कृतीचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

‘श्रावणमासातील नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी झोका खेळणे, म्हणजे आनंद अनुभवणे होय

१. स्त्री झोका खेळतांना तिच्या दिशेने ईश्‍वरी आनंदाचा प्रवाह आकृष्ट होणे

१ अ. स्त्रीमध्ये आनंदाचे वलय निर्माण होऊन वातावरणात आनंदाच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होणेआ. वातावरणात आनंदस्वरूप चैतन्याचे कण पसरणे

२. ईश्‍वराकडून स्त्रीकडे चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होणे

२ अ. स्त्रीमध्ये चैतन्याचे वलय कार्यरत स्वरूपात फिरणे

३. झोका खेळतांना झोका खाली येतो, तेव्हा स्त्रीमध्ये भावाचे वलय निर्माण होणे
४. झोका खेळतांना झोका वर जातो, तेव्हा स्त्रीमध्ये मारक शक्‍तीचे वलय निर्माण होणे, तसेच तिच्यामध्ये इच्छाशक्‍तीतून क्रियाशक्‍ती कार्यरत होणे

४ अ. स्त्रीच्या देहात मारक शक्‍तीचे कण पसरणे

४ आ. देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे

५. झोका खेळतांना स्त्रीला होणार्‍या वायूच्या स्पर्शातून तिला वायूतत्त्व प्राप्त होणे

५ अ. स्त्रीच्या देहाभोवती वायूतत्त्वात्मक वलय निर्माण होणे’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा, आषाढ कृ. ११, कलियुग वर्ष ५१११ (१८.७.२००९)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’ ! प्राचीनकाळी सत्येश्‍वरी नावाच्या एका कनिष्ठ देवीला सत्येश्‍वर नावाचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून महिला नागपंचमी साजरी करतात.

महाराष्ट्रातही नागपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होते. बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा होती. नागपंचमीच्या दिवशी स्वतः गोरक्षनाथ महाजनांच्या घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी ‘माई भिक्षा वाढ’ अशी हाक दिली. महाजनांच्या सुनेला बाहेर यायला थोडा वेळ झाला. गोरक्षनाथांनी विचारले, ‘एवढा वेळ का ?’ त्या महिलेने उत्तर दिले की, आज नागपंचमी आहे, म्हणून मी नाग प्रतिमेची पूजा करत होते. गोरक्षनाथ म्हणाले, ‘‘आजपासून या गावामध्ये जिवंत नागाची पूजा होईल.’’ त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मंत्र सामर्थ्याने त्या ठिकाणी जिवंत नाग प्रकट केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी बत्तीस शिराळा येथे जिवंत नागाची पूजा होऊ लागली.

साधारण ३ वर्षांपूर्वी काही पर्यावरणवाद्यांनी नाग पकडण्याच्या प्रथेला आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. न्यायालयानेही वर्ष २०१५ मध्ये नाग किंवा तत्सम प्राण्यांना पकडून त्यांचे जाहीर प्रदर्शन करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत असे आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून ही परंपरा बंद झाली. बिहारमधील समस्तीपूरमध्ये आणि अशा अन्य ठिकाणी जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा मात्र कायम आहे. बहुतांश ‘जन्महिंदूं’ ना धर्मशिक्षण नसल्याने सण उत्सवांमध्ये अपप्रकार घडतात. बत्तीस शिराळ्यातही काही मोजक्या व्यक्तींकडून नाग पकडून त्यांचे निरनिराळ्या पद्धतीने हाल करण्यात आले; पण यामुळे कायदा आणून परंपरेलाच निर्बंध घालण्यात आले. या प्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिराळा ग्रामवासियांना ‘परंपरेला खंडित होऊ देणार नाही, त्यासाठी कायद्यात योग्य तो पालट करण्याचा प्रयत्न करू’, असे आश्‍वासन दिले.

नवनाथांपैकी एक असलेल्या गोरक्षनाथांनी प्रारंभ केलेल्या या परंपरेवर घातलेल्या निर्बंधांचा पुन्हा एकदा विचार व्हायला हवा, अशी श्रद्धाळू हिंदूंची मागणी आहे. लोकांना धर्मशिक्षित करून सण योग्यरित्या साजरे करण्याचे महत्त्व त्यांच्यावर बिंबवायला हवे. शासनाने धर्मशास्त्रासहित गोरक्षनाथांनी दिलेल्या प्रचीतीचाही विचार करावा, तरच सण उत्सव टिकून रहातील. यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !

 – श्री. केतन पाटील, पुणे

1 thought on “नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमी”

Leave a Comment