नमस्कार, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत.
सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन करून आजच्या प्रवचनाला सुरुवात करूया.
हिंदु वर्षारंभ गुढीपाडव्याला, म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला आहे. गुढीपाडव्याला `वर्षप्रतिपदा' किंवा `संवत्सरारंभ' असेही म्हणतात. प्रत्येक धर्मानुसार वर्षारंभाच्या तिथी वेगवेगळया आहेत व ते वेगवेगळया नावांनी ओळखले जातात; जसे इसवी सन एक जानेवारी पासून सुरू होते, पारसी वर्ष पतेतीला तर मुस्लिम वर्ष मुहरम्ला सुरू होते. वर्ष १२ महिन्यांचे असावे, हे सर्वप्रथम वेदांनी सांगितले. वेदांमध्ये म्हटलेले आहे, `द्वादश मासेही संवत्सर:' वेदांनी सांगितले आणि सर्वांना मान्य झाले. आता वर्षारंभ एक जानेवारीलाच का, याला काही कारण नाही; परंतु चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच गुढीपाडव्याला वर्षारंभ का, याला मात्र विविध प्रकारची कारणे आहेत. त्या मागे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत. गुढीपाडव्यालाच म्हणजे वर्षप्रतिपदेलाच वर्षारंभ का, यामागची कारणे आता आपण पाहूया.
भगवत्गीतेमधे भगवंतांनी म्हटलेले आहे - `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे,' आणि पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपात बिंदूवर येतो, म्हणजे तेव्हापासून वसंतऋतू सुरू होतो. संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे परस्परांना जिथे छेडतात तो बिंदू!
चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षारंभ असण्यामागचे एक ऐतिहासिक कारण आहे. भारत भूमीवर शकांनी आक्रमण केले होते. हूण हे परकीय होते; आक्रमक होते; विध्वंस करणारे होते, भारत भूमीवर झालेले हे आक्रमण शकांनी परतवून लावले. शकांनी हुणांवर याच दिवशी विजय मिळवला. सम्राट शालीवाहनाने आपल्या शत्रूवर याच दिवशी विजय मिळवला आणि त्या दिवसापासून शालीवाहन शकाला सुरुवात झाली. रामाने वालीचा वध याच दिवशी केला. रामाने रावणवध करून आणि राक्षसांचा नाश करून याच दिवशी अयोध्येला पुनरागमन केले. ही झाली चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षारंभ का असावा यामागची ऐतिहासिक कारणे.
आता आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा वर्षारंभाचा दिवस असण्यामागील आध्यात्मिक कारणे पाहूया. यापैकी पहिले कारण म्हणजे, ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली आणि या दिवशी सत्ययुगाला सुरुवात झाली. पूर्ण वर्षामधे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजया दशमी हे प्रत्येकी एक आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा असे साडेतीन शुभ मुहुर्त असतात. गुढीपाडवा हा दिवस वर्षातल्या साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. या शुभ मुहुर्तांचे वैशिष्ट्य, म्हणजे एरवी कोणत्याही दिवशी आपल्याला कोणतेही मंगल कार्य करायचे असेल तर मुहुर्त काढावा लागतो; परंतु या दिवशी सर्वच घटिका या शुभ मुहुर्त असतात त्यामुळे या दिवशी कोणत्याही वेळी आपण मंगल कार्याला आरंभ करू शकतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षारंभ असण्यामागचे दुसरे आध्यात्मिक कारण म्हणजे या दिवशी प्रजापतिलहरी जास्तीतजास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात. प्रजापतिलहरी म्हणजे नक्षत्र लोकातून २७ लहरी निघतात आणि त्यांचे विभाजन होऊन एकूण १०८ लहरी पृथ्वीवर पोहोचतात. या १०८ लहरी चार प्रकारच्या असतात. प्रजापतिलहरी, यमलहरी, सूर्यलहरी आणि संयुक्तलहरी. या लहरींमुळे पृथ्वीवर वेगवेगळे परिणाम घडतात. हे परिणाम आपण समजून घेऊया.
प्रजापतिलहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची जमिनीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे, शरीरात कफ प्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात. यमलहरींमुळे पाऊस पडणे, वनस्पती अंकुरणे, स्त्रियांना गर्भधारणा होणे, गर्भाची व्यवस्थित वाढ होणे, शरीरात वायू प्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.
