देवपूजा

`हिंदु धर्मातील सगुण उपासनापद्धतीचा पाया म्हणजे ‘देवपूजा’ ! ‘नित्याच्या धावपळीच्या दिनक्रमात देवपूजेसाठी एवढा वेळ आहे कोणाला ?’, अशी नकारात्मक मानसिकता हल्ली बर्‍याच जणांमध्ये आढळते. केवळ एक नित्यकर्म पार पाडायचे म्हणून देवावर भरभर पाणी घालायचे, गंधाचा टिळा लावायचा आणि फूल वाहून उदबत्तीने ओवाळायचे अन् ‘देवपूजा झाली’, अशी स्वतःची समजूत करून घ्यायची, असे चित्र आज दिसून येते. सर्वांच्या पालनपोषणाची काळजी वहाणार्‍या भगवंताची पूजा अशा प्रकारे ‘उरकणे’, याला देवपूजा म्हणता येईल का ? असे केल्यावर भगवंताने आपल्यावर कृपा तरी का करावी ? जसे घरी येणार्‍या अतिथीचे आपण आदरपूर्वक स्वागत करतो, तसेच देवाचे केले, म्हणजेच देवाची यथासांग आणि भक्तीभावाने पूजा केली, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.

प्रस्तुत लेखात आपण देवपूजा म्हणजे काय, देवपूजेची निर्मिती, महत्त्व, प्रकार, काही देवतांच्या पूजनाची वैशिष्ट्ये आणि त्यांमागील कारणे, देवपूजा दिवसात किती वेळा आणि कोणत्या समयी करावी, देवपूजा कधी करू नये यांविषयीचे शास्त्र पहाणार आहोत.

१. देवपूजा : व्याख्या

देवतेला श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधीयुक्त केलेले उपचारसमर्पण म्हणजे ‘देवपूजा’. ‘देवतेची प्रतिमा अथवा मूर्ती यांची शास्त्रोक्त पद्धतीने करावयाची पूजा देवतेला अपेक्षित अशी झाल्यास ती खर्‍या अर्थाने ‘पूजा’ होते.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.१.२००५, रात्री ८.१३)

 

२. निर्मिती

२ अ. पूजाविधीशी संबंधित कृतींची निर्मिती ब्रह्मांडातील इच्छाशक्तीच्या साहाय्याने झालेली असणे

‘पूजा करणे, नैवेद्य दाखवणे यांसारख्या कर्मकांडाशी संलग्न कृती ब्रह्मांडातील इच्छाशक्तीशी संबंधित असतात. या कृती करतांना जिवाच्या भावाप्रमाणे त्याला त्या त्या कृतीतून त्या त्या देवतेच्या इच्छाशक्तीशी संबंधित लहरी मिळतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १७.१२.२००८, सकाळी ८.३५)

 

३. महत्त्व

३ अ. मूर्तीवरील पूजादी संस्कारांमुळे देवत्त्व जागृत होणे

प.पू. पागनीस महाराज एका देवतेच्या मूर्तीची प्रतिदिन पूजा करत असत. तिच्यावर होणार्‍या सततच्या भावपूर्ण पूजनाच्या संस्कारामुळे तिच्यात देवतेचे ५ टक्के तत्त्व एवढे वाढले. संस्कारांमध्ये भाव असेल, अर्थात पूजेतील कृतींमध्ये भाव असेल, तर मूर्तीतील देवाचे तत्त्व वाढते.

३ आ. देवतेची कृपा होणे

देवपूजेमुळे देवता प्रसन्न झाल्याने देवतेची कृपा संपादन करणे पूजकाला सुलभ होते.

३ इ. पूजकातील चैतन्य वाढणे

देवपूजेमुळे पूजकाकडून देवतेचे तत्त्व ग्रहण होऊन त्याच्यातील रज- तमाचे प्रमाण कमी होण्यास आणि चैतन्य वाढण्यास साहाय्य होते.

३ ई. ‘देवपूजेतून मिळणार्‍या सात्त्विक लहरींद्वारे दिवसभरातील कामे करण्यास सुरुवात होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

३ उ. वातावरणशुद्धी

देवपूजेने वातावरणातील सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते.

 

४. देवपूजेचे प्रकार

धर्मशास्त्रात देवपूजा करण्याचे पुढील प्रकार सांगितले आहेत. पहिले दोन प्रकार हे सर्वसाधारणतः ज्याला आपण ‘देवपूजा’ म्हणतो अशा स्थूल स्तरावरील आहेत, तर त्यापुढील दोन प्रकार हे सूक्ष्म स्तरावरील आहेत.

४ अ. पंचोपचार पूजा (मूर्ती किंवा चित्र यांची पूजा)

गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य हे पाच उपचार देवाला समर्पित करणे

४ आ. षोडशोपचार पूजा (मूर्ती किंवा चित्र यांची पूजा)

वरील पंचोपचारांसहित सोळा उपचारांचा समावेश यात होतो.

४ इ. मानसपूजा

मनाने सगुण मूर्ती कल्पून मनाने तिची पूजा करणे

४ ई. परापूजा

निर्गुण परब्रह्माची परावाणीतून पूजा करणे

 

५. काही देवतांच्या पूजनाची वैशिष्ट्ये आणि त्यांमागील कारण

अ. देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना प्रिय करणे

पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामुळे देवता प्रसन्न होतात. हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य म्हणजे, काही देवतांना विशिष्ट उपासनापद्धती विशेष प्रिय असतात. त्या केल्या असता त्या देवता प्रसन्न होतात. हिंदु धर्माचे हे वैशिष्ट्य दर्शवण्यासाठी पुढे काही देवतांच्या पूजनाची वैशिष्ट्ये कारणांसहित दिली आहेत. अध्यात्मचिंतनातील इतकी सखोलता केवळ हिंदु धर्मातच पहायला मिळते.

दीपप्रियः कार्तवीर्यो मार्तण्डो नतिवल्लभः ।

स्तुतिप्रियो महाविष्णुर्गणेशस्तर्पणप्रियः ।।

दुर्गाऽर्चनप्रिया नूनमभिषेकप्रियः शिवः ।

तस्मात्तेषां प्रतोषाय विदध्यात्तत्तदादरात् ।।

दीपप्रियः ………….. विदध्यात्तत्तदादरात् ।।

– मन्त्रमहोदधि १७.११६-११७ आणि नारदपुराण, पूर्व. ७६.११५-११६

अर्थ : कार्तवीर्याला दीप, सूर्याला नमस्कार, श्रीविष्णूला स्तुती, श्री गणेशाला तर्पण, श्री दुर्गादेवीला अर्चन आणि शिवाला अभिषेक प्रिय आहे. यास्तव या देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना प्रिय कार्यच करायला हवे.

आ. शिवपूजेत शंखाचे महत्त्व नसणे

शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही, तसेच शिवाला शंखाचे पाणी घालून स्नान घालत नाहीत. देवांच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची स्थापना असेल, तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही; पण महादेवाची पिंड असलेल्या बाणलिंगाला शंखोदकाने स्नान घालू नये.’

शास्त्र : शिवपिंडीत शाळुंकेच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता नसते. बाणलिंगाबरोबर शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात.

इ. आरतीच्या वेळी शंखनाद विहित असणे

‘देवळात महादेवाची पूजा करतांना शंखपूजा उक्त नाही. मात्र आरतीपूर्वी शंखनाद विहित आहे आणि अवश्य केला जातो.’

शास्त्र : शंखनादाने प्राणायामाचा अभ्यास तर होतोच; शिवाय शंखनाद जेथपर्यंत ऐकू जातो, त्या परिसरात भूत, पिशाच वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही.

 

६. देवपूजा दिवसात किती वेळा आणि कोणत्या समयी करावी ?

देवपूजा हे नित्य कर्म आहे. प्रतिदिन त्रिकाल (प्रातःकाली, माध्यान्ही म्हणजे दुपारी आणि सूर्यास्तानंतर) षोडशोपचारे (सोळा उपचारांनी) पूजा करावी; परंतु त्रिकाल अशी पूजा करणे शक्य नसल्यास सकाळी षोडशोपचारे पूजा करावी आणि दुपारी आणि सूर्यास्तानंतर पंचोपचार (पाच उपचारांनी) पूजा करावी. त्रिकाल पूजा करणे शक्य नसल्यास किमान सकाळी एकदा तरी पूजा करावी. षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा करणे अशक्य असेल, तर गंध आणि पुष्प या दोन उपचारांनी तरी पूजा करावी. धर्मशास्त्रात अशा प्रकारे पर्याय सांगितले आहेत; कारण कोणत्याही परिस्थितीत उपासकाकडून देवपूजा घडावी, हा त्यामागील उद्देश आहे !

