पुरंदरची लढाई : एक कूटयुद्ध !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कूटनीतीला
साहाय्यभूत ठरलेला आणि पुरंदरच्या तहामुळे
प्रसिद्ध असलेला नारायणपूर (जिल्हा पुणे) येथील पुरंदरगड !

shivaji_maharaj_purandar
पुरंदरगडावरील एक दुर्गम कडा

शके १५८७ (१६६५ या वर्षी) मोगल सरदार जयसिंग राजे आणि दिलेरखान यांनी ४० ते ५० सहस्र फौजेनिशी पुरंदरला वेढा घातला. पुरंदरावर सरदार मुरारबाजी प्रभु आणि त्याच बरोबर एक सहस्र मावळे होते. खानाने वज्रगड घेऊन सफेद बुरुजांवरून पुरंदरावर चाल केली. खानाने पाच सहस्र कडवे पठाण घेऊन बालेकिल्यावर स्वारी केली मुरारबाजीने सातशे मावळे घेवून खानास प्रत्युत्तर दिले. मुरारबाजी देशपांडे यांचे शौर्य पाहून खानाने त्यांना त्यांच्या बाजूने येण्यास सांगितले. मुरारबाजी बोलिले, मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो कि काय ? असे म्हणून खानावर वार करावा तोच खानाने तीन तीर मारून मुरारबाजी प्रभु यांना घायाळ केले. लढता लढता अखेर मुरारबाजी पडले. जेव्हा महाराजांना हे वृत्त कळाले, तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाविषयी बोलणी चालू केली. ११ जून १६६५ या वर्षी इतिहासातील प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. या शौर्याचा साक्षीदार असलेला हाच तो पुरंदरगड !

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असतांना एकाकी शिवरायांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा राजमार्ग तयार करते. कौटिल्याचे कूटयुद्ध, संधी आणि शिवाजी महाराजांची कूटनीती अन् संधी विचार यांत साम्यस्थळे निश्‍चितपणे दिसतात.

shivaji_maharaj_purandar1
मोगल सरदार जयसिंगराजे आणि दिलेरखान यांच्याशी कडवी झुंज देणारे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांची समाधी

 

१. शिवाजी महाराजांवरील दुहेरी संकट !

रायरेश्‍वरासमोर सहकार्‍यांसह शपथ घेऊन शिवरायांनी ईश्‍वरी कार्याला प्रारंभ केला होता. हे कार्य अत्यंत दुर्घट आहे, याची खूणगाठ त्यांनी बांधलेली असली, तरी राजांच्या आयुष्यात सत्त्वपरीक्षेचा क्षण फार लवकर आला. शहाजीराजांच्या बंडखोरीचा अनुभव आदिलशहाने घेतलेला होताच. आता शिवाजी महाराजही आदिलशहाचा भूप्रदेश घेऊ लागले होते. या सगळ्याविरुद्ध विजापूर दरबारात चर्चा चालू झाली आणि शिवाजी महाराजांना अटकाव करायचा, तर प्रथम शहाजीला अटक केली पाहिजे, असा कट शिजला. २५ जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांना जिंजीला अटक झाली. हे कार्य पूर्ण केले ते मुस्तफाखान, अफझलखान आणि बाजी घोरपडे यांनी ! यानंतर शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानाला पाठवले. राजे दुहेरी संकटात सापडले. त्यातच आतापर्यंत मार्गदर्शन करणारे दादोजी स्वर्गवासी झालेले. अशा परिस्थितीत एकाच वेळी वडिलांवर आणि राज्यावरही संकट ! राजांपुढे दोन पर्याय होते – लढाई किंवा शरणागती. शरणागती स्वीकारल्यास घेतलेला भूप्रदेश देऊन आदिलशहाची चाकरी स्वीकारावी लागली असती; म्हणजे स्वराज्य सोडून गुलामी. एवढे करून वडिलांवरचे संकट दूर होईल, याची कोणतीही शाश्‍वती नव्हती. अर्थात् राजांनी पहिला पर्याय स्वीकारला. राजांनी लढण्याचा निर्णय घेतला.

