चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे)

chaul-karma

 

१. व्याख्या

‘चूडा’ म्हणजे शेंडी. डोक्यावर शेंडीच्या चक्राच्या ठिकाणी सहस्रारचक्र असते. तिथे शेंडी ठेवून बाकीचे केस काढणे, याला ‘चौलकर्म’ किंवा ‘चूडाकर्म’ असे म्हणतात. उपनयन आणि प्रत्येक विधीमध्ये शेंडीला महत्त्व आहे.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

२. उद्देश

अ. आयुष्य, बल आणि तेज यांची वृद्धी व्हावी; म्हणून चौलकर्म (शेंडी ठेवणे) हा संस्कार करतात. शेंडीमुळे विश्वातील सत्त्वलहरी ब्रह्मरंध्रातून आत येण्यास साहाय्य मिळते. दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करते, तसे शेंडी कार्य करते.

आ. ‘शेंडीच्या ठिकाणी मेधा शक्ती जागृत झाली की, तिने तेथेच नित्य (कायम) रहावे (आमचा विवेक नेहमी जागृत रहावा) हा चौलकर्म करण्याचा उद्देश आहे. यावरूनच ‘खूण गाठ बांधणे’ आणि ‘शेंडीला गाठ मारणे’, असे म्हटले जाते.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१)

३. मुहूर्त

हा संस्कार तिसर्‍या, चौथ्या किंवा पाचव्या वर्षी (पाठभेद : पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या किंवा पाचव्या वर्षी) शुभघटिका पाहून करण्याची वहिवाट आहे. सध्या बहुधा मुंजीच्या वेळी हा विधी करतात.

 

४. संकल्प

‘बीज आणि गर्भ यांपासून उत्पन्न झालेल्या या बालकाच्या पातकांचा नाश होऊन बल, आयुष्य आणि ओज वृद्धींगत व्हावे, एतदर्थ श्री परमेश्वराच्या प्रीतीसाठी चौल नावाचा (शेंडी ठेवण्याचा) संस्कार करतो. त्यापूर्वी त्याचे अंगभूत श्री गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करतो.’

 

५. चौलकर्माशी संबंधित एक कृती
– जावळ (जाऊळ, जायवळ, प्रथमकेशखंडन)

शास्त्रानुसार मुलगा असल्यास ६, ८, १० इत्यादी सम मासात, तर मुलगी असल्यास १, ३, ५ इत्यादी विषम मासात जावळ काढावे. रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होते, त्या सुमारास त्याचे जावळ काढतात. त्या वेळी डोक्याच्या पुढच्या भागावर थोडेसे केस ठेवतात. थोडे केस ठेवण्याचे महत्त्व सूत्र ‘उद्देश’ यावरून लक्षात येईल. एक वर्षाच्या आत जावळ काढले पाहिजे, नाहीतर तीन वर्षे काढता येत नाही, अशी अनेकांची समजूत आहे; पण त्यास शास्त्राधार नाही. तीन वर्षांपर्यंत केव्हाही सममासात योग्य दिवस पाहून जावळ काढावे.

जावळ काढणे म्हणजे चौलकर्म नाही. (जावळ काढतांना शेंडी ठेवत नाहीत.)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’