तुळशीविवाहाचा पूर्णपणे सुकलेल्या तुळशीवर होणारा परिणाम : यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास

तुळशीविवाहासाठी सजवलेली तुळस आणि बाळकृष्ण

१. प्रस्तावना आणि उद्देश

‘तुळस घरोघरी प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ पूजली जाते. देवतांना नैवेद्य दाखवतांना त्यावर तुळशीचे पान ठेवतात. तुळस श्रीविष्णूला अतीप्रिय आहे. श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशीविवाहाचा विधी आहे. हा विधी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी सायंकाळी करतात. ‘तुळशीविवाहाचा तुळशीवर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ११.११.२०१६ आणि १२.११.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे सुकलेल्या तुळशीचे तुळशीविवाहापूर्वी आणि विवाहानंतर ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे निरीक्षण करण्यात आले. या दोन्ही निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

अ. सुकलेली तुळस

प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील सज्जामध्ये ठेवलेल्या या तुळशीला तेे प्रतिदिन पाणी घालत होते. ही तुळस २९.७.२०१६ या दिवशी दुपारी सुकल्याचे लक्षात आले. याच दिवशी सायंकाळी प.पू. डॉक्टर आजारी पडले. ही तुळस वाईट शक्तींच्या (टीप) आक्रमणामुळे सुकल्याचे अध्यात्मातील जाणकारांनी सांगितले.

टीप – वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. साधना केल्याने साधकाकडे चांगल्या शक्ती आकृष्ट होतात. साधनेमुळे वातावरणातील चांगल्या शक्तीचे आधिक्यही वाढते आणि वाईट शक्तींची शक्ती घटते. असे होऊ नये, यासाठी वाईट शक्ती साधकांच्या साधनेत विघ्ने आणतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत.

आ. तुळशीविवाहाची पार्श्‍वभूमी

वाईट शक्तींच्या (टीप) आक्रमणामुळे सुकलेल्या तुळशीच्या संदर्भात भृगुसंहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या भृगुमहर्षींनी आध्यात्मिक उपाय म्हणून ‘तुळशीविवाह’ हा विधी करण्यास सांगितले. त्यानुसार ११.११.२०१६ या दिवशी सायंकाळी गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमात या तुळशीचा ‘तुळशीविवाह’ हा विधी भावपूर्ण वातावरणात झाला. विवाहाचे पौरोहित्य सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील साधक-पुरोहितांनी केले.

४. ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख

या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.

४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ आ १. नकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.
अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.
आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.

४ आ २. सकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ आ ३. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे

प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.

४ इ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ‘४ आ ३’ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरमध्ये प्रथम ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास ‘भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?’, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ ‘त्या वस्तूभोवती ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ नाही’, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.
आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

६. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

६ अ १.

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.

सारणी २ – तुळशीविवाहामुळे तुळशीच्या प्रभावळीत झालेली वाढ

७. निरीक्षणांचे विवेचन

७ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

१. नकारात्मक ऊर्जा न आढळणे

सर्वसाधारण वास्तू किंवा वस्तू यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण चाचणीतील दोन्ही निरीक्षणांच्या वेळी तुळशीच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. विशेष म्हणजे तुळशीवर अनिष्ट शक्तींचे आक्रमण होऊनही तेथे नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. याचे कारण ‘तुळस ही मुळातच सात्त्विक वनस्पती आहे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले या तुळशीला प्रतिदिन पाणी घालत असल्याने त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे तिच्यातील सकारात्मक स्पंदने टिकून राहिली’, हे आहे. वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे तुळस सुकली, तरी तिच्यातील चैतन्य मात्र टिकून राहिले.

७ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

१. सकारात्मक ऊर्जा आढळणे

सर्वच वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही; पण चाचणीतील तुळशीच्या ठिकाणी तुळशीविवाहापूर्वीही थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याने स्कॅनरच्या भुजा १२० अंशाच्या कोनात उघडल्या. तुळशीमध्ये सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारणही सूत्र ‘६ अ १’ मध्ये दिल्याप्रमाणेच आहे.

तुळशीविवाहानंतरच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे तुळशीच्या ठिकाणी पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा आहे, तसेच तिची प्रभावळ १.३७ मीटर आहे. तुळशीविवाहामुळे तुळशीतील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढल्याचा हा परिणाम आहे.

७ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

१. तुळशीविवाहापूर्वीच्या तुलनेत तुळशीविवाहानंतरची तुळशीची प्रभावळ पुष्कळ अधिक असणे

सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. तुळशीविवाहापूर्वी तुळशीची प्रभावळ ३ मीटर, म्हणजे सामान्य व्यक्तीच्या प्रभावळीच्या तुलनेत पुष्कळ अधिक होती. याचे कारण सूत्र ‘६ अ १’ मध्ये दिल्याप्रमाणेच आहे. तुळशीविवाहानंतर तुळशीची प्रभावळ १.२७ मीटरने वाढली आणि ४.२७ मीटर झाली. यातून तुळशीविवाहातील विधी परिणामकारक झाल्याचे स्पष्ट होते.

८. निष्कर्ष

कोणताही धार्मिक विधी परिणामकारक होण्यासाठी त्या विधीसाठी असलेला उन्नतांचा (उच्च आध्यात्मिक स्तर असणार्‍यांचा) संकल्प, विधी करणारे सात्त्विक पुरोहित आदी घटक महत्त्वाचे असतात. भृगुसंहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या भृगुमहर्षींनी तुळशीविवाहाचा हा विधी करण्यास सांगितले होते, म्हणजेच या विधीसाठी त्यांचा संकल्प कार्यरत होता. हा विधी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील साधक-पुरोहितांनी भावपूर्णरित्या केला. त्यामुळे विधी करण्याचा अपेक्षित परिणाम साध्य झाला, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’
– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१२.११.२०१६)
ई-मेल : [email protected]

 

घटकाची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरणांद्वारे अभ्यासण्याचा हेतू

‘एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

 

तुळशीविवाह हा मुहूर्त कालातच का करावा ?

‘तुळशीविवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या सूक्ष्मतर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते. वातावरणातील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो. या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच ‘तुळशीविवाह’ म्हणतात. तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. दोन्ही तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशीविवाह साजरा करतात. तुळशीविवाहाच्या मुहूर्त कालातच श्रीविष्णु-लक्ष्मी या दोन तत्त्वांच्या लहरींचे आगमन आणि संयोग घडून येतो. वातावरणातील या सात्त्विकतेचा लाभ मिळावा, यासाठी तुळशीविवाह हा मुहूर्त कालातच करावा.’(तुळशीबद्दलची माहिती सनातनचा ग्रंथ ‘श्रीविष्णु’ यात दिली आहे.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment