परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आदर्श जीवन पद्धती !

Article also available in :

अनुक्रमणिका

PP_Dr_2012_nirgun_C_18july2014
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

प.पू. डॉ. आठवले प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने मागील वर्षापर्यंत त्यांनी कुठल्याही अंगाने त्यांचे श्रेष्ठत्व जगजाहीर करण्यास साधकांना अनुमती दिली नाही. साधकांना प.पू. डॉक्टर यांच्यासंदर्भात शेकडो अनुभूती येऊनही प.पू. डॉक्टर त्याचे सर्व कर्तेपण श्रीकृष्णाला देऊन त्यापासून अलिप्त रहात. देवच साधकांना अनुभूती देतो, अशा प्रकारचे काहीतरी साधकांना सांगत. मागील वर्षी मात्र महर्षींची आज्ञा म्हणून त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यास साधकांना अनुमती दिली आणि साधकांनी महर्षींनी सांगितलेले प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व जगाला सनातन प्रभातच्या माध्यमातून सांगितले. यात कुठेही प.पू. डॉक्टरांचा स्वतःचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. महर्षि सांगतील त्याप्रमाणे त्यांचे आज्ञापालन करावे, इतकेच होते, तरीही काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांना आणि अपेक्षेप्रमाणे पुरो(अधो)गाम्यांना पोटशूळ उठलाच ! काहींनी तर दूरचित्रवाहिन्यांवरून त्यांना भेटण्याची आणि त्यांचे चमत्कार पहाण्याची (जे प.पू. डॉक्टर कधीही करत नाहीत) आग्रही इच्छा व्यक्त केली.

साधकांना राजयोग्याप्रमाणे सुविधा देणारे परात्पर गुरु डॉक्टर स्वतः संन्यस्त जीवन जगतात. सनातनच्या रामनाथी आश्रमात एका खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे वास्तव्य आहे. त्या खोलीत एक साधी आसंदी, एक छोटे पटल (जे ते जेवणासाठीही वापरतात) आणि एक छोटा पलंग आहे. त्यावरील गादीही साधीच आहे. असे मोजकेच साहित्य असले, तरी तेही नीटनेटके ठेवण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच प्रयत्न करतात. आश्रमातील परात्पर गुरु डॉक्टरांचा वावर ‘मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे’, या भावानेच असतो. त्यांचे वागणे-बोलणे, रहाणीमान यांत कुठेच मोठेपणा दिसून येत नाही. या लेखात परात्पर गुरु डॉक्टर किती साधेपणाने रहातात, यासंदर्भात संक्षिप्त रूपाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

वास्तविक परात्पर गुरु डॉ. आठवले हे पूर्वी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संमोहनउपचार तज्ञ होते. त्यांनी जीवनातील काही काळ इंग्लंडसारख्या ठिकाणीही व्यतित केला आहे. आताही ते अध्यात्मातील उच्च स्थानी आहेत. त्यांनी इतके त्यागमय आणि साधेपणाने रहाणे, हेच त्यांच्यातील देवत्व ठळक करणारे आहे. सनातनच्या आश्रमांमध्ये साधकांची साधना सुकर व्हावी, यासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. स्वतःसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध होणे सहज शक्य असूनही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एक एक पैसा साठवण्यासाठी ही सर्व धडपड चालू आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवन हा ‘काटकसर’ या गुणाचा आविष्कार आहे !

Yogesh_Jaltare
अधिवक्ता योगेश जलतारे

असो. ही पार्श्‍वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे प.पू. डॉक्टरांचे अलौकिकत्व शब्दांत वर्णन करता येण्यापलीकडे आहे, असे महर्षि सांगतात आणि साधकांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेही आहे. त्यामुळे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी, हिंदुत्ववादी किंवा पुरोगामी यांना काय वाटते, याला महत्त्व नाही. जे खरे हिंदुत्वनिष्ठ आहेत, ते प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आध्यात्मिक वाटचाल करत आहेत. मी स्वतः गेली १६ वर्षे प.पू. डॉक्टरांच्या सान्निध्यात साधना करत आहे. या कालावधीत त्यांच्या संदर्भात अनेक अनुभूती मीही घेतल्या आहेत. त्यातही काही अनुभव असे आहेत की, बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यासंदर्भात जरी प.पू. डॉक्टरांशी स्वतःची तुलना केली, तरी ते नभसूर्याशी तुलना करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या लक्षात येईल आणि काहींना उपरती झालीच, तर ते प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व विनाविकल्प मान्य करतील, यात शंका नाही. ज्यांना हेे शक्य होणार नाही, त्यांनी स्वतःविषयी इतरांना एकतरी तसा अनुभव आला आहे का, याचा अंतर्मुखतेने विचार करावा. अर्थात हा लेखप्रपंच त्यांच्यासाठी नव्हे, तर जे साधक अद्याप प.पू. डॉक्टरांना भेटले नाहीत; परंतु त्यांचे अलौकिकत्व अनुभवत आहेत, त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून आहे.