IMG_9536_c
गडावरील श्री कैलासेश्‍वर शिवपिंडी

 

२. महाराजांनी कूटयुद्धाची निवड करणे !

कौटिल्याने युद्धाचे तीन प्रकार सांगितले आहेत – विक्रमस्य प्रकाशयुद्धं, कूटयुद्धं, तूष्णीयुद्धम् (७.६.१७)।

तीन युद्धांपैकी राजांनी, भीतीने गाळण उडवणे, अचानक आक्रमण करणे, गैरसावध अथवा संकटात असता झोडपणे, एका ठिकाणी माघार आणि उलट परतून आक्रमण या डावपेचांनी युक्त अशा कूटयुद्धाची निवड केली.

कूटयुद्ध केव्हा खेळावे ते सांगतांना कौटिल्य म्हणतो,

बलविशिष्ट: कृतोपजाप:
प्रतिविहितर्तु: स्वभूम्यां
प्रकाशयुद्धमुपायात् विपर्यये कूटयुद्धम्। (१०.३.१-२)

म्हणजे भरपूर सैन्य असतांना, शत्रूच्या सैन्यात फितुरी केली असतांना, ऋतुमानाचा विचार केला असतांना आणि अनुकूल भूमी असतांना प्रकाशयुद्ध खेळावे. याच्या विपरीत परिस्थिती असतांना कूटयुद्ध खेळावे.

shivaji_maharaj

 

३. युद्धासाठी शत्रूच्याच भूमीचा
उपयोग करतांना राजांनी निवडलेला पुरंदरगड !

राजांसाठी प्रकाशयुद्धाचा पर्याय नव्हताच, कारण सैन्य तुटपुंजे होते. फतेखानची मोहीम नक्की झाल्यावर आदिलशहाने उत्रावळीच्या केदारजी खोपडेला फर्मान पाठवले होते. त्यात स्पष्टच लिहिले होते, फतेखान खुदावंदखान यांस कोंढाणा किल्ल्याच्या तर्फेस मसलत फर्माविली आहे. तरी हे फर्मान पोचताच त्याने स्वार व प्यादे यासह उपर्युक्त खानाच्या जवळ जाऊन त्याच्या आज्ञेत राहून दिवाणाची मसलत करावी.. थोडक्यात त्या तुटपुंज्या सैन्यालासुद्धा फोडण्याचा प्रयत्न झालेला. केदारजीचे फर्मान हे केवळ वानगीदाखल. ऋतुमानाचा विचार करायला वेळच नव्हता, कारण युद्ध शिवाजी महाराजांनी आरंभले नव्हते. त्यामुळे शत्रूचा सामना करणे एवढी एकच गोष्ट राजांच्या हातात होती. आता प्रश्‍न उरला तो फक्त अनुकूल भूमीचा आणि राजांनी ती अनुकूल भूमी हेरली. या वेळी राजांचे राज्य होते ते पुणे, इंदापूर, सुपे आणि काही मावळ भाग. कोंढाणा, तोरणा आणि राजगड हे किल्ले. सर्व मिळून आठशे गावे आणि थोडीफार शहरे (शिवाजी हिज लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स, ग. भा. मेहेंदळे, पृ १४१). राजांनी निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या तळहाताएवढ्या स्वराज्यात शत्रूला प्रवेश करू द्यायचा नाही. या युद्धासाठी शत्रूच्याच भूमीचा उपयोग करायचा आणि राजांनी निवड केली पुरंदर गडाची.

 

४. राजांनी पुरंदरात प्रवेश केला; पण कह्यात घेतला नाही !

पुरंदर किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मैलांवर होता. सासवडपासून सहा मैल पश्‍चिमेला डोंगराळ मुलुख, तर पूर्वेला सपाट मैदान, वायव्येला तेरा-चौदा मैलांवर सिंहगड, पश्‍चिमेला एकोणीस-वीस मैलांवर राजगड, असा पुरंदर होता. या तीन किल्ल्यांच्या मधला प्रदेश डोंगराळ असल्याने शत्रूला आत शिरणे कठीण, किल्ला मोठा आणि मजबूत. त्यामुळे गडावर मोठी शिबंदी राहू शकते. गडाची पश्‍चिमेकडील बाजू सोडल्यास इतर बाजू दुर्गम. सर्वार्थाने किल्ला योग्य होता; पण अडचण अशी की, तो शत्रूच्या कह्यात होता. तरीसुद्धा जमेची बाजू म्हणजे पुरंदरचे किल्लेदार महादजी नीळकंठराव सरनाईक आणि शहाजीराजे यांचा जुना स्नेह होता. त्यातच सरनाईक आता वृद्ध झाले होते आणि त्यांच्या चार पुत्रांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते. या परिस्थितीचा लाभ घेऊन राजांनी पुरंदरात प्रवेश केला; पण कह्यात घेतला नाही. म्हणजे किल्ला अजूनही शत्रूच्याच कह्यात होता. याचा अर्थ शत्रूची भूमी शत्रूशीच लढण्यासाठी राजांनी वापरली. केदारजीच्या पत्रावरून स्पष्ट होते की, खानाला आदिलशहाने कोंढाण्याच्या मोहिमेवर मुक्रर केले होते; पण राजे असे अचानक पुढे आल्यामुळे फतेहखानाला आपला विचार पालटावा लागला. कोंढाण्याकडे जाण्याऐवजी त्याने बेलसरजवळ मुक्काम केला. साधारणपणे ऑक्टोबर १६४८ ला खान तेथे पोचला असे मानले जाते. खान असेच करेल ही अटकळ राजांनी बांधली होती. आता राजांच्या कूटयुद्धाला प्रारंभ झाला.

५. कौटिल्याच्या सूत्रानुसार जिंकलो या कल्पनेने
निर्धास्त राहिलेल्या शत्रूवर आक्रमण करणारे शिवराय !

दुष्यबलेन वा स्वयं भङ्गं दत्वा जितम् इति विश्‍वस्तमविश्‍वस्त: सत्त्रापाश्रयोरभिहन्यात्। (१०.३.१५)

म्हणजे दुष्य (दुर्बल-कमकुवत) बलाच्या उपयोगाने म्हणजे स्वत:चे सैन्य कमकुवत आहे, असे दाखवून स्वत:ची फळी फुटल्याचे भासवून, जिंकलो या कल्पनेने निर्धास्त राहिलेल्या शत्रूवर स्वत: सावध राहून दबा धरून मारा करावा.

छावणी पडल्याबरोबर खानाने राजांच्या शक्तीचा अंदाज घ्यावा आणि आपल्या सैन्याचा उत्साह वाढावा; म्हणून बाळाजी हैबतरावाला शिरवळचे ठाणे जिंकायला पाठवले. खान स्वराजाच्या दिशेने निघाला असतांना राजांनी हा छोटा किल्ला घेतला होता. खानाच्या या योजनेमुळे त्याचे सैन्य विभागले गेले.

शिवभारतानुसार, पुरं शिरोबलं प्राप शिवसैन्यैरवारित:। (१३.१४)

म्हणजे शिवाजी महाराजांनी किल्ला लढवलाच नाही. कौटिल्याच्या सूत्रानुसार त्यांनी आपले बल किंवा सैन्य दूष्य असल्याचे भासवले आणि त्याच वेळी जितम् असा विश्‍वास खानाच्या मनात निर्माण केला. बाळाजीने हा किल्ला सहज जिंकला. खानाला विजयाचा आनंद देऊन बेसावध करण्यासाठी हा किल्ला सोडून दिला गेला. किल्ला सहजपणे हाती आल्यामुळे बाळाजी आणि त्याचे सैन्य या पहिल्या यशाने आनंदित झाले होते. शिवाजी महाराजांच्या नीतीचा त्यांना अंदाजच आला नव्हता. एकत्र त्यागघातौ म्हणजे एकाच वेळी माघार आणि परतून हल्ला या कूटयुद्धातल्या दुसर्‍या खेळीला राजांची सुरुवात झाली. खान बेसावध झाला, पण अविश्‍वस्त किंवा सावध राजांनी अजिबात वेळ न घालवता गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी ओणि भैरोजी चोर यांना लगोलग शिरवळची गढी घ्यायला पाठवले. त्याच दिवशी संध्याकाळी ही तुकडी पुरंदरवरून उतरून शिरवळच्या पायथ्याशी सत्र म्हणजे दबा धरून बसली. पहाटे शत्रू गाफील असतांना या सैन्याने आक्रमण केले. अशा आक्रमणाची कल्पनाच कोणी केली नव्हती.

 

६. जिवाची आशा सोडून रणांगणावर लढणारे मावळे !

बाळाजीने दरवाजा लावून घेतला; पण आदिलशहाच्या कारकीर्दीत कोटाकडे लक्ष दिले नसल्याने कोट मजबूत नव्हता. मावळ्यांनी कोट खणायला प्रारंभ केला. काही जणांनी शिड्या चढायला प्रारंभ केला. बाळाजीच्या सैन्याने दगड, गोटे, पलिते मिळेल त्याने प्रतिकार करायला प्रारंभ केला; पण मराठे इरेला पेटले होते.

कौटिल्यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, पुनरावर्तमानस्य निराशस्य च जीविते।
अधायो जायते वेगस्तस्माद्भग्नं न पीडयेत्।। (१०.३.५७)

ज्याने जिवाची आशा सोडलेली आहे आणि जो रणांगणावर परतला आहे, त्याची धडक थोपवता येत नाही. बघता बघता मावळ्यांनी तटाला खिंडार पाडले. कावजीने वेस फोडली. मराठ्यांचा आवेश पाहून हैबतरावाचा आणि सैन्याचा धीर सुटू लागला. शेवटी कावजीने हैबतरावाला ठार केले, हैबतरावाचे सैन्य शरण आले. शिरवळवरील लूट पुरंदरावर आली.

 

७. स्वराज्याची पहिली लढाई पूर्णपणे यशस्वी !