६ अ. ‘देवाची त्रिकाळ पूजा करावी’, असे शास्त्रात सांगितलेले असतांना
कलियुगात ‘केवळ सकाळी तरी पूजा अवश्य करावी’, असे प्रचलित होण्याची कारणे

प्रातर्मध्यन्दिने सायं देवपूजां समाचरेत् ।

अर्थ : शक्य झाल्यास देवाची त्रिकाळ पूजा करावी.

६ अ १. कलियुगात सात्त्विकतेचा लोप झालेला असल्याने कर्मकांडाप्रमाणे धर्मातील सर्व आचारांचे पालन करणेही शक्य होत नसल्याने रूढीवाद प्रस्थापित होणे

‘पूर्वीचा काळ सात्त्विक असल्याने त्रिकाल पूजा करून दिवसभरातील तीन प्रहरांत होणार्‍या ब्रह्मांडातील रज-तमात्मक ऊत्सर्जनात्मक धारणेला नष्ट करून वायूमंडल शुद्ध ठेवणे शक्य होत होते; परंतु आता कलियुगात सात्त्विकतेचा लोप झालेला असल्याने कर्मकांडाप्रमाणे धर्मातील सर्व आचारांचे पालन करणे अशक्य होत आहे. यासाठी निदान सकाळच्या वेळी भावपूर्ण पूजा करून देवाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य वास्तूत टिकण्यासाठी केलेला हा रूढीवाद आहे.

कलियुगात मानवाने सर्व देवधर्म सोडून देण्यास आरंभ केल्याने निदान प्रातःसमयी तरी पूजा करण्याची शिकवण संतांनी दिलेली आढळते.

६ अ २. भक्तीयोगात प्रत्यक्ष कर्मामागील भाव, मानसपूजा आणि नामजप यांना जास्त महत्त्व दिले जाणे
६ अ २ अ. भाव आणि मानसपूजा

उपासनाकांडात प्रत्यक्ष त्या त्या वेळेला कर्म करणे अत्यंत ग्राह्य मानले जाते; परंतु भक्तीयोगात मात्र प्रत्यक्ष कर्मामागील भावाला जास्त महत्त्व दिले गेल्याने मानसपूजेसारख्या उपासनापद्धतीची निर्मिती झाली.

६ अ २ आ. नामजप

कलियुगात मायेतील कर्मांना विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने ‘कर्म करतांना मुखाने नाम घेणे’, हीच सर्वश्रेष्ठ प्रकारची साधना मानली गेली आणि त्रिकाल पूजा करणे शक्य नसल्याने एकदा सकाळी पूजा करून सतत जाता-येता कर्म करतांना नामजप करणे सर्वशक्य मानले गेले. त्यामुळे पूजाकांडापेक्षा संतांनी ‘कलियुगात नामसाधन सोपे आहे’, असे सांगितलेले आढळते.

‘जसा काळ, तसा उपदेश’, हेच प्रधान सूत्र वापरून संत त्या त्या काळात समष्टीचे कल्याण साधण्याचा कसा प्रयत्न करतात, हेच यातून लक्षात येते.’- एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, चैत्र शुद्ध १४, कलियुग वर्ष ५११० (८.४.२००९), दुपारी ३.१२)

 

७. देवपूजा कधी करू नये ?

अ. पारोश्याने (आंघोळ न करता) तसेच व्यसनी अवस्थेत

आ. सोयर आणि सुतक लागल्यापासून दहा दिवस (सोयर आणि सुतक लागल्यानंतर दहा दिवस अशौच असते. अकराव्या दिवशी शुद्धी करून पूजा करता येते. सुतक असतांना कर्त्याला मात्र १२ व्या दिवसानंतरच पूजा करता येते.)

इ. घरातील स्त्री रजःस्वला असल्यास आणि तिचा वावर नसलेल्या खोलीत देव असतील, तर घरातील वडीलधार्‍या पुरुषाने आंघोळ करून पूजा करावी. जागेच्या अभावी देव वेगळ्या खोलीत ठेवणे शक्य नसल्यास चार दिवस (स्त्रीचा रजोकाळ समाप्त होईपर्यंत) देवघर पडद्याने झाकून ठेवावे. विशिष्ट कारणासाठी अशा प्रकारे देवाला झाकून ठेवणे गैर नाही. वैष्णव सांप्रदायिकांच्या मंदिरांमध्येही ‘देव स्नान करत आहे, देव निजला आहे’ वगैरे कारणांसाठी देवाची मूर्ती पडद्याने झाकून ठेवण्याची पद्धत आहे. हे एकप्रकारे देवासाठी निराळी खोली बनवण्यासारखेच झाले.

स्त्रीच्या रजोकाळाच्या दिवसांत देवघर पडद्याने झाकून ठेवण्यामागे कारणे

१. रजोकाळात स्त्रीचा रजोगुण वाढलेला असतो. देवघर उघडे असल्यास देवाकडून सात्त्विक स्पंदने बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. या सात्त्विक शक्तीचा स्त्रीला त्रास होऊ शकतो.

२. रजोकाळात स्त्रीमधील रजोगुण वाढलेला असल्याने, तसेच तिच्यामुळे विटाळ होत असल्याने एकूणच वास्तू राजसिक स्पंदनांनी भारित बनते. राजसिक स्पंदनांचे आवरण देवाच्या मूर्तीवरही येते.

वरील कारणांस्तव चार दिवस देवपूजा करू नये; मात्र मानसपूजा आवर्जून करावी. पाचव्या दिवशी घरात गोमूत्र (उपलब्ध नसल्यास विभूतीचे पाणी) शिंपडून आणि धूप दाखवून वास्तूशुद्धी करावी आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे देवपूजा सुरू करावी.

 

८. देवपूजा कोणत्या दिशेला करावी ?

पूर्व दिशेला विशेष महत्त्व असून त्या दिशेला तोंड करून पूजाविधी करण्यास सांगितले आहे; म्हणूनच देवघर नेहमी पूर्व-पश्चिम दिशेने असणे योग्य असते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’

11 thoughts on “देवपूजा”

  1. बाळंतपण झाले असेल तर देवपूजा किती दिवस करु नये? मुलीचे सासर माहेरकडे सारखेच नियम पाळावे का?

    Reply
    • नमस्कार,

      बाळंतपण झाले असेल तर सासरी १२ दिवस सोयर पाळावे.

      Reply
      • बाळ जन्मल्या नंतर 12 दिवस सुतक पाळतात, तर मग 5 व्या दिवशी जी पाचवी करतो तेव्हा देवा पाशी दिवा लावावा का?

        Reply
        • नमस्कार किशोर जी

          जनन विषयक जे पाळावे लागते (सोयर) त्यात पहिल्या, 5, 6, 10 व्या दिवशी पूजा, दान वगैरे करण्यासाठी काही पाळण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण या दिवसांमध्ये दिवा लावणे, पूजा करणे करू शकतात.

          आपल्या बाळाला उत्तम संस्कार मिळावे यासाठी सनातनचे संस्कार विषयक ग्रंथ अवश्य वाचा – https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-hindu-dharma-and-sanskar/mr-parenting/

          आपली,
          सनातन संस्था

          Reply
    • नमस्कार,

      7 पिढ्यांपर्यंत साधारणपणे पाळायचे असते. पण त्यामध्ये अन्य पण वेगवेगळ्या नियमांचा विचार केलेला असतो (उदा. मुंज झाली आहे का, लग्न झाले आहे का इत्यादी), त्यानुसार सुतक किती दिवस हे ठरत असते.

      Reply
    • नमस्कार,

      आम्हाला संपर्क केल्याविषयी धन्यवाद.
      शास्त्रानुसार पूजा सकाळी, श्राद्धादी कर्म अपराह्न काळात करावे. त्यामुळे देवपूजा दुपारी १२ च्या आत होईल असे प्रयत्न करू शकतात.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply

Leave a Comment