 

१. प.पू. डॉक्टरांचे बुद्धीगम्य व्यक्तीगत जीवन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निवास केलेली रामनाथी आश्रमातील खोली

अ. आश्रमात शेकडो साधक असतांना आणि प.पू. डॉक्टरांचा प्रत्येक शब्द झेलण्यास ते सिद्ध असतांना प.पू. डॉक्टर कधीही कुठल्याही साधकाला स्वतःची कामे सांगत नाहीत. ते स्वतःची सर्व कामे स्वतःच करतात. अगदी रुग्णाईत अवस्थेत सतत तोल जात असतांनाही ते स्वतःच स्वतःचे सर्व करतात.

आ. साधकांना राजयोग्याप्रमाणे सुखसुविधा देणारे प.पू. डॉक्टर स्वतः मात्र संन्यस्त जीवन जगतात. त्यांच्या खोलीत एक साधी आसंदी, एक छोटे पटल (जे ते जेवणासाठीही वापरतात) आणि झोपण्यासाठी एक छोटा पलंग आहे. त्यावरील गादीही साधीच आहे.

इ. प.पू. डॉक्टरांचे जेवण अत्यल्प आहे. त्यांना कुठलाही विशेष पदार्थ लागत नाही. सर्व जेवण पथ्याचे आणि अळणी असते.

ई. प.पू. डॉक्टर कपड्यांचे मोजकेच जोड वापरतात. ते फाटल्यास शिवून पुन्हा वापरतात. हाच भाग त्यांचा पलंगपोस आणि उशीचा अभ्रा यांविषयीही आहे.

उ. ‘प.पू. डॉक्टर दाढी करण्यासाठी शेव्हींग क्रीम न वापरता अंघोळीच्या साबणाचे उरलेले तुकडे वापरतात.’

ऊ. त्यांच्या खोलीतील लादी पुसण्याचे कापड फाटल्यास तेही शिवूनच वापरले जाते. जुने फाटले; म्हणून लगेच दुसरे कापड घेतले, असे होत नाही. अशी काटकसर ते प्रत्येकच गोष्टीत करतात. याची अनेक उदाहरणे आहेत.

ए. सूक्ष्मातील त्रासामुळे त्यांना उकाड्याचा पुष्कळ त्रास होतो, तरीही ते स्वतः वातानुकूलन यंत्र वापरत नाहीत.

ऐ. ते केवळ सर्व साधकांनाच सतत सत्सेवेत रहायला सांगतात असे नाही, तर स्वतःही सतत ग्रंथलिखाणाची सेवा करतात. ते रुग्णाईत असले किंवा थकवा असला, तरी यात कधीच खंड पडत नाही.

ओ. इतकी मोठी संस्था उभारून आणि तिचे कार्य इतके विस्तारले असतांनाही ते आश्रमात एका साध्या शिष्याप्रमाणे जीवन व्यतित करतात आणि म्हणतातही, मी गुरूंच्या आश्रमात शिष्य म्हणून रहातो.

औ. संस्था आणि साधक यांवर अनेक संकटे आली. अगदी कारागृहात जाण्याची वेळ आली, तरी प.पू. डॉक्टर जराही विचलित होत नाहीत. त्यांच्या आनंदावस्थेत काहीही अंतर पडत नाही. ते स्वतःही स्थिर अन् आनंदी असतात आणि साधकांनाही ठेवू शकतात.

अ. कार्यासाठी पै-पै वाचावा, यासाठी ८० व्या
वर्षीही काटकसर करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

प.पू. डॉक्टरांनी वापरलेला पंचा काही ठिकाणी कापड जोडून घेतला आहे. (जोड दिलेला भाग गोलात मोठा करून दर्शवला आहे.)

चिटोऱ्यांवर लिखाण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉक्टरांना अंघोळीनंतर अंग पुसण्यासाठी नवीन पंचा दिल्यावर ते त्याचे दोन भाग करतात आणि त्याचे कापलेले काठ शिवून आणण्यास सांगतात. त्यानंतर ते त्यातील एक भाग वापरण्यास घेतात. तो काही महिने वापरल्यावर त्याचे कापड विरून एके ठिकाणी फाटते. तेव्हा फाटलेल्या भागावर ते अन्य कापडाचा जोड शिवून घेतात आणि परत तोच पंचा वापरतात. अशा प्रकारे ते तो पंचा ७ – ८ महिन्यांहून अधिक काळ वापरतात. (वरील छायाचित्र पहावे.)

२. कोरोनामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या आजारपणात भेटायला कुणी येत नसल्यामुळे सध्या ते बंडी घालत नाहीत. त्यामुळे त्यांनी सध्या एकच बंडी वापरात ठेवली आहे. तसेच अंतर्वस्त्र हे इतरांना दिसत नसल्यामुळे ते फाटले, तर परात्पर गुरु डॉक्टर त्याला अन्य कापडांचा अनेकदा जोड देऊन वापरतात.

३. पायजमा, बंडी इत्यादी कपडे जीर्ण होऊन वापरणे शक्य नसल्यास त्या कपड्यांचा चांगला भाग काढून खोलीतील साहित्य, खिडक्या, फरशी इत्यादी पुसण्यासाठी शिवून घेतात.

४. एखादी छायांकित प्रत काढल्यावर खाली २ – ४ सें.मी.चा कोरा भाग असल्यास ते तेवढा कागद लिखाणासाठी काढून ठेवतात. तसेच तिकिटे, पोस्टाची पत्रे यांच्यातीलही कोरा भाग कापून त्यावर लिखाण करतात.

– परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सेवेतील साधक (१०.८ २०२१)

आ. पायमोजे सैल झाल्यानंतर शिवून पुन्हा वापरणे

सद्गुरु सत्यवान कदम

‘माझ्या पायाला सूज येते; म्हणून प.पू. गुरुदेवांनी पायमोजे दिले होते. वापरल्यामुळे आता ते रूंद झाले आहेत, हे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी ते आपल्याला शिवून परत घालता येत असल्याचे सांगितले. प्रत्यक्षातही त्यांनी त्यांच्या पायात असलेले पायमोजे कशाप्रकारे शिवून घेतले आहेत, हे दाखवले. यावरून ‘ते स्वतः काटकसर करत असतात आणि तोच आदर्श आपणही सतत घेतला पाहिजे’, असे वाटले.’

– सद्गुरु सत्यवान कदम, सिंधुदुर्ग

इ. २० वर्षांपूर्वीच यंत्राचा वापर करून स्वतःच केस कापण्यास आरंभ करणे

‘केस कापण्यासाठी केश कर्तनालयात गेल्यास अधिक पैसे खर्च होतात, हे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० वर्षांपूर्वी केस कापण्यासाठीच्या यंत्राचा वापर करून स्वतःच केस कापण्यास आरंभ केला.’ – पू. संदीप आळशी

ई. स्वतःच्या कृतीतूनच ‘साधकाने कसे वागावे ?’, याचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सनातन संस्थेचे प्रसारकार्य चालू झाले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांचे चिकित्सालय बंद झाल्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले होते. जेव्हा ते प.पू. भक्तराज महाराजांकडे (प.पू. बाबांकडे) जायचे, तेव्हा परतीच्या प्रवासासाठी प.पू. बाबाच त्यांच्या गाडीत पेट्रोल भरून द्यायचे. प्रसाराला जातांना पेट्रोलची गाडी आर्थिकदृष्ट्या महाग पडते; म्हणून प.पू. बाबांनी त्यांची स्वतःची डिझेलवर चालणारी चारचाकी गाडी परात्पर गुरु डॉक्टरांना वापरण्यासाठी दिली होती. अशी आर्थिक स्थिती असतांनाही त्यांनी पुढील कृती करून समष्टीला आणि साधकांना त्यागाची उच्च शिकवण दिली.