राजांनी एक तुकडी शिरवळवर पाठवली, त्याच वेळी दुसरी तुकडी फतेखानच्या छावणीवर बेलसरकडे पाठवली. याचे नेतृत्व बाजी पासलकर करत होते. थोड्या वेळात फतेखानच्या सैन्याने कडवा प्रतिकार आरंभला. खानाच्या सैन्यापुढे राजांचे सैन्य अगदीच तुटपुंजे होते. बाजीच्या सैन्याची हानी होऊ लागली. या झटापटीत निशाणाची तुकडी फतेखानाच्या सैन्याच्या तावडीत सापडली. ते पाहून बाजी जेधे पुढे सरसावला. निशाणाचा भाला आणि जखमी स्वाराला आपल्या घोड्यावर घेऊन तो परत फिरला. त्याच्या मागोमाग सारे सैन्य परतले. कोणकोणत्या परिस्थितीत सैन्याने माघार घ्यावी, याची एक मोठी सूचीच कौटिल्याने १०.२.१७ मधे दिली आहे. त्यानुसार सैन्य अनुकूल भूमीवर नसेल किंवा सैन्यावरील संकटाच्या प्रसंगी आपल्या सैन्याच्या रक्षणासाठी माघारी येण्याची सूचना कौटिल्याने केली आहे. आपल्यावरील संकटाचा विचार करून बाजी जेधे आणि सैन्य परतले. सैन्य गडात आल्यावर गडाचे दरवाजे बंद झाले. शिरवळ आणि बेलसर अशा दोन्ही ठिकाणी या पोराने आपला पराभव केला या कल्पनेने संतापलेल्या फतेखानाने पुरंदरावर आक्रमण केले. राजांचे सैन्य किल्ल्यात वरच्या बाजूला होते. त्याचा फायदा घेऊन फतेखानाचे सैन्य मार्‍याच्या टप्प्यात आल्यावर वरच्या दिशेने दगड, बाण यांचा मारा चालू झाला. सैन्य या मार्‍याने आणि वर चढण्याने दमलेले असतांना राजांनी अचानक गडाचा दरवाजा उघडला अन् ताज्या फौजेला बाहेर काढले. फार मोठी हातघाई झाली. गोदाजीने मुसेखानाच्या छातीत आपला भाला घुसवला. खानही अतिशय पराक्रमी होता. त्याने तो बाहेर काढला आणि त्याही परिस्थितीत तलवारीने लढू लागला (शिवभारत १४.५५-५७). पण गोदाजीच्या वाराने मुसेखान खांद्यापासून मध्यभागपर्यंत चिरला जाऊन गतप्राण झाला (उपरोक्त १४.९२). मुसेखानाची अवस्था पाहून फतेखानाचे सैन्य घाबरले आणि पळत सुटले. अत्यंत उत्साहात असणार्‍या मराठ्यांनी सासवडपर्यंत खानाच्या सैन्याचा पाठलाग केला. यात बाजी पासलकर ठार झाले; पण स्वराज्याची पहिली लढाई पूर्णपणे यशस्वी झाली. एकीकडे फतेखानला तोंड देतांना शहाजीराजांच्या सुटकेसाठी राजांनी संधीचा विचार केला.

 

८. कौटिल्याची तुल्यबळ आणि
बलवत्तर राजांशी संधी करावा, हीनबल राजाशी
विग्रह, ही नीती अवलंबणारे छत्रपती शिवाजी महाराज !

कौटिल्य म्हणतो, समज्यायोभ्यां संधीयेत हीनेन विगृह्णीयात्।(७.३.२)

तुल्यबळ आणि बलवत्तर राजांशी संधी करावा, हीनबल राजाशी विग्रह. राजे हीच खेळी खेळले. तुलनेने कमी शक्तीशाली आदिलशहाशी राजांनी लढाई केली आणि सामर्थ्यशाली दिल्लीशी संधी. त्यांनी गुजराथचा सुभेदार मुरादबक्ष याच्यामार्फत दिल्लीच्या शहाजहान बादशहाला एक विनंतीअर्ज पाठवला. त्यात त्यांनी मोंगलांचा सरदार होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच वेळी आदिलशहाने अटकेत टाकलेल्या आपल्या वडिलांची सुटका करावी, अशी विनंती केली. राजांचा हा अर्ज मान्य झाला. शहाजीराजांच्या अटक प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा सरदार मुस्तफाखान त्याच वेळी मेला. त्यामुळे आदिलशहावर दडपण आले. त्याने १६ मे १६४९ ला राजांची काही अटींवर सुटका केली. राजे युद्धभूमीवर आणि राजनीती दोन्ही ठिकाणी पूर्णपणे यशस्वी झाले.

कोणताही विजिगीषू राजा सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार करून वेगवेगळ्या योजना आखत असतो. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असतांना एकाकी राजांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा राजमार्ग तयार करते. यात राजांसमोर कौटिलीय अर्थशास्त्र होते कि नव्हते हे कळायला मार्ग नसला, तरी कौटिल्याचे कूटयुद्ध, संधी आणि शिवाजी महाराजांची कूटनीती अन् संधी विचार यात साम्यस्थळे मात्र निश्‍चितपणे दिसतात.

– आसावरी बापट

संदर्भ : दैनिक लोकसत्ता – ३ एप्रिल २०१५