भक्ताच्या प्रेमशक्तीचे श्रेष्ठत्व दाखवून देणारा नृसिंह अवतार !

श्री. श्रीकांत भट

भगवान श्रीविष्णूंचा चौथा अवतार, म्हणजे नृसिंह अवतार होय. विदर्भात आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. त्या निमित्ताने नृसिंहाची आध्यात्मिक माहिती देणारा हा लेख प्रकाशित करत आहोत.

 

१. नृसिंह अवताराचे कार्य आणि वैशिष्ट्ये

१ अ. कार्य

हिरण्यकश्यपूने चालवलेला पराकोटीचा अधर्म नष्ट करून प्रल्हादासारख्या भक्तांच्या रक्षणार्थ हा अवतार सगुणात साकारला. अधर्मीय शक्ती कितीही बलशाली, उन्मत्त आणि वरदानाने अहंकारी झाल्या, तरी शेवटी धर्माचाच विजय होतो, हे आध्यात्मिक तत्त्व सिद्ध करून दाखवण्यासाठीच हा सिंहमुखी अवतार प्रकटला. त्याने अधर्मियांचा नाश करून श्रीमद्भगवद्गीतेनुसार (अध्याय ४ श्‍लोक ८ यानुसार) पुढील वचन पूर्ण केले.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

अर्थ : सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणार्‍यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगांत प्रगट होतो.

१ आ. वैशिष्ट्ये

१. हा अवतार अतिशय शक्तीशाली आणि उग्र स्वरूपात प्रगटला; कारण शत्रूची जशी शक्ती आणि वरदानप्राप्ती असते, त्याला स्मरून अवतार प्रकट होतो.

२. नृसिंह अवताराची (मूर्तीतील) शक्ती (प्रकटशक्ती) भाविक आणि सर्वसामान्य भक्तगण सहनच करू शकत नाहीत. त्यामुळे नृसिंहाची मूर्ती उपडी (भूमीकडे मुख करून) झोपवून भाविकांना दर्शनासाठी ठेवतात.

 

२. श्री नृसिंह अवतारासंबंधी काही तत्त्वे (रहस्ये) !

२ अ. श्रीविष्णूने भक्तांच्या हृदयातील आर्त हाकेला
धावून अवतार धारण करून स्वतःच्या ब्रीद वचनाचे पालन करणे

अवताराचे दुसरे तत्त्व (रहस्य) असे की, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद । म्हणजे हे नारदा, माझे भक्त जिथे माझी महती गातात, तिथे मी रहातो, या श्रीविष्णूच्या ब्रीद वचनाचे पालन करण्यासाठीच अवतार भक्तांच्या हृदयातील आर्त हाकेला धावून येतो. म्हणजेच भगवंत भक्तांच्याच हृदयात वास करतो, या वचनाचा हा पुरावा प्रत्यक्ष भगवंतानेच दिला आहे.

२ आ. भक्ताने भक्तीद्वारे भगवंताला सगुण रूपात आणणे

या अवताराचे तिसरे तत्त्व (रहस्य) असे की, भक्तच भक्तीद्वारे निर्गुण आणि निराकार रूपात असणार्‍या अदृश्य अशा भगवंताला सगुण (साकार) रूपात जाणतो; म्हणून भक्तीचे श्रेष्ठत्व ही शिकवण साधकांना देण्यासाठीच हा अवतार अवतीर्ण झालेला आहे.

२ इ. भगवंताने निर्जीव खांबातून प्रकट होऊन अश्रद्ध
मानवाला चराचरांतील स्वतःचे अस्तित्व दाखवून देणे

भगवंताच्या या अवताराचे चौथे तत्त्व (रहस्य) असे आहे की, भगवंत हा चराचरांत वसलेला आहे. दगड, माती, झाडे यांतही तोच भरून राहिलेला आहे. याचा पुरावा अश्रद्ध मानवाला दाखवून देण्यासाठीच हा अवतार खांबातून (निर्जीव वस्तूतून) प्रगटला.

२ ई. भगवंताच्या सर्व शक्तींमध्ये भक्ताची प्रेमशक्तीच सर्वांत महत्त्वाची असणे

खांबातून नृसिंह अवतार प्रकट झाल्यावर अत्यंत कोपीष्ट भासत होता. त्यामुळे लक्ष्मीसुद्धा त्याच्या जवळ जाण्याचे धाडस करू शकली नाही. सर्व देव-देवताही नृसिंहाचा क्रोध (आवेश) शांत करू शकले नाहीत; परंतु भक्त प्रल्हादाच्या प्रेम आणि शक्तीयुक्त भक्तीमुळेच तो शांत झाला. भगवान विष्णूंनीच या अवतारामधून भगवंताच्या सर्व शक्तींमध्ये भक्ताची प्रेमशक्तीच सर्वांत महत्त्वाची असते, हे रहस्य भक्तगणांना शिकवले आहे. हे पाचवे तत्त्व आहे.

२ उ. सर्वशक्तीमान भगवंताने अधर्मियांच्या मायेला,
म्हणजेच अधर्मियांना काही पत्ता लागू न देता नकळत नष्ट करणे

भगवान विष्णूने नृसिंह अवतारामध्ये सिंहमुख धारण करून विष्णुमायेची सर्वोच्च लीला (भगवंताची माया आणि तिचा आवेग किती असतो ?, हे) नर-पशूचे रूप धारण करून ब्रह्मांडाला दाखवून दिली आहे. हे सहावे तत्त्व मायेची महती आणि शक्ती दाखवून देते.

या प्रसंगी भगवंताने अधर्मियांना (अधर्मियांच्या मायेला) काही पत्ता लागू न देता कसे नष्ट करतो; म्हणजेच भगवंताची सर्वशक्तीमानता कशी कार्यरत असते ?, हे त्याने पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. भगवंताने ब्रह्मांडात केवळ एकच शक्तीमान असे तत्त्व कार्यरत आहे, याचा धडाही या तत्त्वातून दिला आहे.

२ ऊ. श्रीविष्णूने ब्रह्मदेवाच्या वरदानाचा सन्मान करतांना
अधर्मी हिरण्यकश्यपूला स्वतःची शक्ती दाखवून नष्ट करणे

भगवंतामध्ये असणार्‍या सर्वज्ञानी, सर्वव्यापक आणि सर्वशक्तीमान या त्रिगुणांचा संगम या अवतारातून स्वतः भगवान श्रीविष्णूनेच दाखवून दिला आहे. सर्वज्ञानी भगवंताने हिरण्यकश्यपू करत असलेले अत्याचार आणि अधर्म जाणले. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले होते, मला दिवसा किंवा रात्री, आकाशात वा भूमीवर, घरात किंवा घराच्या बाहेर, मनुष्याकडून वा पशूकडून, शस्त्राने किंवा अस्त्राने मृत्यू येऊ नये. त्यावर ब्रह्मदेवाने तथास्तु असे म्हटले. पुढे सर्वव्यापक असणार्‍या विष्णूने लाकडी खांबातून नृसिंह रूप साकारले. सिंह त्याच्या भक्ष्याला (प्राण्याला) क्रूरपणे ठार मारून सर्वशक्तीचे प्रदर्शन करतो, त्याच न्यायाने सर्वशक्तीमान असणार्‍या विष्णूने सिंहाचे मुख आणि उर्वरित शरीर मानवाचे असलेला नृसिंह अवतार धारण केला. नंतर त्याने सायंकाळी उंबरठ्यावर बसून अधर्मी हिरण्यकश्यपूला स्वतःच्या मांडीवर आडवे केले आणि स्वतःच्या तीक्ष्ण नखांद्वारे त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा प्रकारे श्रीविष्णूने ब्रह्मदेवाच्या वरील वरदानाचा सन्मान केला. पुढे भगवंताने पृथ्वीवर पुन्हा भक्तांचे राज्य स्थापन केले. यालाच खरा अवतार म्हटले आहे.

२ ए. सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तीमान आणि व्यापक असणार्‍या भगवंताने कलियुगात माजलेली हिरण्यकश्यपू वृत्ती नष्ट करावी, यासाठी त्याचे भक्त व्हा ! : आताही धरतीवर अनेक रूपांतील हिरण्यकश्यपू वृत्ती माजली आहे. भक्तगणांनो, सङ्घे शक्तिः कलौ युगे ।, म्हणजे कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते, या न्यायाने संघटित व्हा आणि भक्त प्रल्हादासारखी भक्ती करा ! धर्माचरण करून सर्वांभूती प्रेम करा. देव, देश आणि धर्म यांसाठी आपली साधना म्हणून तन, मन आणि धन यांचा त्याग करा. हिंदुस्थानची स्थिती धोक्यात आहे. साधकांनो, त्या सर्वश्रेष्ठ, शक्तीमान आणि व्यापक असणार्‍या भगवंताचे भक्त होण्यासाठीच प्रयत्न करा. आपण त्याचे भक्त झालो, तर भगवंत न मे भक्तः प्रणश्यति । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक ३१), म्हणजे माझ्या भक्ताचा नाश होत नाही, या वचनानुसार आपले रक्षण करील.

 

३. नृसिंह उपासना

३ अ. नृसिंह हा तीन अक्षरी नामजप केल्याने होणारे लाभ

१. युद्धात विजय प्राप्त करून घेता येतो.

२. दुर्लभ वस्तूंची प्राप्ती करून घेता येते.

३. हा तीन अक्षरी नामाचा दहा सहस्र जप केल्यास भैरव प्रसन्न होतो.

४. सर्व शत्रूंचा नाश होतो.

५. नृसिंह उपासकाला उत्तम गती प्राप्त करून देतो.

६. केवळ स्मरणाने तो आपल्या भक्तांचे रक्षणही करतो. भुते दिसल्यास नृसिंह या मंत्राचा जप करावा.

३ आ. नृसिंह जयंतीचा उपवास

दहा कोटी एकादशीचे फळ म्हणजे नृसिंह जयंतीचा एक उपवास असा याचा महिमा आहे.

३ इ. नृसिंहाचे उपासक ऋषीमुनी

दुर्वासऋषि आणि कपिलमुनी यांनी नृसिंह मंत्राचाच जप केला होता.

 

साधकांनो, भक्त प्रल्हादासारखी भक्ती करून अंतर्मनात रामराज्य स्थापन करूया !

– श्री. श्रीकांत भट, अकोला. (२९.४.२०१७)

Leave a Comment