सूर्यलहरींमुळे जमिनीची उष्णता वाढून वनस्पती जळणे, चर्मरोग होणे, जमिनीची उत्पादनक्षमता कमी होणे, शरीरात पित्तप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात. संयुक्तलहरी म्हणजे प्रजापति, सूर्य व यम या तिन्ही लहरींचे मिश्रण. ज्या संयुक्त लहरींमध्ये प्रजापतिलहरींचे प्रमाण जास्त असते त्यांना प्रजापतिसंयुक्त लहरी असे म्हणतात. अशाच तर्हेने सूर्य संयुक्त व यम संयुक्त लहरीही असतात. चैत्र महिन्यामधे प्रजापतिलहरी व सूर्य लहरी मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर येतात आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रजापतिसंयुक्तलहरी व प्रजापतिलहरी सर्वांत अधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात. या दिवशी सत्त्व गुण सर्वात अधिक प्रमाणात पृथ्वीवर येतो; म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्याही वर्षारंभासाठी योग्य ठरतो.
आता आपण गुढीपाडवा प्रत्यक्ष कसा साजरा करायचा, हे पाहूया. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे. अभ्यंग स्नान, म्हणजे शरीराला तेल लावून त्वचेमधे ते जिरवून त्यानंतर गरम पाण्याने स्नान करावे. अभ्यंग स्नान केल्यामुळे आपल्यातला रज-तम गुण १ लक्षांशाने कमी होतो आणि सत्त्व गुण १ लक्षांशाने वाढतो. अभ्यंग स्नान करण्यापूर्वी आणि गुढीचे पूजन करण्यापूर्वी देश काळ कथन करायचा असतो. देश काळ कथन करण्याची आपली पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामधे ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत किती युगे व किती वर्र्षे लोटली, हे सांगितले जाते. देश काळ कथनामुळे आपल्याला या प्रचंड काळाच्या तुलनेमधे आपण किती क्षूद्र आहोत याची जाणीव होते. यामुळे आपला अहंभाव कमी व्हायला मदत होते.
गुढी उभारण्यापूर्वी आंब्याच्या पानांची लाल फुलांसहित तयार केलेली तोरणे प्रत्येक दाराशी बांधावी कारण लाल रंग शुभ दर्शक आहे. तोरण बांधल्यामुळे देवतांच्या गंध लहरी वास्तूमधे आकृष्ट होतात. या दिवशी करायची आणखी एक कृती म्हणजे नित्य पूजन. आपल्या घरातील देवघरात नेहमीप्रमाणे पूजा करावी. काहीजण या दिवशी संवत्सर पूजनसुद्धा करतात.
यानंतरची दुसरी कृती म्हणजे गुढी उभारणे आणि गुढीचे पूजन. आता आपण गुढी कशी उभारावी हे पाहूया. पाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी सडा रांगोळी करावी. घराच्या दाराशी उजवीकडे ज्या ठिकाणी गुढी उभारायची असेल तेथे तिच्यापुढे सुंदर रांगोळी घालावी. गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य - वेळू अथवा बांबू, साखरेची माळ अथवा गाठी, हिरव्या किंवा पिवळया रंगाचा जरीकाठी खण, आंब्यांच्या पानांची डहाळी, कडूलिंबाची पाने व फुलोरा, गुढी उभारण्यासाठी लहान पाट, कलश व नेहमीचे पूजा साहित्य, मोठ्या वेळूच्या किंवा कळकाच्या उंच टोकास हिरव्या किंवा पिवळया रंगाचा भरजरी खण बांधावा. खण बांधतांना त्याला निर्या घालाव्यात. त्यावर कडूलिंबाची कोवळी पाने व आंब्याच्या पानांची डहाळी बांधावी, त्यानंतर गाठी म्हणजे साखरेची माळ बांधावी, त्यावर लाल फुलांचा हार बांधावा, कलशावर बोटाने कुंकू लावावे व तो कलश वेळूच्या उंच टोकावर ठेवावा. अशा प्रकारे गुढी सजवावी. नंतर ही गुढी एका लहानशा पाटावर उभी करावी. या गुढीची `ब्रह्मध्वजाय नम:' म्हणून संकल्पपूर्वक पूजा करावी. गुढीला हळद वहावी, त्यानंतर कुंकू वहावे, अक्षता वहाव्यात व फुले वहावीत, धूप दाखवावा, त्यानंतर निरांजनाने ओवाळावे.
पूजेनंतर अशी प्रार्थना करावी - हे ब्रह्मदेवा, हे विष्णु,
या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून
ग्रहण केल्या जाऊ देत. त्यातून मिळणार्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून
राहू दे. मला मिळणार्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे,
हीच आपल्या चरणी प्रार्थना! यानंतर गुढीला कडुनिंबाचा नैवेद्य दाखवतात. गुढी
हे विजयाचे प्रतीक आहे. रावणाचा वध करून परतणार्या श्रीरामाचे स्वागत अयोध्यावासियांनी
याच दिवशी गुढ्या उभारून केले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आणखी एक
महत्त्वाची कृती म्हणजे पंचांग श्रवण या दिवशी नवीन पंचांग आणून त्याचे श्रवण
करायचे असते. पंचांग श्रवणामुळे गंगा स्नानाचे फळ मिळते. गुढी पाडव्याच्या
दिवशी आणखी एक महत्त्वाची कृती केली जाते ती म्हणजे कडूनिंबाचा प्रसाद ग्रहण
करणे.
प्रसाद तयार करण्याची कृती म्हणजे : कडूनिंबाची फुले, कडूनिंबाची १०
ते १२ कोवळी पाने, ४ चमचे चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, एक चमचा
मध, एक चमचा जिरे आणि चवीपुरता हिंग एकत्र मिसळावा व वाटून प्रसाद तयार करावा
व सर्वांना वाटावा. कडूनिंबामधे प्रजापति लहरी ग्रहण करण्याची क्षमता सर्वात
अधिक असते, यासाठी या दिवशी कडूनिंबाचा प्रसाद ग्रहण केला जातो. या दिवशी
जमिनीत नांगर धरावा. नांगरण्याच्या क्रियेमुळे खालची जमीन किंवा खालची माती
वर येते. प्रजापति लहरींचा संस्कार या मातीत होतो, त्यामुळे या मातीची बीज
अंकुरण्याची क्षमता अधिक पटीने वाढते. या दिवशी शेतीची अवजारे, बैल यांच्यावरती
मंत्र म्हणून अक्षता टाकाव्यात. या दिवशी शेतात काम करणार्या माणसांना उत्तम
कपडे द्यावेत. त्याचप्रमाणे या दिवशी अन्यही दान धर्म करावा. या दिवशी अन्य
सुखदायक कृत्येही करावीत म्हणजे मंगल गीत ऐकणे इत्यादी. या दिवशी सूर्यास्ताच्या
वेळी आपण गुढी उतरवतो. सूर्यास्तानंतर लगेचच गुढी खाली उतरवावी. ज्या भावाने
गुढी उभारली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला चैतन्य
मिळते. गुढी खाली उतरवतांना कुटुंबप्रमुखाने गुढीला हळद कुंकु वहावे, त्यानंतर
गुढीला नमस्कार करावा व नंतर गुळाचा अथवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
त्यानंतर सर्वांनी पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी - `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु,
आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल ती मला मिळू दे. ती शक्ती
राष्ट्र व धर्म या कार्यासाठी वापरली जाऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना\'़
प्रार्थनेनंतर गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैैनंदिन
वस्तूच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने वहात्या
पाण्यात विसर्जित करावीत. गुढीपाडवा कसा साजरा करायचा हे आपण पाहिले. गुढीपाडवा
अर्थात `चैत्र शुद्ध प्रतिपदा' या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता वर्षारंभाच्या
दृष्टीकोनातून हाच दिवस योग्य कसा, हे आपल्या लक्षात आले असेल. नववर्षाच्या
सुरुवातीसाठी आपण आपले नातेवाईक व मित्रमंडळी यांना शुभेच्छा पत्रे पाठवत
असतो. ही पत्रे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवशी पाठवावीत;
कारण तोच खरा वर्षारंभासाठी योग्य दिवस आहे. सध्या हिंदुधर्मियांचे अध:पतन
मोठ्या प्रमाणावर होत आहे. याला कारणीभूत असलेल्या विविध घटकांपैकी सर्वांत
महत्त्वाचे घटक, म्हणजे हिंदुंमध्ये संघटन नसणे व हिंदूंमध्ये असलेला धर्माभिमानाचा
अभाव. धर्माभिमानाच्या अभावामुळे हिंदू मृतवत् झाले आहेत; म्हणूनच हिंदुधर्माचे
विरोधक विविध प्रकारे हिंदुधर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष व धर्मग्रंथ यांची
खुलेआम विटंबना करतात व धर्महानी करतात. हिंदूंचा धर्माभिमान जागृत झाल्यास
ते धर्मद्रोह्यांचा विरोध हाणून पाडतील व धर्माचा उत्कर्ष होण्यास मदत होईल.
यातून हिंदूंचे व पर्यायाने राष्ट्राचेही भले होईल. धर्माभिमानाच्या अभावाचे
कारण, म्हणजे जसे मुसलमानांना मदरशांत व िख्र्तासींना चर्चमध्ये धर्मशिक्षण
मिळते, तसे हिंदूंना आपल्या निधर्मी राज्यात मिळत नाही. हिंदूंना धर्मशिक्षण
मिळावे व त्यांचा धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने सनातन संस्था व
हिंदु जनजागृती समिती ठिकठिकाणी `धर्मसत्संग' आयोजित करत आहे. सर्वांना
गुढीपाडवा तसेच हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नमस्कार.
|