हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य !

Article also available in :

आतापर्यंत आपण हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, धर्माची वैशिष्ट्ये, हिंदु धर्म आणि अन्य पंथ (धर्म) यांतील भेद इत्यादींविषयी विविध लेखांद्वारे समजून घेतले.

‘हिंदु धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य कसे आहे’ याविषयी आणि ‘एक हिंदू’ म्हणून धर्मरक्षण करण्यासाठी आपण काय कृती करू शकतो, याविषयी या लेखातून दिशादर्शन करण्यात आले आहे.

 

१. धर्मरक्षणाचा इतिहास

१ अ. अवतार

`भगवंताने युगायुगांपासून अवतार धारण करून ‘सनातन वैदिक धर्मा’वर, म्हणजे ‘हिंदु धर्मा’वर आक्रमण करणार्‍या राक्षसांचा परिहार करून धर्मरक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. श्रीराम, श्रीकृष्ण आणि परशुराम हे अवतार तर विशेष प्रसिद्ध आहेत.

१ आ. धर्मसंस्थापक

खिस्ताब्द पूर्व ५ व्या शतकात बौद्धमताचे प्राबल्य निर्माण झाले, तेव्हा त्याचे वैचारिक खंडण करून आद्य शंकराचार्यांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पुन्हा प्रस्थापित केले.

१ इ. संत-महात्मे

१. संत एकनाथ महाराज यांनी समाजाला भागवतातील विविध दाखले देऊन अर्जुनाप्रमाणेच अधर्माविरुद्ध पेटून उठण्याला प्रवृत्त केले.

२.‘दया हेचि नाम । भूतांचे कारण ।। आणिक निर्दालन । कंटकांचे ।।’, असा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी केला.

३. राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या एका शिष्याला मोगल सरदाराने कह्यात घेतले होते. हे समजताच समर्थांनी स्वतः जाऊन त्या सरदाराला झोडपले आणि शिष्याची सुटका केली.

४. एकदा नौकेवरील (जहाजावरील) प्रवासात एका विदेशी व्यक्तीने हिंदु धर्माविरुद्ध गरळ ओकायला प्रारंभ केला. त्या क्षणीच स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीची मानगूट पकडून गरजले, “यापुढे एक अक्षर उच्चारले, तर उचलून समुद्रात फेकून देईन !”

५. गोमंतकात पोर्तुगिजांनी बाटवलेल्या सहस्रो हिंदूंना स्वधर्मात घेण्यासाठी प.पू. मसूरकर महाराज यांनी मोठी शुद्धीकरण चळवळ राबवली.

१ ई. राजे-महाराजे

राजा दाहिर (७ वे शतक), पृथ्वीराज चौहान (१२ वे शतक), सम्राट कृष्णदेवराय (१५ वे शतक), छत्रपती शिवाजी महाराज (१६ वे शतक), बाजीराव पेशवे (१८ वे शतक) यांसारखे हिंदु राजे-महाराजे यांनीही हिंदु धर्मावर झालेल्या परकियांच्या आक्रमणांपासून हिंदु धर्माचे रक्षण केले.

१. मोगलांनी मंदिरे उद्ध्वस्त करून उभारलेल्या अनेक मशिदी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडल्या आणि तिथे पुन्हा मंदिरे स्थापली.

२. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी येथील विश्वेश्वराच्या भग्न मंदिराचा पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांनी इंदूरहून काशी येथे जाऊन जिर्णोद्धार केला.

 

२. धर्मरक्षणाचे महत्त्व

२ अ. आध्यात्मिक दृष्टीकोनातून

१. ‘धर्माचा विनाश उघड्या डोळ्यांनी पहाणारा महापापी ठरतो, तर धर्मरक्षणाकरिता धडपडणारा मुक्तीचा अधिकारी बनतो’, असे धर्मवचन आहे.

२. जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण स्वतः धर्म (ईश्वर) करतो.

३. जो ईश्वर आपल्यात आहे, तोच ईश्वर आपल्या धर्मबांधवांतही आहे. एकीकडे धर्माचरण आणि साधना यांनी आपल्यातील ईश्वराला प्रसन्न करून घेतांना दुसरीकडे धर्मबांधवांवर आघात होत असतांनाही त्यांच्याविषयी संवेदनहीन रहाणे, याने त्यांच्यातील ईश्वर आपल्यावर कधीतरी प्रसन्न होईल का ?

४. कोणतीही गोष्ट काळानुसार करण्याला पुष्कळ महत्त्व असते. धर्मरक्षण करणे, हे सध्या काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. गुरुतत्त्वही काळानुसार योग्य असे धर्मपालन करायला शिकवते. धर्मरक्षणासाठी कौरवांशी लढल्यामुळे शिष्य अर्जुन गुरु श्रीकृष्णाला प्रिय झाला.

