विषम आहार योग्य की अयोग्य ?

Article also available in :

मानवी शरिराचे भरण-पोषण ‘अन्ना’मुळे होते. आपला आहार सात्त्विक असावा. शास्त्रात आहाराची दोन अंगे सांगितली आहेत. आपण ती समजून घेऊया.

१. आहाराची दोन अंगे

१. सम आहार : नेहमी चांगला

उदा. पुरणपोळी + तूप किंवा आमरस + तूप

 

चांगला आहार : पुरणपोळी + तूप

चांगला आहार : पुरणपोळी + तूप

२. विषम आहार : नेहमी वाईट

उदा. फ्रूट सॅलेड (दूध + फळे)

 

विषम आहार : फ्रूट सॅलेड

विषम आहार : फ्रूट सॅलेड

२. विरुद्ध (विषम) आहाराचे प्रकार

काही अन्नपदार्थ काही व्यक्तींना देश, काल, अग्नि, प्रकृती, दोष, वय इत्यादींचा विचार करता हानीकारक ठरतात. अशा अन्नपदार्थांचा त्या व्यक्तीसाठी विरुद्ध आहारात समावेश होतो. विरुद्ध आहाराचे प्रकार पुढे दिले आहेत.

१. निसर्गतः विरुद्ध : मेंढीचे दूध आणि मोहरीच्या पाल्याची भाजी पचावयास जड असते अन् पचल्यानंतर शरीरात दोष वाढवते.

२. देशविरुद्ध : दमट वायूमान (हवामान) असलेल्या समुद्राकाठच्या किंवा दलदलीच्या प्रदेशात स्निग्ध किंवा शीत पदार्थ जास्त प्रमाणात खाणे; त्यामुळे शरिरात कफदोष वाढतो. शुष्क (कोरड्या) वायूमानात रुक्ष आणि तिखट पदार्थ खाणे.

३. कालविरुद्ध : वसंतऋतूत किंवा रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने कफदोष वाढतो. हिवाळ्यात थंड पदार्थ आणि उन्हाळ्यात उष्ण (गरम) पदार्थ खाणे.

४. अग्निविरुद्ध : शरिरातील अग्नि म्हणजे पचनशक्ति. पचनशक्ति अल्प (कमी) असतांना पचावयास जड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यास अपचन होते.

५. प्रकृतीविरुद्ध : पित्तप्रकृतीच्या व्यक्तीस तिखट, आंबट किंवा खारट आणि उष्ण (गरम) पदार्थ दिल्याने तिच्या शरिरातील पित्त वाढते.

६. सात्म्यविरुद्ध (अ‍ॅलर्जी) : एखाद्या व्यक्तीस एखाद्या अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी असल्यास रेच (जुलाब) होणे, पोटात दुखणे, पित्त उठणे इत्यादी लक्षणे होतात.

७. दोषवृद्धीमुळे विरुद्ध : दूध आणि मासे दोन्ही कफवर्धक असल्याने शरिरात कफ वाढतो.

८. अन्न शिजविण्याच्या भांड्याच्या गुणाच्या विरुद्ध : तांबे किंवा पितळ यांच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवल्यास निळसर रंग येतो.

९. वीर्यविरुद्ध : शीत आणि उष्ण अन्नपदार्थांचे एकत्र सेवन करणे, उदा. मासे अन् दूध. मासे उष्ण आहेत, तर दूध थंड आहे. त्यामुळे रक्तविकार आणि अपचन होते.

१०. दिनचर्याविरुद्ध : अधिक झोप घेणार्‍या व्यक्तीस कफवर्धक अन्न दिल्याने कफ वाढतो.

११. क्रमविरुद्ध : शौचास किंवा लघवी लागली असता मलमूत्रविसर्जन न करता आधी जेवण करणे.

१२. पाकविरुद्ध : कच्चे किंवा जळलेले अन्नपदार्थ खाणे. दोन वेळा तापवलेले किंवा शिजविलेले अन्नपदार्थ थंड झाल्यावर किंवा शिळे झाल्यावर परत उष्ण (गरम) करून खाऊ नयेत.

१३. प्रमाणविरुद्ध : मध, तूप, तेल, प्राण्यांची चरबी समप्रमाणात घेऊ नये. तूप आणि मध समप्रमाणात घेऊ नये.

१४. मनाविरुद्ध : आवडत नसलेले अन्नपदार्थ खाणे.

१५. संयोगविरुद्ध : दोन किंवा अनेक अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्यास शरिरास हानीकारक होऊ शकतात.

 

अ. दुधासमवेत फळे खाऊ नयेत; म्हणजेच मिल्कशेक, फ्रूट सॅलेड खाऊ नये.

आ. दुधासमवेत कुळीथ, वरी, वाल, मटकी, गूळ, दही, चिंच, जांभूळ आणि कोणताही आंबट पदार्थ खाऊ नये.

इ. दुधासमवेत लसूण, पालेभाज्या किंवा मुळा खाऊ नये. बरेच दिवस खाल्ल्याने त्वचेचे रोग होतात.

ई. पालेभाज्या किंवा मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये.

उ. तांदुळ आणि मुगाच्या डाळीच्या खिचडीत दूध घालू नये.

ऊ. दह्यासह उष्ण पदार्थ, फणस, ताडगोळा, दूध, तेल, केळे, मासे, मांस, चिकन किंवा गूळ खाऊ नये.

ए. दूध, ताक किंवा दह्यासह केळे खाऊ नये.

ऐ. चिकन किंवा हरणाचे मांस दह्यासह खाऊ नये.

ओ. निरनिराळ्या प्राण्यांचे मांस एकत्र शिजवून खाऊ नये.

औ. उडदाच्या डाळीसह मुळा खाऊ नये.

अं. मधासह तूप, चरबी, तेल आणि पाणी यांतील दोन, तीन किंवा चार पदार्थ एकत्र, समप्रमाणात घेऊ नयेत.

क. मधासह कमळबीज खाऊ नये.

ख. मासे किंवा खेकडा, बदक यांसारख्या जलचर प्राण्यांचे मांस, मध, गूळ, दूध, मुळा, भात, मोड आलेले धान्य, उडीद किंवा तीळ यांच्यासह खाऊ नये. बरेच दिवस खाल्ल्यास दृष्टीवर परिणाम होतो. तसेच शरिरास कंप सुटणे, ऐकू न येणे, अस्पष्ट उच्चार होणे, मानसिक अस्वस्थता आणि मृत्यू ही लक्षणे होतात.

ग. पालक तिळाच्या तेलात तळून खाऊ नये; त्यामुळे रेच (जुलाब) होतात.

घ. फणसाचे गरे खाल्ल्यावर विडा खाऊ नये.

३. विरुद्ध आहाराचे दुष्परिणाम

विरुद्ध आहार घेतल्यावर त्याचे दुष्परिणाम लगेच दिसून येत नाहीत. बरेच दिवस किंवा मास (महिने) झाल्यावर पुढील परिणाम आणि रोग होण्याची शक्यता असते.

त्वचेचे रोग, कोड, पुटकुळ्या उठणे, रक्तक्षय (अ‍ॅनीमिया) आणि रक्ताचे रोग, रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती, तोंडाचे रोग, अपचन, पोटाचे विकार, रेच, पोटफुगी, आम्लपित्त, ग्रहणी (बराच काळ चालणारे रेच), सूज, अशक्तपणा, वजन घटणे, आळस, रागीटपणा अन् मानसिक विकार.

एखाद्या माणसाची पचनशक्ती चांगली असल्यास तो विषही पचवू शकतो; पण आतडयाची किंवा धातूची पचनशक्ती अल्प (कमी) असल्यास त्याला रोग होण्याचा संभव असतो.

आजकाल आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये बर्‍याच रोगांचे मूळ सापडत नाही. अशा रोगांत, ’विशेषतः जीर्ण रोगांमध्ये वरील कारणांचा विचार केल्यास उपचारास योग्य दिशा मिळू शकेल’.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अन्नं ब्रह्म । : खंड १’ आणि सनातन-निर्मित ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व

Leave a Comment