भगवान शिवाला स्मरून चैतन्यशक्तीच्या बळावर कार्य करणार्‍या अहिल्याबाई होळकर !

‘एक स्त्री असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समर्थपणे राज्यकारभार करून अहिल्याबाई होळकर यांनी २८ वर्षे इंदूर राज्यकारभाराची धुरा कशी सांभाळली ?’, याविषयीचे मर्म जाणून घेऊया.

१. अहिल्याबाई होळकर यांनी केलेली शिवोपासना आणि त्यांचे कार्य

१ अ. शिवाच्या उपासनेतून स्वतःमध्ये चैतन्य
निर्माण करून राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळणे

अहिल्याबाई होळकर भगवान शिवाच्या भक्त होत्या. त्या प्रतिदिन शिवाची पूजा करत. शिवाच्या उपासनेतून त्यांनी स्वतःमध्ये चैतन्य निर्माण केले होते. त्या चैतन्यशक्तीच्या द्वारेच त्यांनी राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळली.

१ आ. सतत शिवाची पिंडी समवेत ठेवणे आणि शिवाला स्मरून कार्य करणे

कोणतेही कार्य यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी चैतन्यशक्तीची आवश्यकता असते. याची जाणीव अहिल्याबाई यांना होती. त्यांचा भगवंताविषयी भाव होता. ‘भगवंताची चित्शक्तीच सतत कार्य करत असते’, हा भाव ठेवूनच त्या सतत शिवाची पिंडी समवेत ठेवत असत. भगवान शिवाला स्मरून त्याच्यातील चैतन्यशक्तीद्वारे त्या कार्य करत. यामुळे त्या करत असलेल्या कार्याला यश मिळत गेले. कार्य करतांना त्यांच्यात कुठेच अहंभाव नव्हता. यावरून ‘भगवंताच्या चैतन्यामध्ये किती शक्ती आहे’, हे लक्षात येते.

१ इ. स्वतःसमवेत सर्वांनी शिवाची उपासना करावी, यासाठी शिवाचे मंदिर बांधणे

स्वतःसमवेतच सर्वांनी चैतन्यशक्तीद्वारे कार्य करावे, शिवाची उपासना करावी, यासाठी त्यांनी शिवाचे मंदिर बांधले. ‘मंदिरातील चैतन्यशक्तीचा लाभ सर्व जनतेला होईल आणि आपोआपच सर्व जनता योग्य आचरण करील’, अशी त्यांची श्रद्धा होती.

१ ई. जुन्या देवळांचा जीर्णोद्धार करणे आणि धर्मशाळा बांधणे

अहिल्याबाई होळकर यांनी अनेक जुन्या देवळांचा जीर्णोद्धार केला. प्रजेच्या सुखसुविधांसाठी त्यांनी नदीकिनारी अनेक घाट बांधले, तसेच अनेक धर्मशाळाही बांधल्या. ‘राज्यातील जनतेचा खर्‍या अर्थाने विकास कशामुळे होणार आहे ?’, याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी देवळांचा जीर्णोद्धार आणि धर्मशाळा यांना महत्त्व दिले; कारण त्यातील चैतन्यशक्तीमुळेच लोकांमध्ये जागृती होऊन ते सदाचाराने वागत असत. त्यामुळेच राज्यात शांतता आणि सुव्यवस्था होती अन् प्रजा सुखी होती.

१ उ. राघोबा पेशवे इंदूरवर स्वारी करणार असल्याचे कळल्यावर
अहिल्याबाईंनी त्यांना दिलेल्या सणसणीत उत्तरावरून ‘त्यांच्यातील हा
कणखरपणा आणि लढवय्या वृत्ती केवळ चैतन्यशक्तीमुळे निर्माण झाली’, हे लक्षात येणे

राघोबा पेशवे यांनी इंदूरवर स्वारी करून होळकरांचे राज्य बळकावण्याचा मनसुबा आखल्यावर अहिल्याबाई होळकर यांनी राघोबादादांना पत्राद्वारे सणसणीत उत्तर दिले, ‘माझ्याशी लढतांना तुम्ही जिंकलात, तर स्त्रीशी लढून कोणता पुरुषार्थ दाखवणार आहात ? जर तुम्ही या युद्धात हरलात, तर स्त्रीकडून पराजित झाल्यामुळे तुम्हाला जगाला तोंड दाखवता येणार नाही. त्यामुळे युद्ध करण्यापूर्वी विचार करा.’ हे पत्र वाचून राघोबांनी युद्ध करण्याचे टाळले. ‘एका महिलेमधील हा कणखरपणा आणि लढवय्या वृत्ती ही केवळ चैतन्यशक्तीमुळे निर्माण झाली’, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळेच अहल्याबाई सर्वांसाठीच आदर्श ठरल्या.

२. भारताची केविलवाणी सद्यःस्थिती सुधारण्यासाठी सर्व
शासनकर्त्यांनी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक !

भारताची अत्यंत केविलवाणी सद्यःस्थिती पाहिल्यास सर्व शासनकर्त्यांनी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक आहे; कारण आतंकवादी आक्रमण, नक्षलवाद, भ्रष्टाचार, शेतकर्‍यांच्या समस्या, पर्यावरणातील प्रदूषण इत्यादी अनेक समस्यांमुळे मनुष्याला जिवंत रहाणेही कठीण झालेले आहे. या सर्व समस्यांसाठी कुणाकडे काहीच उपाययोजना नाही. यावर चैतन्यशक्तीला जागृत करणे, हा एकच उपाय आहे; कारण या स्थितीला सावरण्याचे सामर्थ्य केवळ चैतन्यशक्तीत आहे, जी शाश्‍वत, चैतन्यमय आणि आनंदमय आहे. यासाठी प्रत्येकाने भगवंताला शरण जाऊन भगवंताची उपासना करणे आवश्यक आहे.

३. साधकांनी अहिल्याबाई होळकर यांच्याप्रमाणे चैतन्यशक्तीला स्मरून कार्य करावे !

साधकांनी धर्मप्रसार करतांना अहिल्याबाई होळकर यांच्याप्रमाणे चैतन्यशक्तीला स्मरून ‘सतत ती समवेत आहे’, असा दृढ विश्‍वास धरून कार्य केल्यास कार्याला शीघ्रतेने यश येईल आणि साधकांचीही आध्यात्मिक उन्नती होईल.

अहिल्याबाई होळकर यांनी शिवाची पिंडी सतत समवेत ठेवली. त्याप्रमाणे साधकांनी सतत भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना स्मरून कार्य करावे. त्यामुळे गुरूंच्या अनुसंधानात राहून आपली साधना योग्य प्रकारे होऊन आपले प्रत्येक कार्य यशस्वी होईल.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.६.२०१७)

Leave a Comment