थोडक्यात धर्मरक्षणासाठी कृती केली, तर आपल्यावर ईश्वरी कृपा होते.

२ आ. राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून

‘सनातन धर्म आणि धर्मच हिंदुस्थानचे जीवन आहे. जेव्हा तो नष्ट होईल, तेव्हा हिंदुस्थानचा अंत होईल. मग तुम्ही कितीही राजकारण वा समाजसुधारणा करा, मग भलेही कुबेराची संपूर्ण संपत्ती या आर्यभूमीच्या प्रत्येक अपत्याच्या माथ्यावर ओता, सर्वच निष्फळ आहे.’ – स्वामी विवेकानंद

 

३. हिंदु धर्माची सद्यस्थिती

अवतार, ऋषीमुनी, संत आणि राजे-महाराजे यांनी अनादी काळापासून रक्षिलेला विश्ववंदनीय हिंदु धर्म आज सर्व दिशांनी संकटात सापडला आहे. धर्मद्रोही आणि हिंदुद्वेषी मंडळी राजरोसपणे हिंदु धर्मावर आघात करत आहेत. धर्मावर आघात करणारे धर्मांध पूर्वजांची परंपरा पुढे चालवत आहेत. यात भरीस भर म्हणून की काय, स्वतःला निधर्मी, पुरोगामी, विज्ञानवादी आणि समाजसुधारक म्हणवणार्‍या काही हिंदूंकडूनच धर्मावर आघात होत आहेत. आपल्या पूर्वजांनी रक्षिलेला महान हिंदु धर्म आपल्याला टिकवायचा असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्मावरील आघातांविषयी जाणून घेऊन ते रोखण्यासाठी कृती केली पाहिजे.

 

४. धर्मरक्षणासाठी हे करा !

अ. चित्रे, विज्ञापने (जाहिराती), नाटके, संमेलने, वृत्तपत्रे, उत्पादने आदी माध्यमांतून होणारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा ! देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करणारी उत्पादने वापरू नका !

आ. देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि देवळांमध्ये चोर्‍या होऊ नयेत यांसाठी देवस्थानांचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांचे प्रबोधन करा !

इ. हिंदुत्ववादी नेते आणि संत यांच्या हत्या रोखण्यासाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेऊन प्रतिकारक्षम बना !

ई. हिंदु संतांना होणारी अन्याय्य अटक आणि त्यांचा कारावासात होणारा छळ यांविरुद्ध चळवळ उभारा !

उ. हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखी हिंदुविरोधी कारस्थाने यांविरुद्ध हिंदूंचे प्रबोधन करा !

ऊ. ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’, ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ यांसारख्या धर्मविरोधी कायद्यांची निर्मिती, तसेच मंदिरे अनधिकृत ठरवून ती उद्ध्वस्त करण्यासारखी शासकीय धोरणे यांना न्याय्य मार्गाने प्रतिकार करा !

ए. विविध प्रलोभने दाखवून किंवा बळाने केल्या जाणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करा !

ऐ. हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्यावर टीका करणार्‍यांविरुद्ध पोलिसांत गार्‍हाणे (तक्रार) मांडा !

ओ. धार्मिक, तसेच सामाजिक उत्सव यांमध्ये अनुचित प्रकार (उदा. बलपूर्वक निधीसंकलन, हिडीस नाच, स्त्रियांची छेडछाड, मद्यपान इत्यादी) होऊ देऊ नका !

४ अ. धर्मरक्षणाच्या कृती करण्यातील सर्वसाधारण टप्पे

१. प्रबोधन : धर्महानी करणार्‍या व्यक्तीचे प्रबोधन करून तिला धर्महानी करण्यापासून परावृत्त करा !

२. निषेध : प्रबोधनानंतरही धर्महानी चालू राहिल्यास विविध मार्गांनी निषेध नोंदवा, उदा. पत्रे, ‘फॅक्स’ किंवा ‘इ-मेल’ पाठवा; दूरध्वनी करा !

३. निवेदन : धर्महानी रोखावी यासाठी शासनाला निवेदने द्या !

४. धर्मभावना दुखावल्याच्या कारणाखाली पोलिसांत गार्‍हाणी (तक्रारी) मांडा !

५. संयत आंदोलन : वरील प्रयत्नांनंतरही धर्महानी चालूच राहिल्यास संयत मार्गाने आंदोलने करा !

अशा विविध माध्यमांतून कर्तव्यभावनेने धर्मरक्षण केले, तर आपण भगवंताच्या कृपेस पात्र होऊ.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ वैध (सनदशीर) मार्गाने लढा देत आहेत. त्यांच्या कार्यात आपणही सहभागी व्हा !

सनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म कार्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा

कार्यात सहभागी होण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment