बिंदूदाबन उपायांविषयी तात्त्विक विवेचन (माहिती)

या लेखात बिंदूदाबन उपायांविषयी तात्त्विक विवेचन (माहिती), उपयुक्तता आणि लाभ पाहू.  

 

१. तात्त्विक विवेचन

अ. सिद्धांत

एखाद्या गोष्टीवर चैतन्याच्या स्पर्शाने दाबन केल्यावर त्याची मूळ प्रकृती, म्हणजेच प्रकृतीस्वरूप मूळ कार्यकारी गुणधर्म प्रकट होतो; कारण दाबन हे जडत्वदायी असल्याने ते पृथ्वीतत्त्वाच्या आधारे त्या त्या ठिकाणी घनीभूत असलेल्या शक्तीला जागृती देणारे, म्हणजेच तिचा प्रकृतीस्वरूप स्थायीभाव प्रकट करणारे असते.

आ. बिंदूदाबन पद्धतीत पाऊल; तळहात आणि
त्यामागील भाग अन् कान यांना विशेष महत्त्व असण्याचे कारण

मानवाची दोन्ही पावले; दोन्ही तळहात आणि त्यांमागील भाग अन् कान यांचा संबंध शरिरातील अवयवांशी असतो. या अवयवांशी संबंधित बिंदू दोन्ही पावले; दोन्ही तळहात आणि त्यांमागील भाग अन् कान यांवर असतात. या बिंदूंवर उपाय केल्याने शरिरातील संबंधित चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे मार्ग नियमित होऊन त्या त्या अवयवांचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे अवयवांच्या ठिकाणी किंवा त्यांच्याशी संबंधित बिंदूंच्या ठिकाणी साठलेल्या त्रासदायक शक्तीचे विघटन होऊन ती नष्ट होण्यास, तसेच देहाभोवती निर्माण झालेल्या त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते. या कारणाने बिंदूदाबन उपायपद्धतीत दोन्ही पावले; दोन्ही तळहात आणि त्यांमागील भाग अन् कान यांना पुष्कळ महत्त्व आहे.

Accupresure_points

पाऊल (पृथ्वीतत्त्व, शारीरिक व्याधी)

‘हे जडत्वजन्यता दर्शवणारे आहे. देहातील व्याधी (आजार) या ३० टक्के एवढ्या प्रमाणात पृथ्वीतत्त्वाशी, म्हणजेच देहधारणेशी संबंधित स्थूल स्वरूपाच्या शारीरिक व्याधींशी संबंधित असतात; म्हणून बिंदूदाबन पद्धतीत पृथ्वीतत्त्वात्मक शारीरिक व्याधींसाठी जडत्वजन्य पावलाची निवड केलेली आहे.

तळहात आणि त्यामागील भाग (तेजतत्त्व, मानसिक व्याधी)

तळहात आणि त्यामागील भाग हा तेजधारणेशी संबंधित आहे. काही व्याधी (आजार) ३० टक्के प्रमाणात तेजतत्त्वामुळे, म्हणजेच उष्णतेच्या संक्रमणातून निर्माण झालेल्या असतात. या व्याधी मानसिक स्तरावर निर्माण झालेल्या अनावश्यक व विकल्पजन्य विचारधारणेतून निर्माण होतात, म्हणून त्यासाठी तळहात अन् त्यामागील भाग हा प्रमुख संधानबिंदू मानला गेला आहे. यासाठीच बिंदूदाबन पद्धतीत मानसिक व्याधींवर मात करण्यासाठी तेजदायी तळहात अन् त्यामागील भागाची निवड केलेली आहे.

कान (आकाशतत्त्व, आध्यात्मिक व्याधी)

कान हा आकाशतत्त्व आणि नादतत्त्व यांच्याशी संबंधित असतो. काही व्याधी (आजार) या ४० टक्के प्रमाणात निदानाच्या पलीकडे गेलेल्या असल्याने त्यांना आध्यात्मिक स्वरूपाच्या व्याधी म्हणून उपमा दिली जाते; कारण या व्याधी आध्यात्मिक त्रासातून उद्भवलेल्या असतात. यासाठी नाददायी स्पंदने जागृत करणाऱ्या कानाच्या ठिकाणी स्थित असलेल्या बिंदूंना महत्त्व दिले आहे; म्हणून बिंदूूदाबन पद्धतीत आध्यात्मिक स्वरूपाच्या व्याधी परिणामात्मकरीत्या बऱ्या करून या उपायांचा परिणाम दीर्घकाल टिकवण्यासाठी नादजन्य कानपोकळीची निवड केलेली आहे. या तीन ठिकाणी असलेल्या बिंदूंच्या दाबनानंतर सर्वसाधारणतः सर्वच स्तरावर जिवाला सुखकर अनुभव येऊ शकतात आणि अल्प (कमी) कालावधीत त्याची रोगधारणेपासून मुक्तता होऊ शकते.

 

२. बिंदूदाबन उपायांची उपयुक्तता आणि लाभ

अ. उपयुक्तता आणि लाभ

  • या पद्धतीने प्रत्येकाला स्वतःचे स्वतःच व घरातल्या घरात उपाय करता येतात. हे उपाय आवश्यकतेप्रमाणे दिवसातून एकदा किंवा जास्त वेळाही करून घेता येतात.
  • या पद्धतीने रोगांची बाह्यलक्षणे अल्प करता येतात आणि पुनःपुन्हा उद्भवणाऱ्या एखाद्या रोगाची परिस्थिती आटोक्यात आणता येते.
  • अन्य एखाद्या प्रकारच्या उपायाच्या पद्धतीला साहाय्यक होऊन प्रकृतीत वेगाने सुधारणा घडवून आणणे शक्य होते.
  • या पद्धतीने शरिराचे अवयव अन् तंत्रव्यवस्था यांची कार्यक्षमता वाढवता येते.
  • अ‍ॅलोपॅथीच्या औषधांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांप्रमाणे या उपायांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
  • या उपायपद्धतीने प्रत्यक्षात जाणवणाऱ्या लाभापेक्षा कितीतरी जास्त लाभ होतो.
  • डॉक्टर येईपर्यंत किंवा रुग्णालयात भरती (दाखल) करेपर्यंत रुग्णाला होणाऱ्या त्रासाची तीव्रता अल्प करता येते.
  • हृदयविकाराचा किंवा दम्याचा झटका येणे, यांसारख्या शरिराच्या एखाद्या नाजूक अवस्थेत धोका टाळण्यासाठी पुढील वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत प्राथमिक उपाय करून रुग्णाला साहाय्य करता येते.
  • या उपायपद्धतीवर असलेला दृढविश्वास, स्वतःचे प्रयत्न आणि दृढ मनोबळ यांमुळे रोगमुक्त रहाता येते.

आ. लाभ न होणे

कित्येक अनुवंशिक रोग, स्किझोफ्रेनियासारखे मानसिक रोग, शस्त्रक्रियेची आवश्यकता असणारे रोग, कर्करोग, अस्थिभंग (फ्रॅक्चर) किंवा आतड्यामध्ये निर्माण झालेला अवरोध इत्यादी शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या रोगांंमध्ये बिंदूदाबन विशेष लाभदायक ठरत नाही.

इ. लाभ होण्यातील टप्पे

  • शारीरिक विकृती संपली, तर विकार नष्ट होतील.
  • मानसिक विकार नष्ट झाले, तर मानसिक आरोग्य चांगले राहील.
  • मानसिक आरोग्यातून चांगल्या विचारधारांचा जन्म होईल.
  • चांगल्या विचारधारा वैश्विक शांती येण्याच्या दृष्टीने जनमानसात वैचारिक क्रांती घडवून आणतील.
  • वैचारिक क्रांतीतूनच धर्मक्रांती उदयास येऊन ईश्वरी राज्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल.
  • ईश्वरी राज्याच्या मुहूर्तमेढीतूनच ईश्वरी राज्याची पहाट उगवेल.
संदर्भ : सनातन प्रकाशित ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’