‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे फळाचा रस आणि मद्य यांचे सेवन करण्याच्या संदर्भात केलेला अभ्यास


हिंदु संस्कृतीत आचारधर्माचे पालन करण्यास सांगितले आहे. धर्माचरणाच्या पालनाने मनुष्याला सात्त्विकतेचा लाभ होतो आणि त्याच्यावर झालेला रज-तमाचा प्रभाव अल्प होतो. पालन करायच्या आचारांमध्ये दिनचर्या, अन्नग्रहण, वस्त्रधारण, अलंकार परिधान करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. कलियुगात भारतात आचारधर्म लोप पावत आहे. अन्नग्रहण करण्याचा आचारही याला अपवाद नाही. पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे भारतातील लोकही मद्यपान करू लागले, हे याचे एक ठळक उदाहरण आहे.


खरेतर हिंदु धर्माने मद्यपानाचा निषेध केला आहे. वेदांत सुरापानाला 'महापाप' म्हटले असून सुरापानाचा निषेध कठोरपणे केला आहे. 'मद्यपीच नव्हे, तर त्याचे सहवासीही महापातकी आहेत', असे म्हटले जाते. मद्यपान करणे हे शरिराला घातकही आहे. मद्यामुळे शरिरात दाह उत्पन्न होतो. त्यामुळे पोटातील अतीसंवेदनशील त्वचेवर मद्याचा केवढा घातक परिणाम होत असेल, याची कल्पनाच केलेली न बरी. साखर आणि मीठ यांपेक्षा ४००० पट वेगाने मद्य रक्तात मिसळते. त्यामुळेही ते घातक आहे.

हिंदूंचे हे सांस्कृतिक अधःपतन होण्याचे कारण म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव ! फळांचा रस हा सात्त्विक आणि पौष्टिक असूनही तामसिक अन् घातक असलेले मद्य सेवन करणे, हे दुर्दैवाचे आणि बुद्धी गहाण टाकल्याचे लक्षण आहे. लोकांना हे कळावे आणि धर्मशिक्षण मिळावे, यांसाठी 'सनातन संस्थे'च्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात फळाचा रस आणि मद्य यांचे सेवन करणार्‍यांवर काय परिणाम होतो, याचा 'इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग' (Electrosomatographic Scanning) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे अभ्यास करण्यात आला. या प्रयोगांची माहिती येथे देत आहोत.

१. प्रयोगाची तत्त्वप्रणाली

'इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग' उपकरणाद्वारे ज्या व्यक्तीचे 'स्कॅनिंग' करायचे असते, त्या व्यक्तीचे कपाळ, तळहात आणि तळपाय यांवर इलेक्ट्रोडची प्रत्येकी एक जोडी लावून तिच्या शरिरात विद्युत ऊर्जेचा अती सौम्य प्रवाह सोडला जातो. त्यानंतर व्यक्तीचे 'स्कॅनिंग' केल्यावर तिच्या शरिरातील मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार या ७ कुंडलिनीचक्रांच्या कार्यरत असलेल्या स्थितीचा आलेख संगणकावर उमटतो.

२. प्रयोग

१०.१.२००९ ते ५.२.२००९ या कालावधीत केलेल्या प्रयोगात एकूण १० साधक सहभागी झाले होते. 'इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग' उपकरणाद्वारे प्रथम साधकांचे स्कॅनिंग करून त्यांच्या सप्तचक्रांच्या कार्यरततेच्या स्थितीचे (मूळ स्थितीचे) निरीक्षण (रिडींग) घेतले. नंतर त्या साधकांना फळाचा रस किंवा मद्य दिल्यावर ठराविक कालावधीने 'स्कॅनिंग' करून साधकांच्या सप्तचक्रांच्या कार्यरततेच्या स्थितीची निरीक्षणे घेतली. साधकांच्या सप्तचक्रांच्या कार्यरततेची मूळ स्थिती येईपर्यंत निरीक्षणांची नोंद केली.

