पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण !

संत म्हणून सत्कार झाल्यावर प.पू. पांडे महाराज यांना चरणस्पर्श करतांना

या वेळी प.पू. पांडे महाराज म्हणाले, ‘‘मला ऐकून पुष्कळ आनंद झाला, हे होणारच होते.’’

प.पू. पांडे महाराज तुमचे मार्गदर्शन अन् तुम्हीच आमचे आधार ।

तुमच्याच श्रीचरणी अर्पिली कृतज्ञतासुमने अन् शरणागतभाव ॥

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते सन्मान स्वीकारतांना

देवद आश्रमवासियांना घडवूनी, गुरुकृपा प्राप्त केली ।

सद्गुरु (कु.) अनुराधाताईंच्या शुभहस्ते संत म्हणून उद्घोषित झाली ॥

लहान वयातील संत झाल्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार ।

देवद आश्रमातील संतांकडून त्यांना नमस्कार ॥

डावीकडून पू. गुरुनाथ दाभोलकर, पू. सुदामराव शेंडे, पू. पद्माकर होनप, पू. महादेव नकाते आणि पू. रमेश गडकरी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाक्याची प्रचीती…..

पू. (सौ.) अश्‍विनी यांच्या पाया पडतांना त्यांचे पती श्री. अतुल पवार

सोहळा झाल्यानंतर माझे पती श्री. अतुल पवार माझ्या पाया पडले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या एका वाक्याची आठवण झाली. जुलै २०१० मध्ये माझा स्तर ६१ टक्के होता. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांशी दूरभाषवरून बोलतांना ते मला म्हणाले होते. ‘तू पुढे संत होशील, त्या वेळी अतुल तुझ्या पाया पडेल ना…?’

काही क्षणांत पू. (सौ.) अश्‍विनी पवार
यांच्या तोंडवळ्यावर झालेले दोन भावांचे दर्शन !

कृतज्ञता भाव

संतपदाची घोषणा झाल्यानंतर आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना आलिंगन देतांना पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांना भावाश्रू येत होते. दोन्ही प्रसंगांत त्यांच्या तोंडवळ्यावरील भावांमध्ये वेगळेपण जाणवले. आधी त्यांच्या तोंडवळ्यावर कृतज्ञताभाव दिसत होता, तर आलिंगन देतांना त्यांच्या तोंडवळ्यावर बाल्यावस्था दिसून आली.

बालक भाव

‘रडणार्‍या लहान मुलाला आई जशी जवळ घेऊन त्याच्या तोंडवळ्यावरून हात फिरवते, अगदी तसेच सद्गुरु (कु.) अनुताईंनी पू. (सौ.) अश्‍विनी यांना जवळ घेऊन सर्वांना आईच्या मायेचे दर्शन घडवले आहे. ‘पू. (सौ.) अश्‍विनी यांचा तोंडवळा अन् नेत्रांतूनही ओघळणारे भावाश्रू गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचेच जणू आईला सांगत असावेत’, असे वाटते.

पू. शालिनी नेनेआजी यांचे आशीर्वाद घेतांना

या वेळी पू. नेनेआजी यांनी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांना ‘सर्व चांगले होईल’ असा आशीर्वाद दिला. पू. आजी आजारपणामुळे अंथरूणाला खिळून असतात.

गुरुपौर्णिमेसारख्या शुभदिनी संत म्हणून जाहीर होणे, तेही सद्गुरुंच्या वाणीतून आणि अनेक संतांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा दुग्धशर्करा योग आहे. त्यामुळेच हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. साधक आणि संत या दोघांसाठी चैतन्याची, भावभक्तीची उधळण परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’ हाच भाव साधकांनी अनुभवला.

संतत्रयींचे होता मीलन ।

साधकांसाठी भाग्याचा क्षण ॥

सद्गुरु पू. (कु.) अनुराधा वाडेकर (डावीकडे) अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू (उजवीकडे) या जणू सांगत आहेत…. ‘आमच्या पंगतीत लवकर येणार ना ?’

भरला हा संतमेळा, देवतांनाही लागला लळा ।
सृष्टीला आनंद झाला, साधकांसाठीही चैतन्य सोहळा ॥

डावीकडून खुर्चीवर बसलेले पू. सदाशिव परब, पू. पद्माकर होनप, सद्गुरु राजेंद्र शिंदे, प.पू. पांडे महाराज, पू. गुरुनाथ दाभोलकर, पू. सुदामराव शेंडे, पू. दत्तात्रय देशपांडे. डावीकडून उभे असलेले पू. महादेव नकाते, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. विनायक कर्वे, पू. (सौ.) अश्‍विनी पवार, श्री. अतुल पवार, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. रमेश गडकरी

स्त्रीही असे जगत्जगनी, दोन कुळांची उद्धरणी ॥
संतकन्या लाभलेले भाग्यवान कुटुंब !

डावीकडून पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचे वडील श्री. सदाशिव साळुंखे, आई सौ. पुष्पा साळुंखे, मध्यभागी पू. (सौ.) अश्‍विनी, पती श्री. अतुल पवार, भाऊ श्री. सचिन साळुंखे

कृतज्ञतेचा सोहळा असे गुरुपौर्णिमा ।
साधना जाणून कृती करा अन् भावभक्तीचा आनंद मिळवा ॥

संतपद प्राप्त झाल्यानंतर पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी
गुरुपौर्णिमेच्या भावसोहळ्यात साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

  • ‘आपल्याला गुरुचरणांची सेवा मिळाली आहे’, या भावाने प्रत्येक सेवा करावी. आपली पुष्कळ जन्मांची साधना असल्याने आपल्याला गुरुकार्य करण्याची संधी लाभते.
  • ‘हातात आले, त्याचे सोने करायचे’, हे सर्वांनी लक्षात ठेवून तळमळीने सेवा आणि साधनेचे प्रयत्न करावेत.
  • परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला सेवेचे महत्त्व सांगतात. सेवा परिपूर्ण करून त्यांचा विश्‍वास आपल्याला जतन करता येतो.
  • सेवेचे मूल्य कधीही अल्प करू नये. ‘सेवा हे गुरुचरणांजवळ जाण्याचे माध्यम आहे’, हा भाव ठेवायला हवा.
  • शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक किंवा कोणताही त्रास झाला, तरी आपला देह आणि मन हे गुरुसेवेतच ठेवावे. शारीरिक त्रास असूनही सतत सेवारत रहाणारे उदाहरण म्हणजे सद्गुरु राजेंद्र शिंदे ! त्यांच्याप्रमाणेच आणखीही उदाहरणे आहेत.
  • सेवा हे आपल्या साधनेचे प्रमाण आहे. देव सेवा पहातो. त्यामुळे भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा, तसेच ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ या भावाने केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते.

Leave a Comment