ईश्‍वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया !

‘विचार’ या शब्दाची फोड ‘वि’ म्हणजे विचरण आणि ‘चार’ म्हणजे चार देह अशी होते. चारही देहांत वेगवेगळे विचरण करतात, तेे विचार. साधनेमुळे एकेका देहाची शुद्धी चालू होते. मनोलय, बुद्धीलय झाल्यानंतर चारही देहांतील विचरण करणारे विचार एकच असतात. म्हणजे सर्व विचार ईश्‍वराचे असतात. अशी अवस्था गाठणे म्हणजे ईश्‍वराशी एकरूप होणे. त्याआधी कर्तेपणा गळून पडण्याचे टप्पे येथे देत आहे.

१. प्रथम शिष्याला केवळ शब्दात ठाऊक असते की, स्थूल आणि सूक्ष्म यांतून देवच सर्व करत आहे; पण याची अनुभूती नसते. त्यामुळे माहिती असली, तरी पूर्ण कर्तेपणा असतो.

२. साधना वाढल्यावर सूक्ष्मातून देवच करत आहे, हे त्याला लक्षात येते; पण स्थुलातून ‘माझ्या माध्यमातून करत आहे’, याचा कर्तेपणा असतो.

३. पुढच्या टप्प्यांत ‘स्थुलातून आणि सूक्ष्मातून निश्‍चितपणे देवच करत आहे’, याची तो अनुभूती घेतो. त्यामुळे सात्त्विक कर्तेपणा असतो, की देव माझा उद्धार करत आहे.

४. ‘अंतिमतः ईश्‍वरच कर्ता-करविता आहे. केवळ माझ्या माध्यमातून नव्हे, तर सर्वांच्या माध्यमांतून तोच कार्य करत आहे. सर्व स्वरूप एकच आहे’, ही अनुभूती घेतल्यानंतर कर्तेपणा गळून पडतो.’

– (पू. ) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (२६.५.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment