काकबली (दशमदिन विधी)

दशमदिन श्राद्धाधी विधी नदीच्या काठी असलेल्या शिवाच्या मंदिरात करण्याची कारणे या लेखातून जाणून घेऊ.

दहाव्या दिवशी करावयाचे श्राद्ध

दहाव्या दिवशी लिंगदेहाला काकस्पर्शाच्या माध्यमातून मंत्रोच्चाराने भारित पिंडयुक्त हविर्भाग दिला जाऊन लिंगदेहातील अन्नदर्शक आसक्तीयुक्त रज-तमरूपी संस्कारात्मक बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न करून पृथ्वीमंडल भेदण्यासाठी आवश्यक बळ पुरवले जाते.

व्यक्ती मृत झाल्यानंतर प्रतिदिन दहा दिवसांपर्यंत पिंडदान सांगितलेले आहे; पण कालपरत्वे ते सर्वसाधारणतः दहाव्या दिवशी एकदम केले जाते.

१. पिंडदान करण्याचे कर्म नदीकाठी किंवा घाटावर का केले जाते ?
(पिंडदान कर्माच्या वेळी लिंगदेहाला पृथ्वीच्या वातावरणकक्षेत
येतांना सोपे जावे, यासाठी पिंडदान कर्म नदीकाठी किंवा घाटावर केले जाणे)

‘मृत्यूनंतर स्थूलदेह त्यागला गेल्यामुळे लिंगदेहाभोवती असलेल्या कोषातील पृथ्वीतत्त्वाचे, म्हणजेच जडत्वाचे प्रमाण अल्प होते आणि आपतत्त्वाचे प्रमाण वाढते. लिंगदेहाभोवती असलेल्या कोषामध्ये सूक्ष्म आद्र्रतेचे प्रमाण सर्वांत अधिक असते. पिंडदान कर्म हे लिंगदेहाशी संबंधित असल्याने लिंगदेहाला पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येतांना सोपे जावे, यासाठी बहुतांशी असे विधी नदीकाठी किंवा घाटावर केले जातात. नदीच्या काठावरच्या किंवा घाटावरच्या वातावरणात आपतत्त्वाच्या कणांचे प्राबल्य असल्याने, तेथील वातावरण आद्र्रतादर्शक असते. असे वातावरण इतर जडत्वदर्शक वातावरणापेक्षा लिंगदेहांना जवळचे आणि परिचयाचे वाटते. अशा आद्र्रतादर्शक वातावरणाकडे लिंगदेह लगेच आकर्षिले जातात; म्हणून पिंडदानासारखे विधी प्रामुख्याने नदीकाठी किंवा घाटावर केले जातात.

२. पिंडदान कर्म नदीकाठच्या किंवा घाटावरच्या
शिवाच्या किंवा इतर कनिष्ठ देवतांच्या मंदिरांमध्ये का करतात ?

‘साधारणतः नदीकाठच्या किंवा घाटावरच्या मंदिरांमध्ये पिंडदान कर्म केले जाते. शिव किंवा इतर कनिष्ठ देवता त्या स्थानातील वाईट शक्तींना नियंत्रणात ठेवतात; म्हणून अशा विधींसाठी या मंदिरांचा उपयोग केला जातो. पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या प्रवासात अडथळा निर्माण होत नाही. यासाठी पिंडदान विधीपूर्वी त्या देवतेची संमती घेऊन आणि तिला प्रार्थना करून असे विधी केले जातात.

नदीकाठच्या किंवा घाटावरील मंदिरात विधी केल्याने देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे लिंगदेहांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते, नाहीतर कधी कधी पिंडदान विधीच्या वेळी वाईट शक्तीवातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहावर आक्रमण करून त्याला नियंत्रणात ठेवू शकतात; म्हणून हे टाळण्यासाठी शक्यतो नदीकाठच्या किंवा घाटावरील शिवाच्या, इतर कनिष्ठ देवतांच्या किंवा स्थानदेवतेच्या मंदिरांमध्ये असे विधी केले जातात.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.३.२००५, दुपारी १२.२१)

‘श्राद्ध’संदर्भातील अन्य लेख वाचण्यासाठी ‘क्लिक’ करा !

१. ‘दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?’

२. श्राद्धाचे अन्य प्रकार आणि त्यांचे लाभ जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

Leave a Comment