उ. स्वतःच येण्या-जाण्याचा व्यय करून आणि मानधनही न घेता अध्यात्मावर विनामूल्य प्रवचने करणे

श्री. दिनेश शिंदे

बर्‍याच ठिकाणी अनेक प्रवचनकार किंवा मार्गदर्शक आयोजकांकडून कार्यक्रमस्थळी येण्या-जाण्याचा व्यय (खर्च) घेतात. तसेच प्रवचन केल्यावर त्याचे मानधनही घेतात. याउलट परात्पर गुरु डॉक्टर जेव्हा अनेक जिल्ह्यांत किंवा शहरांत प्रवचनासाठी जात, तेव्हा ते स्वतःच गाडी चालवायचे. ते अनेक घंट्यांचा प्रवास करून साधकांना विनामूल्य मार्गदर्शन करत आणि प्रवचनही विनामूल्यच घेत असत. त्यांनी कधीही जाण्या-येण्याचा किंवा कसलाच व्यय (खर्च) घेतला नाही.

ऊ. प्रवचनातील हार-तुरे इत्यादींवरील अनावश्यक व्यय टाळण्यास सांगणे

परात्पर गुरु डॉक्टर नेहमी ‘प्रवचनाच्या आरंभी हार नको, तर त्याऐवजी एखादे फूल किंवा फुलांचा गुच्छ द्या’, असे सांगत. ‘ते पैसे धर्मकार्यासाठी वापरता येतील’, असा त्यांचा उद्देश असे.

ए. मिळालेले अर्पणही साधकांना धर्मकार्यासाठी परत देणे

व्यासपिठावर किंवा अन्य ठिकाणी त्यांचा सत्कार करतांना त्यांना काही वेळा धन अर्पण म्हणून दिले जायचे. मिळालेले सर्वच धन ते त्या जिल्ह्यातील कार्य वाढवण्यासाठी तेथील दायित्व असणार्‍या साधकाला द्यायचे; एवढेच नव्हे, तर ‘आणखी काही लागल्यास तेही सांगा’, असेही सांगायचे.’

– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी. (१७.५.२०१६)

ऐ. अर्पण मिळालेले कपडे वापरणे

‘मुंबई येथे असतांना एकदा आश्रमात अर्पण म्हणून जुने कपडे आले होते. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी त्या कपड्यांतील एक पँट शोधली आणि ती ते नेहमीसाठी वापरू लागले. प.पू. डॉक्टर कपड्यांचे मोजकेच जोड वापरतात. ’ – सौ. स्मिता नवलकर, देवद (९.२.२०१७)

 

२. प.पू. डॉक्टरांचे बुद्धीगम्य समष्टी जीवन (इतरांशी वागणे-बोलणे)

अ. जो प.पू. डॉक्टरांना एकदा भेटतो, तो कायमचा त्यांचा होतो.

आ. अहंकार साधनेला घातक आहे, हे त्यांना ठाऊक असूनही तीव्र अहंकार असलेल्या साधकांशीही ते तितक्याच प्रेमाने बोलतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही दुजाभाव असत नाही किंवा ते समोरच्याला न्यून लेखत नाहीत.

इ. प.पू. डॉक्टर लहानात लहान आणि वयोवृद्ध व्यक्तींशीही तितक्याच समरसतेने संवाद साधतात.

ई. कोणी कितीही गरीब असो, श्रीमंत असो, सुदृढ असो वा रोगग्रस्त असो किंवा कुठल्याही जातीचा असो, ते साधकांशी मोकळेपणाने आणि अत्यंत प्रेमाने संवाद साधतात. त्वचारोगामुळे जर्जर झालेला विदेशातील एक साधक आपल्या आजारामुळे इतरांना किळस वाटू नये, यासाठी पूर्ण शरीर झाकून ठेवायचा. त्याला प.पू. डॉक्टरांसमोर जायला संकोच वाटत असतांना प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला पायांतील मोजे काढायला लावून त्याच्या व्याधीचे स्वरूप पाहिले. त्यांच्या या प्रेमामुळे त्या साधकामध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.

उ. मोठे संमोहनउपचारतज्ञ असूनही कोणी मनाच्या संदर्भातील प्राथमिक गोष्ट जरी सांगितली, तरी मला शिकायला मिळाले, असे ते सांगतात. उच्च कोटीचे संत असूनही कोणी अध्यात्मातील प्राथमिक भाग जरी सांगितला, तरी ते पूर्ण मनापासून ऐकतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही मला हे ठाऊक होते, असे नसते.

ऊ. श्रीरामाने लक्ष्मणाला रावणाच्या मृत्यूपूर्वी त्याच्याकडूनही राजधर्म शिकायला सांगितला, तसे प.पू. डॉक्टर साधकांना सर्वांकडूनच शिकायला सांगतात.

ए. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाकणे कठीण असतांनाही ते सर्वच संतांना शक्यतो वाकून नमस्कार करतात.

ऐ. प.पू. डॉक्टरांना आधी कधीच पाहिलेले नसतांना शेकडो हिंदुत्ववादी, त्यांचे नेते विविध संप्रदायांचे प्रमुख आदी सर्वच जण त्यांचे श्रेष्ठत्व एका भेटीतच अनुभवतात आणि त्यांच्या मार्गदर्शनुसार मार्गक्रमण करतात.

ओ. प.पू. डॉक्टरांनी आपल्यातील प्रेमाने आणि लीनतेने भारतभरातील अनेक संतांना सनातनशी जोडले. त्यांच्या आशीर्वादामुळे आज सनातनचे कार्य झपाट्याने वाढत आहे.

प.पू. डॉक्टरांच्या केलेल्या या गुणसंकीर्तनातून आम्हा साधकांचा भक्तीभाव वाढू दे, तसेच त्यांच्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याची बुद्धी आणि शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी, हीच त्या गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना !

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०१६) 

 

४. देवघराच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली अन्य काही सूत्रे

अ. चैतन्य-निर्मितीचा दृष्टीकोन

परात्पर गुरु डॉक्टरांनी देवघरात मूर्ती आणि चित्र यांच्या खाली एका पांढर्‍या रंगाचे कापड घालण्यास सांगितले होते. तसे केल्यावर देवघरातून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. यातून त्यांचा ‘काय केले की, अजून चैतन्य निर्माण होईल’, हा दृष्टीकोन लक्षात येतो.

आ. भावजागृतीचा दृष्टीकोन

देवघरातील देवतेच्या प्रत्येक छोट्या मूर्तीला एक छोटे आसन आहे. छोट्या आसनावरील मूर्तीकडे पाहून भाव जागृत होतो. देवपूजनाचा मुख्य उद्देश भावजागृती असल्याने त्यादृष्टीने केलेली छोटीशी कृतीही भावजागृतीसाठी कशी उपयुक्त ठरते, हे शिकायला मिळाले.

इ. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा

देवापुढे दिवा लावल्यानंतर दिव्याची काजळी बाहेर पडून ताटलीच्या वरील देवघराचा भाग काळा व्हायला नको; म्हणून देवघरात ठेवलेल्या ताटलीच्या वरील बाजूस प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आला आहे. यातून परात्पर गुरु डॉक्टरांमधील व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा हे गुण लक्षात येतात.

ई. काटकसरीपणा

परात्पर गुरु डॉक्टर देवासमोर लावण्यासाठी विक्रीसाठी उपयुक्त नसलेल्या, तसेच मध्ये तुटलेल्या उदबत्त्या वापरतात. यातून परात्पर गुरु डॉक्टरांचा काटकसरीपणा हा गुण दिसून येतो.

उ. विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक कृती करणे

परात्पर गुरु डॉक्टर उदबत्ती पेटवण्यासाठी काड्यापेटीतील काडीचा वापर केल्यावर, ती लगेच केराच्या बादलीत टाकत नाहीत; कारण ती गरम असल्याने तशीच बालदीत टाकल्यास बालदीतील कागद जळू शकतात. त्यामुळे ती काडी ते आधी एका पत्र्याच्या लहान तुकड्यावर ठेवतात आणि थोड्या वेळाने ती काडी केराच्या बादलीत टाकतात.

– कु. प्रियांका विजय लोटलीकर, गोवा. (२२.६.२०१९)