प.पू. डॉक्टर आणि श्रीमती आनंदीबाई पाटील यांच्या भेटीच्या वेळचा साधिकांनी अनुभवलेला भावसोहळा !

patil_Aaji-Kaman_clr

१. पाटीलआजींना पाहिल्यावर त्यांच्याकडे खेचले जात आहे,
असे वाटणे आणि त्या लवकरच संतपद गाठतील, असे वाटणे

श्रीमती आनंदीबाई पाटीलआजी कुटुंबियांसहित आश्रम पहाण्यासाठी रामनाथीला आल्या. तेव्हा माझा त्यांच्याशी प्रथम संपर्क आला. आजींकडे पाहिल्यावर पुष्कळ जवळीक असल्याचे वाटून आपोआप त्यांच्याकडे खेचली जात आहे, असे जाणवले. आजींनी माझा हात त्यांच्या हातात घेऊन प्रेमाने माझी चौकशी केली. तेव्हा माझ्या मनाला फार आनंद जाणवत होता. त्यांचा स्पर्शही पुष्कळ मृदु जाणवला. त्या वेळी माझ्या मनात आजींची साधनेची वाटचाल संतपदाकडे होत असून लवकरच आजी पू. आजी होतील, असा विचार आला. आश्रमातील अनेक साधकही त्यांच्याकडे पाहून या कोण आहेत ? कोणी संत आहेत का ?, असे विचारत होते. यावरून आश्रमातील साधकांनाही त्यांच्याविषयी तसेच जाणवत आहे, असे माझ्या लक्षात आले.

 

२. देवाचे भक्त देवासाठी कसे व्याकूळ असतात, हे प्रत्यक्ष अनुभवता येणे

प.पू. डॉक्टरांनी सर्वप्रथम आजींना नमस्कार केला. प.पू. डॉक्टरांना भेटतांना आजी आसंदीवरून उठल्या. प.पू. डॉक्टर हात जोडून आजींना वाकून नमस्कार करत होते. तेव्हा आजींनी प.पू. डॉक्टरांना वात्सल्यपूर्ण आलिंगन दिले. आजी त्याच स्थितीत भावाश्रूंसहित होत्या. आतापर्यंत देवाचे भक्त देवासाठी कसे व्याकूळ असतात ? देवदर्शनाने त्यांची स्थिती कशी होते ?, हे वाचले होते; मात्र आज ते प्रत्यक्ष पाहिले अन् अनुभवले. आजींच्या त्या स्थितीचे वर्णनच करता येत नाही. त्या वेळी प.पू. डॉक्टर त्यांना म्हणाले, आजी, आता कृष्णाकडेच जा. आता केवळ हिंदु राष्ट्र आणि साधक यांच्यासाठी नामजप करा.

हा सोहळा पहातांना मला पू. पेठेआजींची प्रकर्षाने आठवण झाली. काही वेळाने प.पू. डॉक्टरांनी आजींना आसंदीत (खुर्चीत) बसण्यास सांगितले. आजींकडे पाहून आजींना आजूबाजूच्या विश्‍वाची काहीच जाणीव नव्हती, असे जाणवले. त्या नमस्काराच्या मुद्रेत आणि भावस्थितीत बसलेल्या होत्या. प.पू. डॉक्टर त्यांची स्थिती पाहून म्हणाले, आजी अखंड आनंदावस्थेत आहेत. या स्थितीला गेल्यावर अन्य कशाचेच, उदा. आजूबाजूला काय चालू आहे ? कोण काय बोलत/सांगत आहे ?, याला महत्त्व उरत नाही. त्या शब्द आणि माया यांच्या पलीकडील आत्मानंदावस्थेत आहेत.

वरील घटना चालू असतांना वातावरणात वेगळाच थंडावा जाणवत होता. माझे मन निर्विचार झाले होते. एरव्ही अशा प्रसंगी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांत अलगद भावाश्रू येतात; पण आज असे न होता केवळ आनंद जाणवत होता.
– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

३. आजींनी प.पू. डॉक्टरांना वात्सल्यपूर्ण आलिंगन दिल्यावर त्रेतायुगात
शबरी श्रीरामाला भेटल्यानंतर तिची जी अवस्था झाली होती, ती पहायला मिळणे

श्रीमती आनंदी पाटीलआजी, त्यांची नात आणि नातजावई हे इतर साधकांसमवेत आश्रमदर्शन करत असतांना मी आजींना पाहिल्यावर आजींची पातळी चांगली असणार, असे वाटले. त्यानंतर प.पू. डॉक्टरांसमवेत भेटीच्या वेळी मला तेथे उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी आजींचे सतत भावाश्रू वहात होते. आजींनी प.पू. डॉक्टरांना वात्सल्यपूर्ण आलिंगन दिले, तेव्हा त्रेतायुगात शबरी श्रीरामाच्या भेटीसाठी जशी व्याकूळ झाली होती आणि श्रीराम भेटल्यानंतर साक्षात् देवाला पाहून तिची जी अवस्था झाली असेल, ते सर्व ग्रंथांमध्ये वाचले होते किंवा ती गोष्टी ऐकली होती; पण प्रत्यक्षात शबरी श्रीरामाला भेटल्यावर तिची भावावस्था कशी होती ? ते आज मला जाणवले. आजी नावाप्रमाणे आनंदीच दिसत होत्या.
– सौ. सुजाता रेणके, रामनाथी आश्रम, गोवा.

 

४. आजी प.पू. डॉक्टरांशी एकरूप झाल्या आहेत, असे वाटणे

४.२.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या भेटीच्या वेळी मुंबईच्या श्रीमती आनंदी पाटीलआजींनी भावस्थितीत प.पू. डॉक्टरांना वात्सल्यपूर्ण आलिंगन दिले. तेव्हा त्या प.पू. डॉक्टरांशी एकरूप झाल्या आहेत, असे जाणवून तो प्रसंग पहातच रहावा, असे वाटले. त्या वेळी मला तिथे पांढरा प्रकाश दिसत होता आणि गुरु-शिष्याचे नाते कसे असते ? ते पहायला मिळाले.
– श्रीमती उषा कदम, अकलूज, महाराष्ट्र.

 

९५ वर्षे वयाच्या असूनही संपूर्ण रामनाथी
आश्रमदर्शन पायी करणार्‍या श्रीमती आनंदी पाटीलआजी !

श्रीमती पाटीलआजींचे वय ९५ वर्षे असून त्यांनी सर्व आश्रम पाहिला. प्रत्येक मजल्यावरून खाली येण्यासाठी असलेल्या उताराच्या रस्त्याने गाडीने येणार का ?, असे विचारल्यावर आजी म्हणायच्या, मी चालू शकते. आश्रम पुष्कळ मोठा असल्याने बराच वेळ चालावे लागते. एवढे चालूनही आजींनी न थकता सर्व आश्रम पाहिला. – कु. वैष्णवी सारंगधर, सनातन आश्रम, गोवा.

 

५. सतत भावावस्थेत असलेल्या आणि संतांप्रती उत्कट
शरणागत भावाचे दर्शन घडवून सर्वांना भावसोहळ्याचा
आनंद प्रदान करणार्‍या वरळी, मुंबई येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) !

Pu_saurabhdada_ani_aaji3_clr

श्रीमती आनंदी पाटीलआजी आणि पू. सौरभ जोशी यांच्या भेटीतील भावस्पर्शी क्षण

वरळी, मुंबई येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) या नातेवाइकांसह रामनाथी येथील सनातन आश्रमात आल्या होत्या. तेव्हा श्रीमती आजींचा ईश्‍वराप्रती असलेला आणि क्षणोक्षणी व्यक्त होणारा भाव बघायला मिळाला, तसेच संतांचे दर्शन होताच त्यांच्या चरणी नतमस्तक होत असतांना त्यांच्यातील कृतज्ञता आणि शरणागत भावाचे दर्शन साधकांना घडले. याद्बारे साधकांना भावसोहळ्याचा अवर्णनीय आनंद अनुभवता आला. तो शब्दबद्ध करणे कठीण आहे, तरीही तो सर्वांना अनुभवता यावा, यासाठी गुरूंच्या कृपेने शब्दबद्ध करण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.

५. अ. पाटीलआजी भेटायला आल्यावर पू. सौरभदादांच्या आनंदाला पारावार न उरणे

श्रीमती पाटीलआजी त्यांच्या नातेवाइकांसह पू. सौरभदादा यांच्या खोलीत आल्या. आजी येत आहेत, हे समजताच पू. दादा पुष्कळ आनंद व्यक्त करू लागले. आजी जवळ आल्यानंतर पू. सौरभदादांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते खदखदून हसत होते. श्रीमती आजींनी पू. दादांच्या चरणांचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला. त्यानंतर आजींनी दोन्ही हात स्वतःच्या शरिरावरून फिरवले आणि पुन्हा नमस्कार केला.

मी : पू. दादा, आजींना ओळखले का ?

पू. दादा : हो ! (पुष्कळ हसू लागले.)

(आजींनी पू. दादांच्या शरिरावरून हात फिरवला आणि एक पापी घेतली.)

आजी : माझा सोन्या तो ! (पू. दादा पुन्हा पुष्कळ हसू लागले.)

त्यानंतर आजी राधाकृष्ण, राधाकृष्ण, असे म्हणून नाचू लागल्या. त्या वेळी पू. दादाही हात उंचावून आनंद व्यक्त करू लागले.

५. आ. पू. सौरभदादांनी आजींना खाऊ देण्यास
सांगणे आणि त्या निघाल्यावर पू. दादांना गहिवरून येणे

आजी आणि त्यांचे नातेवाइक आश्रमदर्शनासाठी निघाल्यावर पू. दादांनी त्यांना बसा, असे सांगितले. आजी बसल्यानंतर पू. दादांनी त्यांना खाऊ देण्यास सांगितला. नंतर सर्व जण निघाल्याचे पाहून पू. दादांना गहिवरून आले.

५. इ. पू. (सौ.) भावना शिंदे आणि पाटीलआजी यांची भावस्पर्शी भेट !

खोलीबाहेर आल्यावर तेथे पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली या उपस्थित होत्या. मी आजी आणि पू. भावनाताई यांची भेट घालून दिली. आजींना पू. भावनाताई यांच्या संदर्भात सांगताच त्यांनी पू. भावनाताईंना मिठी मारली. त्या वेळी आजींच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. आजींची भावावस्था पाहून पू. भावनाताईंचेही डोळे पाणावले. आजींनी पू. भावनाताईंचे हात घेऊन डोक्याला लावले आणि नमस्कार केला. त्या वेळीचा तो भावसोहळा पाहून आम्हा उपस्थितांचीही भावजागृती झाली.
४. आजींना पुन्हा आश्रमात पाहिल्यावर त्यांना प.पू. गुरुदेवांचे दर्शन होईल आणि प.पू. गुरुदेव त्यांना संत म्हणून घोषित करतील, असे जाणवले

– श्री. संजय जोशी (पू. सौरभदादा यांचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

६. नावाप्रमाणेच आनंदी असणार्‍या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या
बळावर आध्यात्मिक त्रासावर मात करणार्‍या श्रीमती पाटीलआजी !

६ अ. जाणवलेली सूत्रे

१. आजी नावाप्रमाणेच नेहमी आनंदी असतात.
२. सतत नामजप चालू असणे : वयाच्या ९५ व्या वर्षी आजी ६ ते ८ घंटे एका जागी बसून नामजप करतात, तसेच दिवसभर त्यांचा सतत नामजप चालू असतो.
३. वयस्कर असूनही भावपूर्णरित्या घराची स्वच्छता करणे : त्यांना कोणताही शारीरिक त्रास नाही. अजूनही त्या घरातील लादी स्वतः स्वच्छ पुसतात. लादी चकचकीत दिसली की, देव त्याच्यावर बसतात, असा आजींचा भाव आहे.
४. आजींकडे बघून पुष्कळ तेज जाणवते.
५. आजींनी मिठीत घेतले की, मन शांत होते. त्या मायेने पाठीवर हात फिरवतात, त्या वेळी आलेली अनुभूती मी शब्दांत सांगू शकत नाही.
६. आजी बोलत असतांना भाव जागृत होतो. आजींचे बोलणे ऐकत रहावे, असे वाटते.

६. आ. आजींना वाईट शक्तींचे झालेले त्रास आणि त्यांनी त्यावर केलेली मात

१. वाईट शक्ती बाजूला येऊन झोपणे, आजींनी घाबरून मोठमोठ्याने ओरडणे आणि आजींनी नामजप वाढवल्याने त्यांचा त्रास न्यून होणे

दोन वर्षांपूर्वी आजींना वाईट शक्तींचा पुष्कळ त्रास होत होता. वाईट शक्ती आजींच्या बाजूला येऊन झोपायची आणि त्रास द्यायची. त्यामुळे आजी फार घाबरत असत. त्या मोठमोठ्याने ओरडायच्या. त्याच कालावधीत आजी १ मास (महिना) देवद आश्रमात राहून आल्या. त्यानंतर त्यांनी नामजप पुष्कळ वाढवला. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे काठी हातात घेतलेले छायाचित्र समोर ठेवले आणि वाईट शक्तींना त्या सांगू लागल्या, तुम्हाला आता बाबा काठीने मारतील. त्यानंतर हळूहळू आजींचा त्रास न्यून झाला.

२. आजींनी देवाला सुदर्शनचक्र सोडायला सांगितल्यावर वाईट शक्ती पळून जाणे

एकदा झोपेत आजींचे पाय वाईट शक्तींना लागले. तेव्हा वाईट शक्तींनी आजींच्या दोन्ही पायांवर बरेच बुक्के मारले. तेव्हा आजींनी देवाला सांगितले, तुमच्या हातातील सुदर्शनचक्र सोडा. त्यानंतर त्या वाईट शक्ती पळाल्या.

३. विविध त्रास होणे आणि प.पू. पांडे महाराज यांचे उपाय अन् पू. अनुताईंचे बोलणे, यांमुळे बरे वाटणे

१५.१२.२०१५ या दिवशी पाटीलआजींना चक्कर येणे, जुलाब होणे, जेवण न जाणे, पोट दुखणे, असे त्रास सुरु झाले होते. असे त्रास होत होते. दोन-दोन दिवसांनी त्रास पालटत होते. (एवढा त्रास होऊनही आजींचा तोंडवळा फार तेजस्वी दिसत होता.) आजींना डोकेदुखीचाही त्रास होतो. प.पू. पांडे महाराज यांनी उपाय सांगितल्यावर आणि पू. अनुताई बोलल्यावर आजींना बरे वाटले अन् आनंदही झाला. पातळी वाढते; म्हणून त्रास वाढत आहे, असे पू. अनुताई म्हणाल्या. हे आजींना सांगताच त्या हसत म्हणाल्या, गुरूंनी ३ टक्के कशाला ठेवले बाय, देऊन टाकायचे ना !

६ इ. डोळ्यांसमोर पंढरपूरचे मंदिर
आणि साधकांच्या गळ्यापर्यंत पाणी आलेले दिसणे

त्यांना डोळ्यांसमोर साधक, पंढरपूरचे मंदिर आणि साधकांच्या गळ्यापर्यंत पाणी आलेले दिसते. आजी बसतात, त्या ठिकाणी त्यांना भूमीवर विविध तोंडवळे दिसतात. (ते ओळखू येत नाहीत, असे आजी सांगतात.)

 

७. आजींना आलेल्या अनुभूती

७ अ. भिंतीवर राधा-कृष्ण खेळतांना आणि नाचतांना दिसणे

आजी घरात नामजप करतांना समोरच्या भिंतीवर श्रीकृष्ण बासरी वाजवतांना दिसतो. तेथे राधा-कृष्ण बराच वेळ खेळतांना आणि नाचतांना दिसतात, जणूकाही घरात रासलीलाच चालू असते.

७ आ. श्रीकृष्णाने बोलावल्यावर नाम सोडून येणार नसल्याचे सांगणार्‍या आजी !

एकदा श्रीकृष्णाने आजींना बोलावले, तेव्हा आजी श्रीकृष्णाला म्हणाल्या, मी नाम सोडून येणार नाही. तेव्हा श्रीकृष्णाने आजींचे छायाचित्र काढले. नंतर श्रीकृष्णाने जवळ घेतले आहे, असे आजींना दिसत होते.

७ इ. परमेश्‍वर रथातून घरी येणे,
त्याला काय द्यावे ?, असा प्रश्‍न पडणे आणि थोड्या वेळाने
तो रुमालाने हात अन् तोंड पुसत माळ्यावरून खाली उतरत असल्याचे दिसणे

एकदा आजींना पुढील दृश्य दिसले. त्या स्वतः रथामध्ये बसल्या आहेत. गरुड पंख हलवत त्यांच्यासमोर आला. त्याची चोच बरीच मोठी होती. दुसर्‍या वेळी आजींच्या जवळ रथ थांबला. रथातून परमेश्‍वर उतरला. मग आजींना प्रश्‍न पडला, आमच्याकडे काही नाही. आता परमेश्‍वराला काय देऊ ? नंतर परमेश्‍वर कुठेतरी गेला आणि थोड्या वेळाने रुमालाने हात अन् तोंड पुसत आजींकडे बघत घराच्या माळ्यावरून खाली उतरला. देवाने रथ बाहेर काढला. आजींनी देवाला सांगितले, जागा उंच खोल आहे. जरा सावकाश रथ न्या.

७ ई. प.पू. भक्तराज महाराज काठी घेऊन चालत समोर आल्याचे दिसणे

एकदा आजी झोपलेल्या असतांना बाजूला ठेवलेले घड्याळ पडले. तेव्हा प.पू. भक्तराजबाबा काठी घेऊन चालत आजींच्या समोर आलेले त्यांना दिसले. आजी म्हणाल्या, बाबा, तुम्ही का आलात ? तेव्हा ते म्हणाले, काहीतरी गडबड झाली, असे मला वाटले; म्हणून आलो. आजी म्हणाल्या, काही नाही झाले. तुम्ही जा. तेव्हा ते पुन्हा ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले.
– सौ. उर्मिला खानविलकर, वरळी, मुंबई. (९.२.२०१६)

   (भाव तेथे देव या उक्तीनुसार पृष्ठ ६ आणि ७ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक)

 

८. भावजागृती आणि आनंद यांची अनुभूती देणारी
प.पू. डॉक्टर अन् श्रीमती आनंदी पाटीलआजी यांची भेट !

१. आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ अ. आजींचे बोलणे ऐकतांना आजी बहुतेक संतपदाला जाणार, असे विचार माझ्या मनात येत होते.

१ आ. प.पू. डॉक्टर प्रत्येक ठिकाणी सूक्ष्मातून स्वतःसमवेत असतात, असे जाणवणे : मी ज्या ज्या ठिकाणी जाते, त्या त्या ठिकाणी प.पू. डॉक्टर माझ्यासमवेत सूक्ष्मातून असतात आणि त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती ते सातत्याने मला देतात. मला ते संत आणि साधक यांच्या माध्यमातून भेटतात आणि प्रेम देतात, हे आठवून माझी भावजागृती होत होती. ते निर्गुणातून अखंड माझ्या समवेत होतेच, आहेत आणि आता निर्गुणातून सगुणात प्रगट होत आहेत, असे विचार येऊन माझी भावजागृती होत होती.

१ ई. प.पू. डॉक्टर आणि आजी यांच्या भेटीच्या वेळी खर्‍या भक्ताला भेटण्याची ओढ ईश्‍वरालाच अधिक असते, हे जाणवणे : काही वेळात प.पू. डॉक्टर आणि आजी यांची भेट झाली. तेव्हा खर्‍या भक्ताला भेटण्याची ओढ ईश्‍वरालाच अधिक असते, हे या प्रसंगातून अनुभवले. या भेटीच्या वेळी माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते आणि मला आतून आनंद जाणवत होता. मी स्वतःला आजींच्या जागी अनुभवण्याचा प्रयत्न करत होते. भगवंताच्या कृपेमुळे ही अवस्था पुष्कळ वेळ अनुभवता आली. खोलीत एक वेगळाच थंडावा जाणवत होता आणि सुगंध येत होता. नंतरही आजी पुष्कळ वेळ भावावस्थेत होत्या. त्यांच्या तोंडवळ्याकडे पहातांना पुष्कळ आनंद जाणवत होता. या भेटीत भावानंद या शब्दाची प्रत्यक्ष अनुभूती देवाने दिली. देव केवळ भावाचा भुकेला आहे आणि मनातील भाव-भक्ती न बोलताही देवापर्यंत पोचते, हे शिकायला मिळाले.

हे श्रीकृष्णा, आजींसारखी भाव-भक्ती माझ्यामध्ये निर्माण होऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

२. श्री. संजय नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ अ. पाटीलआजींच्या तोंडवळ्यावरील तेज आणि भाव पाहून त्या संत असाव्यात, असे प्रकर्षाने जाणवणे : श्रीमती पाटीलआजींना पाहिल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरील तेज आणि भाव पाहून त्या संत असाव्यात, असे प्रकर्षाने जाणवले. त्यांच्यासाठी ठेवलेली आसंदी माझ्यासमोरच होती. आजी येण्यापूर्वी त्या ठिकाणी एक संत बसतील, असे मला वाटत होते. आजी त्या आसंदीवर बसल्यावर ती आसंदी संतांसाठी आहे, हे माझे अनुमान योग्य असावे, असे मला वाटले.

२ आ. पाटीलआजींनी प.पू. डॉक्टरांना दिलेले वात्सल्यपूर्ण आलिंगन पाहून संतांचीच गळाभेट होत आहे, असे जाणवणे : नंतर प.पू. डॉक्टरांंना भेटल्यावर आजींची झालेली भावावस्था आणि त्यांनी प.पू. डॉक्टरांना दिलेले वात्सल्यपूर्ण आलिंगन पाहून संतांचीच गळाभेट होत आहे, असे जाणवले. त्या बोलतांना, तसेच अनुभूती सांगतांना चैतन्य आणि पुष्कळ आनंद जाणवत होता !

३. सौ. निर्मला ढवण आणि सौ. माया भंडारे, विटा, सांगली.

३ अ. पाटीलआजींकडे पाहिल्यावर पू. पेठेआजींची आठवण होणे : श्रीमती आनंदी पाटीलआजी खोलीत आल्या, तेव्हा आजींची पातळी ६७ टक्के आहे, असे समजले. त्यांच्याकडे पाहिल्यावर पू. पेठेआजींची आठवण झाली.

३ आ. आजी संतपदाला पोहचल्या आहेत, असे जाणवणे : आजी माझ्याजवळ येऊन बसल्या. मी त्यांच्या पायाला स्पर्श केला, तेव्हा काहीतरी वेगळे वाटले. त्या संतपदाला पोचल्या असून निर्गुण तत्त्वाशी एकरूप झाल्या आहेत, असे वाटले.

४. सौ. सुनिता पाटील आणि सौ. शुभांगी प्रशांत चव्हाण, तासगाव, सांगली.

४ अ. आजी खोलीत आल्यावर चैतन्य जाणवणे : आजी खोलीत आल्यानंतर पुष्कळ चैतन्य जाणवले. त्या सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात आहेत, असे वाटले. आजींच्या तोंडवळ्यावर तेज आणि चैतन्य जाणवत होते. आजी खोलीत आल्यावर उपाय होऊ लागले.

४ आ. प.पू. डॉक्टर आणि आजी यांच्या भेटीच्या वेळी प.पू. डॉक्टर आणि आजी एकरूप झाले आहेत, असे वाटणे : प.पू. डॉक्टर आणि श्रीमती आनंदी पाटीलआजी यांची भेट झाली. तेव्हा त्या पुष्कळ भावावस्थेत होत्या. तेव्हा सर्वांचीच भावजागृती झाली. या वेळी प.पू. डॉक्टर आणि आजी एकरूप झाले आहेत, असे वाटले.

५. सौ. सविता बाबर, कराड, सातारा.

५ अ. आजी भावावस्थेत असल्याचे जाणवणे : आजींकडे पाहून भाव जागृत होत होता. त्या भावावस्थेत असल्याचे जाणवले. त्यांचा तोंडवळा पुष्कळ आनंदी आणि निरागस दिसत होता.

 

९. पू. श्रीमती आनंदीबाई पाटीलआजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. श्रीमती आजींना आलेल्या अनुभूती

१ अ. मी नामजपाला बसल्यावर प्रत्यक्ष प.पू. गुरुदेव मांडी घालून माझ्यासमोर येऊन बसतात आणि माझा नामजप ऐकतात, असे आजी सर्वांना सांगतात.

१ आ. नामजपाला बसल्यावर देवतांनी चित्रांतून बाहेर येऊन आजी करत असलेला नामजप ऐकणे : आजी त्यांच्या घरी जिथे जपासाठी बसतात, तिथे त्यांनी समोरच दैनिक सनातन प्रभात, प.पू. भक्तराज महाराज यांची स्मरणिका आणि राम, कृष्ण अन् गणपति इत्यादी देवतांची चित्रे ठेवली आहेत. मी नामजपाला बसले की, त्या चित्रांतील सर्व देवता त्यांची जागा सोडून माझा जप ऐकण्यासाठी पुढे येतात, असे आजी सर्वांना सांगतात. त्याच वेळी त्या देवाकडे कृतज्ञताही व्यक्त करतात.

१ इ. आजींना प.पू. गुरुदेव आणि दोन व्यक्ती दिसणे अन् त्यांपैकी एकीने दुसर्‍या व्यक्तीला नमस्कार केल्यावर तिने खुणेने समोर बसलेल्या आजींना नमस्कार करण्यास सांगणे : एकदा आजी नामजपाला बसल्या असतांना त्यांना प.पू. गुरुदेव आणि एका बाजूला दोन व्यक्ती दिसल्या. त्यांतील एक व्यक्ती समोर पाटावर बसली होती आणि दुसरी व्यक्ती त्या पाटावर बसलेल्या व्यक्तीला नमस्कार करत होती. तेव्हा पाटावर बसलेली व्यक्ती हातानेच खुणा करून त्या व्यक्तीला सांगत होती, मला नको. समोर आजी बसल्या आहेत, त्यांना नमस्कार करा.

१ ई. आजींची विमानाने गोव्याला जाण्याची इच्छा प.पू. गुरुदेवांनी पूर्ण करणे : एकदा आजी गुरुदेवांना सांगत होत्या, गुरुदेवा, मला विमानात बसण्याची फार इच्छा आहे आणि आता मी पुष्कळ म्हातारी झाले आहे. तुम्हाला भेटायला गाडीने येऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी विमानच पाठवा. तेव्हा प्रतिमेतील गुरुदेव हसू लागले, असे आजींनी सर्वांना सांगितले. काही मासांनंतर (महिन्यांनंतर) आजींच्या नातींचे गोवा येथे सहलीला जाण्याचे नियोजन चालू झाले. त्या सर्व विमानातून सहलीला जाणार होत्या. त्या वेळी तिकिटे काढतांना आजींनाही विमानाने आपल्यासह घेऊन जावे, असा विचार त्यांच्या मनात आला. अशा प्रकारे आजींच्या विमानप्रवासाचे नियोजन झाले आणि आजी विमानाने गोव्याला गेल्या. हे सर्व नियोजन प.पू. गुरुदेवांनीच करवून घेतले, असे आजींना आणि त्यांच्या कुटुंबियांना वाटत होते. तेव्हा आजी गुरुदेवांप्रती सतत कृतज्ञता व्यक्त करत होत्या, देवा, तूच माझी इच्छा पूर्ण केलीस.

१ उ. रामनाथी आश्रमात आल्यावर एका साधिकेने आजींना तेथेच थांबण्यास सांगितल्यावर आजींच्या डोळ्यांत भावाश्रू येणे : आजी रामनाथी आश्रमात स्वागतकक्षात बसल्या होत्या. त्या वेळी तेथील एक साधिका आजींच्या जवळ आली आणि त्यांच्या पायापाशी बसून म्हणाली, आजी, तुम्ही आलात. मला फारच आनंद झाला; कारण कालच मी तुमची आठवण काढली होती आणि आज तुम्ही आलात. आता जाऊ नका. इथेच रहा. त्या वेळी आजींच्या डोळ्यांत भावाश्रू आले.

१ ऊ. प.पू. डॉक्टरांच्या भेटीनंतर २ दिवस भावावस्थेत असणे आणि सतत कृतज्ञता व्यक्त करणे : प.पू. डॉक्टरांना भेटल्यानंतर आजी २ दिवस भावावस्थेत होत्या, सतत गुरूंची आठवण काढून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत होत्या. आजी सतत म्हणत होत्या, माझी पात्रता नसतांना गुरूंनी मला पुष्कळ काही दिले आहे. माझ्यावर पुष्कळ प्रेमही केले आहे. मी देवाची ऋणी आणि कृतज्ञ आहे.

१ ए. हे लिखाण लिहून झाल्यानंतर आजींनी त्या लिखाणात मला गुरु दिसतात, असे सांगितले.

– सौ. दीपा म्हात्रे, डोंबिवली, ठाणे आणि सौ. कपिला महेश घाणेकर, शिवडी, मुंबई.