या नोंदी कशा असतात, हे कळण्यासाठी येथे आपण प्रातिनिधिक स्वरूपात एका साधकाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या नोंदी बघूया. मद्य सेवन केल्यानंतर एका साधकाच्या सप्तचक्रांच्या मूळ नोंदींमध्ये कसा फरक पडला, हे यावरून लक्षात येईल.


प्रयोगामध्ये एखाद्या चक्राच्या नोंदीची संख्या त्या चक्राच्या मूळ स्थितीतील नोंदीपेक्षा न्यून होणे, म्हणजे ते चक्र निष्क्रीय होणे आणि याउलट ती संख्या वाढणे, म्हणजे ते चक्र सक्रीय किंवा कार्यरत होणे. वरील सारणीवरून मद्य सेवनामुळे वरची चार चक्रे निष्क्रीय झाली आहेत, असे लक्षात येते. मद्य सेवन केल्यानंतर या साधकाच्या चक्रांचा मिळालेला आलेख वर दिला आहे.

३. प्रयोगातील निरीक्षणे

अ. मद्यसेवन केल्यानंतर १० साधकांपैकी ७, म्हणजे ७० टक्के साधकांत वरच्या ४ चक्रांची निष्क्रीयता वाढली.

आ. फळाचा रस सेवन केल्यानंतर १० साधकांपैकी ६, म्हणजे ६० टक्के साधकांत वरच्या ४ चक्रांची निष्क्रीयता वाढली.

इ. दोन साधकांनी फळाचा रस सेवन केल्यानंतर त्यांच्या कुंडलिनीच्या वरच्या ४ चक्रांची निष्क्रीयता घटली; मात्र खालच्या ३ चक्रांची निष्क्रीयता वाढली.

ई. दोन साधकांनी फळाचा रस सेवन केल्यानंतर त्यांच्या कुंडलिनीच्या वरच्या ४ चक्रांची निष्क्रीयता वाढली आणि याच साधकांनी मद्य सेवन केल्यानंतर मात्र त्यांच्या कुंडलिनीच्या वरच्या ४ चक्रांची निष्क्रीयता लक्षणीयरित्या न्यून झाली.

उ. दोन साधकांच्या संदर्भात फळाचा रस अन् मद्य सेवन करणे या दोन्ही प्रयोगांत त्यांच्या कुंडलिनीच्या सर्व चक्रांची निष्क्रीयता वाढल्याचे आढळले.

ऊ. साधकांत फळाचा रस सेवन केल्यानंतर परिणामाचा किमान कालावधी ५ घंटे २१ मिनिटे होता, तर कमाल कालावधी ७६ घंटे ८ मिनिटे दिसून आला. त्याचप्रमाणे याच गटातील ५ साधकांत मद्य सेवन केल्यानंतर परिणामाचा किमान कालावधी २ घंटे १० मिनिटे होता, तर कमाल कालावधी १७० घंटे २१ मिनिटे दिसून आला.

४. वैज्ञानिकांना आवाहन

या प्रयोगांचे निष्कर्ष आणि व्यक्तीवर होणारे परिणाम यांच्या संदर्भात सनातन संस्था संशोधन करत आहे. यामध्ये पुढील गोष्टीही अभ्यासणे चालू आहे.

अ. प्रत्येक वस्तूमध्ये सत्त्व-रज-तम या गुणांचे ठराविक प्रमाण असते आणि त्याचा इतर गोष्टींवर परिणाम होतो. तसा 'मद्य' आणि 'फळाचा रस' यांतील त्रिगुणांचा सप्तचक्रांवर काय परिणाम झाला ?

आ. व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीचा काय परिणाम होतो ?

इ. व्यक्तीच्या सप्तचक्रांवर सात्त्विकता किंवा असात्त्विकता यांचा वेगवेगळा परिणाम होतो का ?

या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना प्रयोगांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍यांकडून साहाय्यता मिळाल्यास आम्ही आभारी होऊ.

(संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ, इ-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment