बाजीप्रभु देशपांडे : दुर्दम्य स्वराज्यनिष्ठेचा आदर्श

        मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या सारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. स्वराज्याविषयीचा अभिमान आजही आपल्या रोमरोमात भिनवणार्‍या बाजीप्रभूंचा पराक्रम त्यांच्या राष्ट्र आणि धर्मनिष्ठेचे दर्शन घडवते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी आत्मबलिदान दिलेल्या अशा बाजीप्रभु आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभु देशपांडे या पराक्रमी लढवय्यांच्या बलीदानदिनानिमित्त सदर लेख प्रकाशित करत आहोत.

बाजीप्रभु लढलेल्या पावनखिंडीतील हीच ती अरूंद चढण

पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील हिरडसचे सरदार म्हणजे बाजीप्रभु देशपांडे ! हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्‍या बांदलांचे ते दिवाण होते. बाजीप्रभु देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातले २०-२२ घंटे काम करूनही न थकणार्‍या बाजीप्रभूंचा संपूर्ण मावळ पट्ट्यात मोठा दबदबा होता. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजीप्रभूंनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांच्या चरणी वाहिली.

बाजीप्रभु देशपांडे यांनी पावनखिंड लढवून मिळवलेल्या विजयाची निशाणी

सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजीप्रभु विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली, हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच बाजीप्रभूंनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. सहस्त्रोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ घंटे चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतांनाही बाजीप्रभु आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ घंटे खिंड लढविली. पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील (पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते.

        मुसलमानी सैन्य अडवितांना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजीप्रभु, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजीप्रभूंना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० या दिवशी घडल्याची इतिहासात नोंद आहे.) मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजीप्रभूंसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजीप्रभु – फुलाजीप्रभु बंधूंवर विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

रणचंडीचे जणू पुजारी, पावनखिंडीचे गाजी ।
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी ॥
(संदर्भ : संकेतस्थळ)

Leave a Comment